आण्णा हजारेंचे आंदोलन खरेच कात टाकणार का?

सर्वप्रथम टीम आण्णा बरखास्त केल्याबद्दल आण्णांचे हार्दिक अभिनंदन!

बऱ्याच दिवसांनी आज पुन्हा माझ्या ब्लॉगवर लिहिताना खूप आनंद वाटतोय.
२३ मार्च,२०१२ ला लिहिलेल्या ब्लॉगमधील सर्व घटना गेल्या ६ महिन्यांत अगदी मी सूचित केल्याप्रमाणेच घडल्या आहेत.अर्थात यात काही दैवी योगायोग वगैरे काहीच नसून फक्त टीम आण्णाच्या कार्यपद्धतीचा थोडासा अभ्यास होता इतकेच .

बऱ्याच पौराणिक कथांमधून सांगितल्याप्रमाणे हे सत्य आहे की तुम्ही जेवढ्या वेगाने वरती जाल तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी वेगाने तुम्ही खाली येण्याची शक्यता असते आणि शेवटी टीम आण्णा मध्येसुद्धा माणसेच होती [बऱ्याच जणांना वाटत असली तरी ती तेवढी शुद्ध चारित्र्याची आणि सचोटीची नव्हती हे आता स्पष्ट झाले आहे;नव्हे ते पूर्वीच माहिती होते पण तसे बोलणे हे गेल्या १-१.५ वर्षात प्रसारमाध्यमांच्या अति-उत्साहामुळे एखादे पाप करण्यासारखे होवून बसले होते] आणि त्यांच्या पूर्वेतिहासाकडे नजर टाकल्यावर ते एवढेच नव्हे तर यापेक्षाही बरेच खाली घसरणे शक्य होते आणि अजूनही आहे.

यात मला खालील मुद्दे मांडावेसे वाटतात:-

१.मुळात परत एकदा मी आण्णांना विचारू इच्छितो की आपल्याला ११० कोटींच्या देशात ४-५चच लोक आंदोलनाची दिशा ठरवायला योग्य का वाटले?

२.आपण लोकपाल समितीत मागासवर्गीयांना काही जागा राखून ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती [ती योग्यही आहे यात मला शंका वाटत नाही,पण त्यांची निवडसुद्धा केवळ गुणवत्ता आणि अनुभवावरच व्हावी ही  अपेक्षा!];मग त्याचप्रमाणे आपल्या समितीत प्रादेशिक समतोलता असावी असे आपल्याला का वाटले नाही? आपल्या पूर्ण टीममध्ये महाराष्ट्र ,गुजरात,मध्य प्रदेश,ईशान्य,पूर्व आणि दक्षिण भारतातले लोक होते का आणि असतील तर कोण आणि किती;आणि त्यांची आंदोलनात काय भूमिका होती?

३.
[अ] आपल्या टीममधील केजारीवालांनी सरकारी नोकरीत असताना कोणते क्रांतिकारी कार्य केले होते? मान्य आहे की ते पूर्ण देशाला बदलू शकले नसते आणि ते एकट्या व्यक्तीकडून अपेक्षितही नाही;पण स्वतःचा जिल्हा किंवा विभाग तरी त्यांनी सुधारायचा होता.
[ब] किरण बेदी या केवळ आय.पी.एस.आहेत म्हणून लोकांनी त्यांचे ऐकायचे का?आणि त्यांचे चारित्र्य तरी किती भ्रष्टाचारमुक्त आहे याची आपण कधी साधी चौकशी तरी केली आहे का?
त्यांच्या मुलाच्या मेडीकलच्या प्रवेशावेळी त्यांनी गैरव्यवहार केला होता हे सत्य आता आम्ही का नाकारायचे?
[क] भूषण पिता-पुत्र अशा कोणत्या केसेस लढवतात की त्यांना १०-२० वर्षांत १२०-१५० कोटी रुपये मिळतात [भ्रष्टाचार न करता]?त्यांच्यावर आम्ही का विश्वास ठेवायचा?
[ड ] कोण कुमार विश्वास आणि कोण मयंक गांधी? एवढी वर्षे हे कोठे होते आणि काय कार्य केले?त्यांना आम्हाला शहाणपणा शिकवायचा अधिकार कोणी दिला?
अमीर खान,अनुपम खेर आणि सदाशिव अमरापूरकर यांनी एवढी काय देशसेवा केली आहे की त्यांना तुमच्या स्टेजवर जागा तुम्ही देता [आणि सामान्य माणसाला तिथे पोहोचाताही येत नाही]? भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांत सर्वांत वरच्या नंबरवर हे अभिनेतेही आहेत कारण ते कधीच आपले खरे उत्पन्न जाहीर करत नाहीत किंवा मिळालेल्या रकमा खूपच कमी करून ते दाखवत असतात.अशा लोकांची तुम्हाला गरज काय आहे?

४.आपण केवळ भ्रष्टाचारविरोधी आहात की काँग्रेसविरोधी हेही आपल्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला पडलेले एक कोडे आहे कारण आपल्या उक्तीतून आणि कृतीतून ते व्यक्त होण्याऐवजी मनात गोंधळच जास्त निर्माण करते.हे आपण एकदातरी स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे.आणि त्याचवेळी भा.ज.प. आणि इतर पक्ष भ्रष्टाचारमुक्त आहेत हे आपण कसे म्हणता?दिल्लीतील भ्रष्टाचार आपल्याला दिसतो मग कर्नाटक,गुजरात मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे काय?

५.केजारीवालांनी आधी आपण सरकारचे काहीच देणे लागत नसून केंद्र सरकार केवळ आकसाने आपल्यावर कारवाई करत आहे असे म्हटले [आणि अण्णांनी त्याचे समर्थन केले!];मग परत गुपचूपपणे जावून सरकारी तिजोरीत ९ लाख रुपये भरले.मग याचाच अर्थ त्यांनी सरकारचे पैसे बुडवले होते असा होत नाही का?
किरण बेदींनीसुद्धा विमानाच्या तिकिटाच्या पैशाच्या रकमेत गैरव्यवहार केला;तरीही आण्णांनी त्यांचे समर्थन का केले?

६.आत्ता आण्णांनी स्वतःला केजारीवालांपासून दूर केले आहे याचाच दुसरा अर्थना केजारीवालांची नियत साफ नाही असा होत नाही का?

७.आतासुद्धा आण्णा जी नवीन टीम तयार करत आहेत,त्याचे निकष काय? ती तरी सर्वमान्य,सर्वसमावेशक आणि निःस्वार्थी लोकांची असेल याची खात्री देता येईल का?
अण्णांनी केवळ आपल्या हो ला हो म्हणणारे लोक न निवडता खरेच जे हुशार आणि अनुभवसंपन्न आहेत त्यांचीच निवड करावी,एवढी तरी माफक अपेक्षा आम्ही करू शकतो का?

८.देशाच्या घटनेवर आपला विश्वास आहे का हेही आपण एकदा जाहीरपणे सांगावे आणि तसा तो असल्यास त्यात सांगितलेल्या कोणत्या लोकशाही व्यवस्थेवर आपला विश्वास आहे तेही जाहीर करावे कारण संसदेवर तर सोडाच पण अगदी न्यायालयांवरसुद्धा आपल्या टीमने आणि आपण टीका करायला मागे-पुढे पहिले नाही.ही कृती आम्हा सामान्य लोकांना मुलीच बरोबर वाटत नाही,हे आपण लक्षात घ्यावे.

९.सर्वांत शेवटी पण अतिमहत्वाचे म्हणजे आम्हाला दहावीत असताना मराठीच्या पुस्तकात एक धडा होता आणि त्यात असे महटले होते की,महापुरुषांचा पराभव त्यांचे विरोधक करत नसतात तर त्यांचे अनुयायीच त्यांच्या पराभवाला कारणीभूत असतात. हा धडा आण्णा लक्षात घेणार का हाच सर्वांत मोठा प्रश्न आहे.[आण्णा अजून महापुरुष वगैरे झालेले नसून ते त्याच्या आसपासही नाहीत हे येथे नम्रपणे नमूद करावेसे वाटते;केवळ प्रसिद्धीमाध्यमांनी धूळ उठवली आहे इतकेच आणि ती धूळही आता पुरती खाली  बसली आहे याची अण्णांनीसुद्धा दाखल घ्यावी.]

[डॉ .अमित तुकाराम पाटील]



Comments

  1. Exactly amit..u r right...if v consider their behavior then its clear that its only for publicity n politics..

    ReplyDelete

Post a Comment