खरंच देव आहे का?

माणसाच्या निर्मितीपासून आणि उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या अवस्थांतून जातानाही हा प्रश्न त्याला पडत आला आहे आणि तत्कालीन परिस्थितीला अनुकूल अशी उत्तरे शोधण्याचा त्याने नेहमीच प्रयत्न केला आहे.आणि तरीही,बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेला या प्रश्नाने सतविले आहे.जगातल्या जवळपास सगळ्याच धर्माच्या आणि पंथांच्या लोकांना हा प्रश्न पडत आलेला आहे.माणसाला देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेण्याचा अधिकारच नाही येथपासून देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्हे उभे करण्याचा आम्हाला अधिकार आहे येथपर्यंत अनेक लोकांनी अनेक मते मांडली आहेत.


मुळात या प्रश्नाचा विचार करताना असे लक्षात येते की,ज्यांचा देवावर विश्वास व श्रद्धा असते,तीदेखील बऱ्याचदा सापेक्ष असते.म्हणजे सुखात असताना बऱ्याच लोकांना देवाचा विसर पडलेला असतो आणि त्यामुळे देव आहे की नाही याचा विचार करण्याची त्यांच्यावर वेळच येत नाही.एक सवय म्हणून देव दिसला की ते नमस्कार करण्याची प्रथा पळत असतात.सुखात असताना सर्व काही सुरळीतपणे चालू असते आणि त्यामुळे मग जप-जाप्य,अभिषेक,शांती असे प्रकार शक्यतो केले जात नाहीत.



बहुतेक जणांना देवाची आठवण येते ती त्यांच्यावर एखादा कठीण प्रसंग किंवा संकट आल्यावर! आणि,मग काय जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी त्यांना देव दिसावा किंवा भेटावा असे वाटू लागते.तो बिकट प्रसंग किंवा ते संकट टळेपर्यंत मग देवाचा अखंड धावा सुरू होतो...तो चालू राहतो...आणि मग काही वेळाने तो कमी होतो किंवा थांबतो.तो जेव्हा थांबतो तेव्हा पुढीलपैकी एक गोष्ट नक्कीच घडलेली असते.एक म्हणजे,त्या संकटातून त्या व्यक्तीची/कुटुंबाची सुटका झालेली असते किंवा दुसरे म्हणजे देवाचा एवढा धावा करूनदेखील जे काही वाईट किंवा अनपेक्षित घडण्याची भीती असते,ती घटना घडून जाते.पहिल्या प्रसंगातील व्यक्तींचा मग 'त्या' सर्वशक्तिमान अशा देवावरचा विश्वास आणि श्रद्धा वाढत जाते;पण दुसऱ्या प्रसंगातील व्यक्तींचा (काही अपवाद वगळता) केवळ परमेश्वरावरचा विश्वासच ढळत नाही तर,उठ-सूट देवाला दुषणे देण्याचा कार्यक्रम सुरू होतो.म्हणजेच सगळ्या नाही,पण काही लोकांत तरी त्याचे अस्तित्व सापेक्ष आहे.

देवावर ज्यांचा विश्वास आहे,त्यांचेही तीन गट आहेत-देव सगुण आहे असे म्हणणारे;देव निर्गुण आहे असे म्हणणारे आणि देव सगुण-निर्गुण दोन्हीही आहे असे म्हणणारे!
वेगवेगळ्या धर्मांनुसार मूर्तिपूजक आणि मूर्तीपूजा-विरोधक असे गट आहेत,त्याचप्रमाणे देवाचे एकच रूप आहे असे मानणारे (ख्रिश्चन) आणि देवाची अनेक रूपे आहेत (हिंदू) असे मानणारे असेही गट आहेत.


देवाला न मानणारे लोक तो केवळ डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही,कानांनी त्याला ऐकू शकत नाही,हाताने स्पर्श करू शकत नाही म्हणजेच ज्ञानेंद्रियांना 'कळत' नाही,म्हणून त्याच्या अ त्वाविषयी शंका घेतात.ते यासाठी वैज्ञानिक आधार द्या,अशी मागणी करतात.ही मागणी जरी वरकरणी रास्त वाटत असली तरी यावर देवावर विश्वास असणाऱ्या लोकांचा जो आक्षेप की,जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नित्य नियमाने घडत असतात पण त्यांना प्रत्येक वेळी शास्त्रीय आधार किंवा पुरावे देणे शक्य नसते;तोही एकदम रास्तच वाटतो.अशा काही गोष्टी नक्कीच आहेत,हेही खरे आहे.आणि,देवाला मानणारे जसे सर्वधर्मीय आहेत तसेच दवाला न मानणारे देखील सर्वच धर्मात आहेत.वर वर देवाबद्दल शंका घेणारे आणि मागे मात्र देवाचा 'चुकलो देवा,माफ कर' असा धावा करणारे देखील बरेच आहेत.



एकूणच काय तर देव,त्याचे अस्तित्व आणि त्याचे स्वरूप व्यक्तिसापेक्ष आहेत असाच याचा अर्थ आहे.



माझे विचाराल तर,देव आहे की नाही यावर मत मांडण्याएवढा विद्वान पंडित मी नक्कीच नाही;पण हो,माझा देवावर विश्वास आहे.याचे कारण असे की,भलेही देव एखाद्या स्वरुपात असेल किंवा नसेल,पण कुणीही काहीही न करता हे विश्व एवढे पसरले आहे आणि कित्येक कोटी वर्षांपासून या विश्वाचा व्याप कोणीतरी नैसर्गिकपणे सांभाळत आहे.किती येतात आणि किती जातात,पण जीवनाचा प्रवाह मात्र अखंडपणे आणि अव्याहतपणे वाहत राहतो.ही जी कोणती शक्ती हे काम करत आहे,तिलाच आपण देव मानले तर वरचा प्रश्न थोडाफार का होईना सोपा होऊन जाईल.शेवटी ज्याने-त्याने कशावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा हे त्याचे मनच त्याला सांगत असते [हे मनदेखील अजून माणसाच्या ताब्यात नाहीये बरं का! बहुधा ते जगन्नियंत्याच्याच (म्हणजे,देवाच्याच!!) तालावर नाचत असावे!!!]


[देवाचाच विषय निघाला आहे,म्हणून सांगतो-ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांचा पुढचा प्रश्न बहुधा देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जाणे गरजेचेच आहे का? असा असतो.त्यासाठी पुढील दाखला देत आहे.
२-३ वर्षांपूर्वी चित्रलेखामध्ये हा लेख मी वाचला होता.देवाचे स्थान असलेल्या मंदिरात जाण्याच्या प्रयोजनाविषयी ज्यांच्या मनात शंका आहे,त्यांच्यासाठी एक खूप छान उदाहरण त्यात दिले होते.त्यातली शंका उपस्थित करणारी व्यक्ती बहुधा देवावर विश्वास असणारी असावी;पण मंदिरात जाण्याविषयी मात्र ती साशंक होती.त्या व्यक्तीचा प्रश्न असा होता की,जर देव सर्वव्यापी आहे आणि तो अगदी खांबातदेखील होता अशी आख्यायिका आहे,तर मग देवळात जायची एवढेच नव्हे तर देवळांची निर्मिती करण्याचे तरी कारण काय? त्यावर त्याला असे उत्तर मिळाले की,जर ऑक्सिजन सगळ्याच पृथ्वीवर आहे आणि वातावरणात तो थोडा-थोडका नव्हे तर २१% आहे,तर मग गंभीररीत्या आजारी रुग्णाला तो दवाखान्यात (जे शुद्ध ऑक्सिजनचे 'स्थान' आहे) नेवून का लावतात? कारण,१००% शुद्ध ऑक्सिजन मिळण्याचे तेच तर स्थान आहे.त्याचप्रमाणे शुद्ध भक्ती करण्याचे आणि त्या परमेश्वराजवळ जाण्याचे मंदिर हेच स्थान आहे.]


[डॉ .अमित तुकाराम पाटील]

Comments

Post a Comment