स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज (साहित्य, राजकारण-प्रशासन आणि जीवन) (Chhatrapati Sambhaji Maharaj- Literature, Politics & Administration and Life)
छत्रपती संभाजी महाराज (साहित्य, राजकारण-प्रशासन आणि जीवन) (Chhatrapati Sambhaji Maharaj- Literature, Politics & Administration and Life)
॥ छत्रपति श्रीशिवराजस्य पुत्र श्रीशंभुराज॥
(©डॉ.अमित तुकाराम पाटील)
🔘 *भाग १*
🖋 *भोसले वंश - पूर्वज व पराक्रम*
छत्रपतींचा भोसले वंश पुरातन आहे. इ.स.१४७० च्या काही फर्मानांवरून ते 'राणा' ही पदवी लावत असे पुरावे आहेत. मराठी भाषिक राज्यात राहत असल्याने त्यांनी नंतरच्या काळात 'राजा' ही पदवी लावायला सुरुवात केली. मराठ्यांच्या ९६ कुळींपैकी ७-११च कुळे राजघराणी मानली जात व तीच मंडळी आपल्या नावापुढे क्षत्रिय वंशाचा बोध करून देण्यासाठी राजा हे उपपद जोडत. त्यापैकीच भोसले हे एक कूळ होते. ज्या महाराष्ट्रीय क्षत्रियांनी आर्यसंस्कृतीचा व संस्कारांचा विसर पडू दिला नाही त्यापैकी भोसले हे एक आघाडीवरील घराणे होते. (संदर्भ:- मालोजीराजे आणि शाहाजी महाराज, लेखक - वा.सी.बेंद्रे)
शाहाजीराजे अतिशय विद्वान असून संस्कृतसह अन्य भाषांत अत्यंत निपुण होते व साहित्याची त्यांना चांगलीच जाण होती. छत्रपती शिवाजी महाराजांनाही साहित्यात गती होती, म्हणूनच रघुनाथ हणमंतेंकडून त्यांनी 'राजव्यवहारकोषा'चे प्रचंड मोठे काम करून घेतले. अशा थोर आजोबा - वडिलांचा वारसा लाभलेला राजकुमार शंभुराजा लेखणी आणि तलवार चालविण्यात निपुण झाला नसता तरच नवल! शंभुराजांना मराठी,संस्कृत,कन्नड , भोजपुरी,हिंदी आदि आठ भाषा उत्तम लिहिता वाचता येत आणि त्यांत त्यांनी आत्यंतिक कष्टाने प्राविण्य प्राप्त केले होते. त्यांनी सातसतक, नखशिखा, नायिकाभेद व बुधभूषणम् हे ग्रंथ लिहिले होते. त्यापैकी बुधभूषणम् हा शुद्ध संस्कृत भाषेतील ग्रंथ त्यांनी वयाच्या केवळ १४व्या वर्षी लिहिला आहे.
स्वतःच्या बुधभूषणम् या ग्रंथात आपल्या आजोबांची प्रशस्ती करताना शंभुराजे म्हणतात ,
✒ भृशबलान्वयसिंधुसुधाकर: I
प्राथितकीर्तिरुदारपराक्रम : ॥
अभवदर्थकलासु विशारदो I
जगति शाहनृपः क्षितिवासव:॥
विविध सामर्थ्यांचा प्रचंड समन्वय झालेला पृथ्वीतलावर (साक्षात) वसुरुप किंवा शिवच असणारा शाहाजी नावाचा कीर्तिसंपन्न, उदार व श्रेष्ठ आणि पराक्रमांची शर्थ करणारा तसेच अर्थकारण व विविध कलांमध्ये पारंगत असणारा अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर गुणसागरावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. असे सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तीमान,उदार,पराक्रमी व अर्थकलामध्ये प्रवीण असे राजे शाहाजी होऊन गेले.
तर, आपल्या पित्याचे वर्णन करताना ते लिहितात,
✒ येनाकर्णविकृष्टकार्मूकचलत्काण्डावलीकर्तित I
प्रत्यर्थिक्षितिपालमौलिनिवहैरभ्यर्चि विश्वंभरा॥
यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोत्तुंग चूडामणे I
पुत्रत्वं समुपागत: शिव इति ख्यात: पुराणो विभु:॥
ज्यांनी वैर करणाऱ्या अनेक राजांची गर्वोन्मत्त मस्तके विश्वंभरास अर्पण केली अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या पुत्र 'शिव' म्हणून पुराणांतरीचा प्रभू शिवस्वरूप साक्षात शिवच जन्मास आला. त्या शहाजीराजांना महाशूर मुलखाचे धनी असलेले लोकांना पर्वतासारखे उत्तुंग म्होरके वाटणारे पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.
✒ कलिकाल भुजंगमावलीढं निखिलंधर्ममवेक्ष्य विक्लवं य:l
जगतः परिरंशतोवतापोः (तीर्ण:) सशिवच्छत्रपतिर्जयत्यजेयः ॥
त्या कलिकालाच्या भुजंगास पचविलेल्या अखिल धर्माची हीनावस्था बघून विव्हळ झालेल्या स्वामी म्हणून जगताचे तापहरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवरूप धारण केलेल्या शिवछत्रपतींचा जयजयकार असो. येथील सगळेच धर्मक्षेत्र भयभीत झालेले पाहून व कालिकालरुपी विषारी भुजंगाने ग्रासलेले पाहून जगाचे अधिपती आंशिक रुपाने अजेय जयस्वरुपात शिवधर्म पुनःस्थापित करण्यासाठी 'शिवछत्रपति' म्हणून जगाचे भय निवारण्यासाठी अवतरले. (वरील सर्व श्लोक संदर्भ व उद्धृत:- बुधभूषणम्, लेखक- छ.संभाजी महाराज; अनुवाद - डॉ. प्रभाकर ताकवले)
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे एकमेकांशी सख्य नव्हते व शंभुराजे हे छत्रपतींचे लाडावलेले व वाह्यात पुत्र होते असे म्हणणाऱ्यांनी व शंभुराजांच्याविरुद्ध जहरी प्रचार करणाऱ्यांनी वरील श्लोक वाचले तरी त्यांना स्वतःच्या कुविचारांची लाज वाटेल.
🔘 *भाग २*
🖋 *प्रवास - शंभुबाळ ते युवराज संभाजीराजे*
स्वतःचे वर्णनसुद्धा शंभुराजांनी एकदम कमी शब्दांत पण परिपूर्णतेने केलेले आढळते. स्वतःबद्दल ते लिहितात,
✒ तस्यात्मजः शंभुरिति प्रसिद्धः समस्तसामन्त शिरोवतंस: I
य: काव्यसाहित्य पुराणगीतकोदण्ड विद्यार्णव पारगामी ॥
त्या शिवप्रभूंचा समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज शंभू ( राजा ) म्हणून प्रसिद्धीस आला. तो काव्य, साहित्य,संगीत,धनुर्विद्या इत्यादीचा कलासागर पार केलेला होता / पारंगत होता. (संदर्भ:- लेखक- छ. संभाजी महाराज व अनुवादक- श्री.प्रभाकर ताकवले)
याचाच अर्थ शंभुराजे बालवयात केवळ युद्धकलेशी संबंधित तलवारबाजी,दांडपट्टा चालविणे, घोडेस्वारी याच शास्त्रांत नव्हे तर भाषा,साहित्य,संगीत या कलांतही निपुण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेल्या जगश्रेष्ठ काशीच्या गागाभट्टांनी केवळ १७ वर्षांच्या कोवळ्या वयाच्या शंभुराजाशी संस्कृत साहित्याविषयी अक्षरशः दिवसरात्र चर्चा व वादविवाद केले आणि अखेरीस शंभुराजांच्या प्रचंड व प्रगाढ बुद्धिमत्तेचे वर्चस्व मान्य केले. जगश्रेष्ठ ब्राह्मण पंडित काशीचे गागाभट्ट यांनी शुद्ध संस्कृत भाषेत लिहिलेल्या 'समयनय' नावाच्या ग्रंथात असा उल्लेख केला आहे की,"श्रीशंभुराजाचे वर्णन करताना संस्कृत भाषाही फिकी पडते." या ग्रंथात त्यांनी संभाजीराजांवर गुणवर्णनपर काव्य रचले असून हा ग्रंथ श्रीशंभूराजांना अर्पण केला आहे. यावेळी शंभूराजांचे वय केवळ १८ वर्षे होते. अखेरीस त्यांनी शभूराजांना गुरूस्थानी मानले. पण, त्यांच्या या कृतीमुळे स्थानिक ब्राह्मणांनी निंदा केली. लेखणीवर केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी असावी आणि क्षत्रियांनी फक्त तलवार चालवून प्रजा व ब्राह्मणांचे रक्षण करावे अशी मनुस्मृतीवादी भूमिका काही कर्मठ ब्राह्मणांनी घेतली होती. त्यामुळे एका क्षत्रियाने साहित्यासारख्या क्षेत्रात एवढी मोठी मजल मारणे कर्मठ ब्राह्मण लोकांच्या पचनी पडले नाही. शंभुराजांनी तलवार व लेखणी दोन्हीही सफाईदारपणे चालविण्यात अत्युच्च प्राविण्य प्राप्त केल्यामुळे त्यांना सुरुवातीपासून अशा जवळच्या लोकांच्या विरोधाला व निंदानालस्तीला तोंड द्यावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांची पुढे भविष्यात अगदी आजपर्यंत बदनामी होण्याच्या काही कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म किल्ले पुरंदर येथे १४ मे १६५७ रोजी महाराणी सईबाई यांच्या पोटी झाला. मात्र, त्यानंतर पुढे २ वर्षांनी त्यांचा मृत्यू होईपर्यंत सईबाई सतत आजारीच राहिल्या. त्यामुळे त्यांचे पालनपोषण खऱ्या अर्थाने राजमाता जिजाबाईंनीच केले. मात्र,एखादी स्त्री आई व आजीची भूमिका निभावताना तिच्या मायेत फरक पडू शकतो. आई ही मायाही करते व तितकीच कठोरही होऊ शकते ;आजी मात्र सदैव माया आणि मायाच करते. कदाचित त्यामुळेच शंभुराजे जास्त लाडाकोडात वाढले असण्याची शक्यता आहे. तसेच, त्यातील सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेमागील प्रेरणास्थान असणाऱ्या राजमाता जिजाऊंचे संस्कार व शिक्षण त्यांना लाभले. ११ जून, १६६५ च्या पुरंदर तहानुसार जेव्हा शंभुराजेंना घेऊन आग्र्याला जायला निघाले तेव्हा मात्र जिजाबाई क्षणभर हळव्या झाल्या व कचरल्या. त्यावेळी थोरल्या महाराजांनी त्यांना अफजलखान भेटीच्या वेळी आपण मला कसे काय जाऊ दिले याची आठवण करून दिली. आईच्या व आजीच्या मायेतील हा फरक लक्षात येताच जिजाऊंनी शंभुराजांना जाऊ दिले.
🖋 *लहानपणीचे 'मोठे' राजकारण*
पुरंदरच्या तहानुसार वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी शंभुराजांना महाराजांसमवेत आग्र्याला जाणे भाग पडले. आजच्या पक्के राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या काळात रायगड ते आग्रा अंतर सुमारे १३४० किमी. भरते. १६६५-६६ मध्ये पक्के रस्ते नसण्याच्या काळात हे अंतर सुमारे १७००-१८०० किमी.पर्यंत भरत असावे. शिवाय मध्ये येणाऱ्या डोंगरदऱ्यांमध्ये बोगदे व नद्यांवर पूल नव्हते. तसेच, हा संपूर्ण प्रवास ऊन, वारा आणि पाऊस यांचा सामना करत घोडयांवरून करावा लागत असे. आज भारीतल्या भारीत लक्झरी बसने मुंबई - कोल्हापूर प्रवास केल्यावर लोक एक-दोन दिवस झोपून काढतात. सुमारे ३५० वर्षांपूर्वी हे अंतर पार करणे हाच एक भीमपराक्रम ठरत होता आणि _वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी एवढा प्रवास घोडयावरून करणे हे एका महापराक्रमी राजाचा महापराक्रमी पुत्रच करू जाणे! बरे, एवढे करून तिथे काही ते पर्यटनाला गेले नव्हते खचितच! हिंदुस्थानच्या पातशहाबरोबर राजकारणाच्या गोष्टी करणे ही काही खायची गोष्ट नव्हती. त्यात पित्याने बाणेदारपणाचाच नजराना तडफदारपणे बादशहाला पेश केल्यावर वाट्याला नजरकैदेशिवाय दुसरे काही येणे संभवत नव्हते. दुसरी-तिसरीतच अभ्यास राहू दे, दफ्तराचेच ओझे होऊन वाकलेली आणि सतत दिमतीला असणारे आई-वडील असतानाही काठावर पास होणारी मुले पाहिली की, त्या पार्श्वभूमीवर वयाच्या ९ व्या वर्षी आईशिवाय परमुलखात व सतत जिवाच्या धोक्याची टांगती तलवार डोक्यावर असताना सुमारे वर्षभर हिंदुस्थानच्या तख्तावर राज्य करणाऱ्या औरंगजेबासारख्या अतिशय हुशार व कपटी शत्रूच्या नजरकैदेत राहणे यासारखी अवघड गोष्ट ती कोणती? केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासात यासारखे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. युवराज संभाजी वयाच्या दहाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे प्रतिनिधी म्हणून औरंग्याच्या दरबारात हजेरी लावायचे तर अकराव्या-बाराव्या वर्षी ते मोगलांचे मनसबदार म्हणून शहजादा मुअज्जमकडे ओलीस राहिले._ _आणि, त्या बारा वर्षांच्या कोवळ्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना काम तरी काय सांगावे-औरंगजेबाच्या मुलाला, शहजादा मुअज्जमला फोडून बापाविरुद्ध बगावत करायला लावण्याचं?! (संदर्भ:- 'संभाजी', लेखक- विश्वास पाटील)
धन्य तो पिता,धन्य तो पुत्र! म्हणतात ना, उंचावर राहणाऱ्यांना केव्हाही वादळाला तोंड द्यायला सिद्धच असावे लागते.(संदर्भ:- 'छावा', लेखक- शिवाजी सावंत)
🔘 *भाग ३*
🖋 *राज्यकारभाराचे ज्ञान, स्पष्टवक्तेपणा व बदनामी*
शिवरायांचे अष्टप्रधानमंडळ राज्यकारभारासाठी अतिशय प्रभावशाली व शक्तिमान होते. त्या अष्टप्रधानांत सरसेनापती पदासारखे काही अपवाद वगळता बव्हंशी ब्राह्मण मंत्री होते. अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, बाळाजी आवजी चिटणीस हे त्यांपैकी जास्त प्रभावी व थोरल्या महाराजांचे अत्यंत विश्वासू मंत्री होते. (All are equal, but some are more equal!) महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या व विस्ताराच्या कामात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यापैकी अण्णाजी दत्तो तिसऱ्या क्रमांकाचे सुरवनीस होते. वेगवेगळ्या प्रांतोप्रांतीचे राजे-रजवाडे आणि शिष्टमंडळे छत्रपतींना भेटायला येताना मौल्यवान नजराणे घेऊन येत असत .आणि, या लोकांसाठीसुद्धा नजराणे आणत असत.
अण्णाजी दत्तो प्रशासनात अत्यंत कडक स्वभावाचे अधिकारी म्हणून ओळखले जात. स्वराज्यातील कारकून व सरकारकून यांच्यावर त्यांची चांगलीच जरब होती. याच गोष्टीचा वापर करून त्यांनी आणि इतर मंत्र्यांनी हळूहळू भेटवस्तूंची सक्तीने वसूली चालू केली. थोरल्या महाराजांच्या नजरेत अशा गोष्टी यायच्या मात्र या सर्व मंत्र्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कामात सुरुवातीपासून केलेली मदत व निष्ठावंतपणे दिलेली साथ, महाराज मोठया मोहिमांवर असताना त्यांच्यामागे या मंत्र्यांनी खंबीरपणे सांभाळलेले प्रशासन व त्यांचा राजदरबारातील आब यांचा विचार करून महाराज अशा गोष्टींकडे कानाडोळा करीत असत. पण, कडक स्वभावाच्या युवराज संभाजींच्या नजरेतून या गोष्टी सुटत नसत आणि त्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावाला अनुसरून ते दरबारात असतानादेखील या मंत्र्यांची 'फुकटे', 'लाचखोर' अशी संभावना करीत. त्यामुळे मंत्र्यांच्या मनात संभाजीराजांबद्दल एक प्रकारची अढी निर्माण होऊ लागली.
त्यातच अण्णाजींची मुलगी हंसा हिच्यावर युवराजांनी बलात्कार केल्यामुळेच तिने आत्महत्या केली असा आरोप खुद्द अण्णाजींनीच केला आणि या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी व्हावी अशी मागणी महाराजांकडे केली. महाराजांनी या चौकशीची तपासणी महाराणी सोयराबाईंकडे सोपवली. सोयराबाई संभाजींच्या सावत्र आई असल्याने त्या संभाजीराजांवर प्रेम अथवा ममत्व न दाखवता कठोरपणे चौकशी करतील असा त्यांनी विचार केला होता. या चौकशीअंती शंभुराजे निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. वास्तविक पाहता युवराज संभाजीराजे दिसायला अत्यंत देखणे व आकर्षक होते आणि व्यायामाने त्यांनी शरीर कमावले होते. त्यामुळे पाहताक्षणीच कोणीही त्यांच्याकडे सहजच आकर्षिले जायचे. त्यात ते स्वराज्याचे युवराज होते. त्यामुळे, अनेक मुली तशाही त्यांच्यावर भाळल्या जाणे ही काही विशेष आश्चर्याची गोष्ट नाही. आणि, त्याकाळात आवडणाऱ्या मुलीला खुद्द युवराजांनीच मागणी घातल्यास तिने नाही म्हणणे शक्य नव्हते. त्यामुळे, जबरदस्तीने एखादीला पळवून नेऊन बलात्कार करणे ही गोष्ट निश्चितच अतिशयोक्तीपूर्ण वाटते. हंसा प्रकरणात युवराज निर्दोष सुटले तरी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची राज्यात बदनामी करायचा डाव काही मंत्र्यांनी ठरवून व जाणिवपूर्वक खेळला. पुढे हाच धागा पकडून व युवराज संभाजीराजेंनी राजद्रोहाच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यामुळे बदनामी झालेल्या या मंत्र्यांच्या वारसांनी बखरीतून संभाजीराजांचे वर्णन व्यसनी, बदफैली आणि बेजबाबदार असा केला. अगदी आजपर्यंत हा विखारी प्रचार काही लोक जाणिवपूर्वक करतात, ही बाब दुर्दैवाची व खेदाची आहे. विशेष बाब म्हणजे या बखरी वर्तमानात लिहिल्या गेलेल्या नसून छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बऱ्याच कालावधीनंतर लिहिल्या गेल्या असल्याने त्यात पूर्वजांचा मानापमान व तत्सम गोष्टींचा प्रभाव मान्य केला जावा. काही इतिहासकार मात्र संभाजी महाराजांच्याकडे पूर्वग्रहदृष्टीने पाहतात व बखरींनाच मुख्य संदर्भसाहित्य मानतात, कारण तेच त्यांच्यासाठी जास्त 'सोयीचे' ठरते.
छ. शिवाजी महाराजांनी या प्रकरणानंतर संभाजीराजांना सल्ला दिला, "ध्यानी ठेवा. राजांना चूक करता येत नाही ! आणि केल्या चुकीला सफाईही देता येत नाही." ( वाक्य उद्धृत- 'छावा')
वयाच्या १४ व्या वर्षी इ.स. १६७१ मध्ये युवराज म्हणून स्वतंत्र कार्यालयातून राज्यकारभार बघायला सुरुवात केली. छोटेमोठे तंटे-बखेडे त्यांच्यासमोर सोडवून निर्णय दिले जात. थोरले महाराजही कारभारी-दरबारी आणि भेटायला येणाऱ्या शिष्टमंडळांना लहान-सहान गोष्टींसाठी माझ्या निर्णयांची वाट न पाहता युवराजांच्या मसलतीने या गोष्टींवर विचार होऊन निर्णय घ्यावेत असा निरोप व निर्देश देत. हा विचार त्यांचा आपल्या सुपुत्रावर व त्याच्यावर केलेल्या संस्कारांवर असणारा दृढविश्वास दर्शवितो.
संभाजी महाराजांना कुणबी शेतकरी प्रत्यक्ष भेटत,तसेच ते राजवाड्याच्या चार भिंतींआड स्वतःला कोंडून न घेता रानावनांत,दऱ्याखोऱ्यांत आणि वाड्या-वस्त्यांवर सामान्य लोकांच्या समस्या जाणून घेत व शेतीसाठीची परिस्थिती अनुकूल आहे की नाही याचा प्रत्यक्ष (First hand experience) अंदाज घेत असत. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती असताना सरसकट शेतसारा माफ करण्याचा जनप्रिय व प्रसंगोचित निर्णय त्यांनी घेतला व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यांच्या अशा या निर्णयांमुळे स्वराज्याचा महसूल बुडेल आणि जनतेला अशाच गोष्टींची सवय लागून ते शेतीत व अन्यत्र ते कष्ट करणार नाहीत असा अण्णाजींसारख्या मंत्र्यांचा युक्तिवाद असायचा. पण हा युक्तिवाद लंगडा असल्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्ध केले. _युवराजांची ही लोकप्रियता आपल्या वर्चस्वाला धक्का देईल व स्वराज्यातील आपल्या स्थानाला बाधा आणेल या असुरक्षिततेच्या भावनेने त्यांना ग्रासले.
वरील सर्व गोष्टींच्या एकत्रित व वाढत जाणाऱ्या परिणामांमुळे युवराज व अष्टप्रधान मंडळातील 'कारभारी' यांच्यातील दरी वाढतच गेली.
🔘 *भाग ४*
🖋 *संशयकल्लोळ,अविश्वास, असुरक्षितता,'स्त्री'हट्ट,'राज'हट्ट..!*
युवराज संभाजीराजांच्या लोकप्रियता,प्रसिद्धी,कर्तृत्व व उगवणाऱ्या तेजस्वी नेतृत्वाला प्रत्यक्षपणे व समोरासमोर विरोध करता येत नाही याची जाणीव झाल्यावर या मंत्र्यांनी छुप्या व पडद्याआडच्या राजकारणाचा वापर करून घेण्याची कार्यपद्धती अवलंबायला सुरुवात केली. याच राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांनी महाराणी सोयराबाईंच्या मनात संभाजीराजांबद्दल संशयाचे व असुरक्षिततेचे वातावरण तयार करायला सुरुवात केली. संभाजीराजे खालच्या जातीच्या लोकांत मिसळतात, खेडोपाडी फिरतात आणि खालच्या जातीचे सवंगडी तयार करतात आणि त्यामुळे त्यांचे वर्तन युवराजाला साजेसे नाही, अशा कागाळ्या त्यांनी प्रथम थोरल्या महाराजांकडे करायला सुरुवात केली. वरवर ही गोष्ट कमी महत्त्वाची वाटली तरी युवराज सभाजीराजे त्या पदाला कसे साजेसे नाहीत हेच दाखविण्याचा तो एक प्रयत्न होता. अर्थात,शिवाजी महाराजांच्यावर या गोष्टीचा फार खोल परिणाम झाला नाही,मात्र त्यांना ही जाणीव झाली की आपल्या पाठीमागे आपल्या शंभुबाळाविरुद्ध आपलेच लोक कटकारस्थाने करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही संभाव्य धोक्याचीच सूचना आहे. सईबाई संभाजीराजांच्या बालपणातच निवर्तल्याने त्यांना आईचे प्रेम मिळाले नाहीच,त्यामुळे सोयराबाई या आपल्या सावत्र आईमध्येच 'आपली' आई शोधण्याचा पर्याय त्यांनी निवडला. सोयराबाईंनीही त्यांच्यावर मनापासून पुत्रवत प्रेम केलेच,पण नंतर त्यांच्यापोटी राजारामांचा जन्म झाला आणि त्यांच्या शंभुबाळांवरील प्रेमात अंतर पडू लागले. नंतर-नंतर थोरले महाराज अधूनमधून आजारी पडू लागले आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घरात आणि घराबाहेर स्वराज्याच्या वारसदाराबद्दल जसजशा चर्चा होऊ लागल्या तसतशी _सोयराबाईंच्या मनात आपल्या मुलालाच ही गादी वारसाहक्काने मिळावी अशी अभिलाषा निर्माण होऊ लागली. आणि,हीच गोष्ट अण्णाजींच्या पथ्यावर पडू लागली. त्यांनी सोयराबाईंच्या 'राजस्त्री'हट्टाच्या भावनेला खतपाणी घातले. सोयराबाईंनीही पुढचा-मागचा जास्त विचार न करता स्वराज्याची मऱ्हाटी व दक्षिण (कर्नाटक, तमिळ) अशा भागांत विभागणी करून संभाजी महाराज व राजाराम यांच्यात वाटणी करून देण्यासारख्या अवास्तव व छत्रपती शिवाजी महाराजांना कदापि मान्य न होणाऱ्या मागण्या करण्याचे धारिष्ट्य दाखवले. यामुळे महाराज कमालीचे दुखावले व काळजीत पडले. कोणत्याही परिस्थितीत संभाजीराजांना आपले कर्तृत्व व त्याद्वारे आपली स्वराज्याचा वारसदार म्हणून गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळू नये यासाठी धास्तावलेल्या काही मंत्र्यांनी सोयराबाईंना हाताशी धरून प्रयत्न सुरू केले. याचीच परिणिती म्हणून कर्नाटक मोहिमेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीवर नेणे छत्रपती शिवाजी महाराजांनी टाळले. इतकेच नव्हे तर त्यांनी संभाजीराजांना रायगडावरही राहू दिले नाही व त्यांना शृंगारपूरच्या तुलनेने कमी महत्त्वाच्या कामगिरीवर धाडले. ही गोष्ट महाराजांनी नाइलाजाने केलेली असो वा संभाजीराजांच्या काळजीपोटी केलेली असो,त्या घटनेने शंभूराजे कमालीचे दुखावले गेले. _पुढे जेव्हा काही काळासाठी का असेना, त्यांनी दिलेरखानाला जाऊन मिळण्याची जी जबर मोठी चूक केली, त्या घटनेचे बीज कदाचित या कर्नाटक मोहिम प्रसंगात रोवले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही._
*'सूड ही भावनाच भयानक आहे. स्त्रीच्या मनी ठाण झालेला सूड हा तर अतिभयानक असतो. आणि राजस्त्रीच्या मनात दबा धरून राहिलेला सूड तर निर्णायकी विध्वंसकच असतो.* (वाक्य *उद्धृत* :- 'छावा')
नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गंभीर आजारी पडले व अंथरुणाला खिळून राहू लागले, तेव्हा त्यांनी रायगडावरून पन्हाळगडावर असणाऱ्या संभाजी महाराजांना आपल्या भेटीस येण्यासाठी बरीच पत्रे पाठविली. मात्र अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे आदींनी ही पत्रे संभाजीराजांपर्यंत पोहोचणार नाहीत अशी व्यवस्था केली. *अखेरीस एप्रिल १६८० मध्ये दीर्घ आजारपणामुळे स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा मृत्यू झाला आणि स्वराज्य पोरके झाले.* महाराजांचे कार्यविधी सुरू असतानाच स्वराज्याचे वारसदार व दुसरे छत्रपती म्हणून राजाराम महाराजांचा मंचकारोहण विधी २१ एप्रिल,१६८० रोजी उरकण्यात आला. इकडे पन्हाळ्यावर संभाजी महाराजांना महाराजांच्या मृत्यूची खबर मिळाली. त्यांना आत्यंतिक दुःख झाले. पण, रायगडावरील पुढील घटनांची माहिती कळताच त्यांनी तातडीने २८ एप्रिल,१६८० रोजी पन्हाळा स्वतःच्या ताब्यात घेतला व आपला मंचकारोहण विधी करून घेतला.
🖋 *स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा राज्याभिषेक*
रायगडावर संभाजीराजांना पन्हाळ्यावरून कैद करुन घेऊन येण्याचा कट सोयराबाईंना विश्वासात घेऊन अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे यांनी रचला व बाळाजी आवजींनाही त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने या कटात सामील करून घेण्यात आले. स्वराज्याचे सरसेनापती (सोयराबाईंचे बंधू व युवराज राजारामांचे सख्खे मामा आणि संभाजीराजांचे सावत्र मामा) हंबीरराव मोहिते यांच्याशी मात्र यासंदर्भात कोणतीही मसलत करण्यात आली नाही. कदाचित, ते आपली सख्खी बहीण व सख्खा भाचा यांच्या विरोधात जाणार नाहीत व आपल्या सख्ख्या भाच्याला स्वराज्याचे वारसदार व दुसरे छत्रपती म्हणून आनंदाने स्वीकारतील अशा विचाराने त्यांना गृहीत धरण्यात आले. मात्र इथेच अण्णाजींची चूक झाली. *कोणत्याही पदावरील व्यक्तीची नेमणूक थोरले महाराज केवळ आणि केवळ गुणवत्ता पाहूनच करत असत* या तत्त्वाचा अण्णाजींना विसर पडला असला तरी सरसेनापती महाराजांचे हे तत्त्व मुळीच विसरले नव्हते. *छत्रपती शिवाजी महाराजांच्या माणसांची पारख करण्याच्या गुणाचा व गुणग्राहकतेचा याहून मोठा पुरावा तो कोणता ?*
_हंबीररावांना महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यापुढे वाढून ठेवलेल्या संकटांची कल्पना आली होती व त्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी संभाजीराजांसारखे सक्षम नेतृत्व हवे याची त्यांना जाणीव झाली होती. अतिशय सुयोग्य वेळी त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झाल्याने पन्हाळगडाकडे त्यांनी संभाजीराजांना कैद करण्याचा बहाणा करून कूच केली._ _नंतर त्यांच्याच मदतीने संभाजीराजांनी १८ जून,१६८० रोजी रायगडाचा ताबा मिळविला._
पुढे *२० जुलै १६८० रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि युवराज संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले.*
🖋 *मृत्यूदंड - मृत्यूदंड*
सोयराबाईंना त्यांनी राजमातेचा दर्जा दिला. *त्यांचे वर्णन करताना छत्रपती संभाजीराजे त्यांचा उल्लेख 'स्फटिकाहूनही निर्मळ' मनाच्या असाच करत.* राजारामांना त्यांनी युवराजाचा दर्जा दिला तर त्यांच्या पत्नी येसूबाई महाराणी बनल्या.
राजद्रोह करणाऱ्या ब्राह्मण मंत्र्यांनाही त्यांनी येसूबाईंच्या सल्ल्याने मोठ्या मनाने माफ केले व पूर्वीची अधिकारपदे बहाल केली आणि त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र, वारंवार संधी देऊनही त्यांच्या वागण्यात कोणताही फरक न पडता त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध कटकारस्थाने करणे चालूच ठेवले. _छत्रपतींच्या आश्रयाला आलेल्या औरंगजेबाचा मुलगा अकबर यालाही हाताशी धरून त्यांनी संभाजी महाराजांचा पराभव करून त्यांची हत्या करण्याचाही कट रचला._
या सर्व घटनांचा विचार करून अखेरीस स्वराज्याच्या व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी या मंत्र्यांवर स्वराज्याचे शत्रू म्हणून आरोप निश्चित केले व त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा जाहिर करण्यात आला. _अत्यंत दुःखी मनाने व नाइलाने आणि जड अंत:करणाने त्यांना छत्रपतींनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली व ती त्वरीत अंमलात आणली.
🔘 *भाग ५*
🖋 *स्वराज्याची दुखरी नस-जंजिरा*
१६८०च्या मध्यात छत्रपती संभाजी महाराजांनी जलदुर्गराज जंजिरा ताब्यात घेऊन संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलायचा प्रयत्न सुरू केला. १६८२ मध्ये तर एकदा सलग ३० दिवस छत्रपती संभाजी महाराज स्वतः जातीने हजर राहून जंजिरा घेण्यासाठी प्रयत्नशील होते;मात्र त्यात त्यांना यश आले नाही. आफ्रिकन मुस्लिम असणारे सिद्दी अतिशय चिवट,चतुर व शूर होते. _अखेरचा प्रयत्न म्हणून संभाजी महाराजांनी समुद्रात दगडी सेतू बांधून जंजिरा मिळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला._ मात्र, खुद्द औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण करण्यास सुरुवात केल्याने आणि त्यांच्या हल्ल्याला परतवून लावणे जास्त प्राधान्याचे व तातडीचे असल्याने छत्रपतींना जंजिऱ्याचा नाद सोडून द्यावा लागला.
*छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी एकूण ९ वेळा जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.* त्यामुळे जंजिरा ही अखेरपर्यंत स्वराज्याची दुखरी नस ठरली.
🖋 *पोर्तुगीजांना शिक्षा आणि इंग्रजांशी सलोखा*
छत्रपतींनी जंजिऱ्याचा नाद जरी सोडून दिला असला तरी किनारपट्टीवर अंमल कायम ठेवण्यासाठी जलदुर्गांची स्वराज्याला आवश्यकता होतीच. या धोरणाचा एक भाग म्हणून _मराठ्यांनी १६८२ मध्ये 'अंजदिवा' किल्ला जिंकून घेतला._ या किल्ल्यावरच स्वराज्याचा सागरी तळ करण्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा मनसुबा होता;मात्र एप्रिल १६८२ मध्ये केवळ २०० जणांच्या पोर्तुगीज सैन्य तुकडीने मराठ्यांना या किल्ल्यासून हुसकावून लावले. पुढे अतिशय मोठ्या ठरणाऱ्या मराठे - पोर्तुगीज तंट्याची बीजे या घटनेने रोवली. पोर्तुगीज उघडउघड मुघलांना दारुगोळा व शस्त्रास्त्रांची मदत करीत, त्यांची भारतातील सर्व बंदरे मुघलांना वापरू देत आणि आपल्या वसाहतींच्या हद्दीतून मुघलांच्या दळणवळणाला परवानगी देत.
या राजकीय बाबीबरोबरच *गोव्यातील हिंदूंचे साम-दाम-दंड-भेद या मार्गाचा अवलंब करून सक्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर पोर्तुगीज लोक घडवून आणत.* यामुळे बहुसंख्य हिंदू जनता गोवेकरांच्या जुलुम व अत्याचाराला कंटाळून गेली होती.
त्याचप्रमाणे औरंगजेबाशी हातमिळावणी करून गोव्याचा पोर्तुगीज व्हाइसरॉय फ्रान्सिस्को अल्वोर याने छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. _नार्वे (गोवा) येथील पंचगंगा नदीच्या काठावर झालेल्या चकमकीत तर संभाजी महाराज बालंबाल बचावले होते._ याचा राग छत्रपतींच्या मनात होताच.
या सर्वच घटनांमुळे *संतप्त झाल्याने छत्रपती संभाजींनी १६८३च्या अखेरीस गोव्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की, व्हाइसरॉय अल्वोर संत फ्रान्सिस झेवियरचे कलेवर (प्रेत) ठेवलेल्या चर्चमध्ये लपून बसला आणि त्याची करुणा भाकू लागला.* १६८४ च्या सुरुवातीला मुघलांच्या स्वराज्यावरील आक्रमणाची धार वाढल्याने महाराजांना ही मोहिमही अर्ध्यावर सोडावी लागली.
मात्र, त्यांच्या या प्रखर आक्रमणाने गोवेकर पोर्तुगीज मुळापासून हादरले. संभाजी महाराजांनी डिचोली परिसरात दारुगोळ्याचे कारखाने सुरू केले.
पोर्तुगीजांनी स्थानिक राजकारणात कोणाचीही बाजू न घेता केवळ व्यापारावर व आपल्या वसाहतींवरच लक्ष केंद्रित करावे असा खलिता त्यांना पोर्तुगीज राजाकडून प्राप्त झाला. अशा रीतीने दक्षिणेकडून होणारा गोवेकरांचा त्रास थांबवण्यात करण्यात छत्रपतींना यश मिळाले.
मुंबईस्थित वखार असणाऱ्या व मुंबई सारखे व्यापारी बंदर ताब्यात असणाऱ्या इंग्रजांशी मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी सलोख्याचा तह केला. एकतर इंग्रज त्यावेळी अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करत नसत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठ्यांना त्यांच्या दारुगोळा व आधुनिक शस्त्रास्त्रांची गरज होती. त्यामुळे, त्यांच्याशी युद्ध करण्यापेक्षा तह करण्याचा शहाणपणाचा व दूरदृष्टीपूर्ण निर्णय संभाजी महाराजांनी घेतला. *आजपासून सुमारे ३५० वर्षांपूर्वी मुंबई बंदर ९९ वर्षांच्या कराराने भाडेपट्टीवर न घेता पूर्ण स्वमालकीने घेण्यासाठी त्यांनी इंग्रजांवर दबाव आणला होता, मात्र काही कारणांनी तो पूर्णत्वास जाऊ शकला नाही.*
🖋 *दक्षिणस्वारी*
दक्षिणेकडे म्हैसूरचा राजा वडियार चिक्कदेवराज याने मराठ्यांशी केलेला तह मोडून मुघलांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा मात्र १६८६ मध्ये छत्रपतींनी म्हैसूरवर हल्ला करून त्याला चांगलेच वठणीवर आणले. स्वराज्याच्या दक्षिण भारतातील कन्नड-तामिळ प्रांतातील सुभ्याच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या संरक्षणाची यातून व्यवस्था झाली.
*त्रिचनापल्लीचा किल्लाही छत्रपतींनी सर्वोच्च धाडस व पराक्रम दाखवून जिंकून घेतला. दुथडी भरून वाहणाऱ्या त्रिचनापल्लीभोवतीच्या कावेरी नदीत घोडी घालून शंभूराजांनी हा तामिळ प्रदेशातील किल्ला म्हैसूरकर चिक्कदेवराजाकडून जिंकून घेतला.*
🔘 *भाग ६*
🗡 *महायुद्ध*🗡
🖋 *औरंगजेब दक्षिणेत*
१६६६ साली आग्र्यामध्ये आपल्या पित्याबरोबर हिंदुस्थानचा बादशहा औरंगजेब याच्यासमोर शंभुबाळ पहिल्यांदा उभा राहिला होता. *वडिलांच्या प्रखर स्वाभिमानाचे दर्शन त्यावेळी केवळ शंभुबाळांनाच नव्हे तर हिंदुस्थानच्या बादशहासह अखिल भारतवर्षातील राजा-रजवाडे, सरदार, मनसबदार आणि मांडलिकांना घडले होते.* *शिवरायांची ही तेज:पुंज प्रतिमा संभाजीराजांच्या मनावर कायमची कोरली गेली होती.*
१६६६ मध्ये स्वराज्याचे छत्रपती व युवराज औरंगजेबाला भेटायला आग्र्याच्या दरबारात गेले होते;तर एप्रिल १६८० मध्ये महाराज स्वर्गवासी झाल्यावर औरंगजेब १६८० मध्येच मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतींचा आणि पर्यायाने मराठा साम्राज्याचा नायनाट करण्यासाठी दक्षिण भारतावर चाल करून आला.
१६८० मध्ये दक्षिणेत आल्यापासून १६८२ पर्यंतच्या केवळ २ वर्षांत विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही यांचा पाडाव केला आणि त्यांचे सरदार व सैनिक यांना स्वतःच्या युद्धाच्या कामात जुंपले.
१६८२ मध्ये औरंगजेबाने आपला मोर्चा स्वराज्याकडे वळवला. _छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा पाडाव करणे ही एकदम सोपी गोष्ट बनली आहे असा त्याचा कयास होता._
*दक्षिणेत येताना औरंगजेब सुमारे ८ (आठ) लक्ष सैन्य व ४ (चार) लक्ष युद्धाची जनावरे (घोडे,हत्ती इ.) घेऊन आला होता.* तर, _छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूवेळी स्वराज्यात ४३१ लहान मोठे किल्ले, सुमारे १ लक्ष ५ हजार स्वार व १ लक्ष पायदळ होते._ मात्र हे सैन्य स्वराज्यातील सर्व किल्ले व भूभागावर विखुरलेले होते.
औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम गोव्यात तळ ठोकून होता. स्वतःचा सख्खा भाऊ अकबर याला आधी जेरबंद करून नंतर संभाजीला पकडू असा मनसुबा त्याने रचला होता. तर औरंगजेबाचा आणखी एक सरदार शहाबुद्दीन कोकणात मोहिमेवर होता.
औरंगजेब स्वतः नगरच्या किल्ल्यात तळ ठोकून होता.
पण, आपण कल्पना केली होती तेवढी ही मोहिम सोपी नाही याची जाणिव बादशहाला स्वतःला व त्याच्या राजपुत्राला आणि सरदारांनाही लवकर झाली. छोटेखानी असणारा नाशिकजवळचा माळशेजचा किल्ला केवळ ६०० जणांच्या मराठ्यांच्या सैन्याने सुमारे साडेसहा वर्षे लढवत ठेवला. एक छोटा भुईकोट किल्ला घ्यायला साडेसहा वर्षे या हिशोबाने स्वराज्यातील ४३१ किल्ले घ्यायला आपले सात जन्मही पुरणार नाहीत या कटू सत्यानेच औरंगजेब पुरता गांगरून गेला. त्याचे स्वास्थ्य पुरते हरवले. पैसे व वतनाचे आमिष दाखवून काही मराठा सरदार त्याने आपल्याकडे वळवले पण त्यातूनही फार मोठे यश बादशहाला लाभले नाही. यामुळे बादशहा निराश झाला.
तसे पाहता बादशहाच्या सैन्याने संख्याबळाच्या जोरावर मराठ्यांचे काही किल्ले जरुर जिंकून घेतले मात्र मुघलांची पाठ फिरताच मराठ्यांनी ते परत काबीज केले. मुघलांनी लढाया करून किल्ले जिंकायचे आणि पुढे जायचे आणि त्यांची पाठ फिरताच मराठ्यांनी ते परत काबीज करायचे असे दुष्टचक्रच मुघलांच्या पाठीमागे लागले. आपण या मोहिमेत पूरते अडकून गेलो आहोत याची तीव्र जाणिव औरंगजेबाला सतत होऊ लागली आणि आपण दक्षिण मोहिमेचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे तो मनोमन कबूल करत राहिला. पण,राजहट्टापुढे कोणाचे काही चालत नाही. मोठ्या लोकांच्या चुकाही मोठ्याच असतात!
🖋 *सरसेनापती व छत्रपती*
हंबीरराव मोहितेंसारखा सरसेनापती व छत्रपती संभाजी महाराजांसारखा शूरवीर नेता असेल तर हिंदुस्थानच्या बादशहालाही ते नामोहरम करू शकतात याची प्रचिती यातून येते.
'लढणाऱ्याची ताकद हातातल्या शस्त्रात नसते, तर हाताच्या मनगटात असते' हेच खरे !
१६८० ते १६८७ या सात वर्षांच्या काळात फुटकळ यश वगळता बादशहाच्या हाती काहीच लागले नाही.
१६८७ सालच्या एका लढाईत मात्र स्वराज्याचे भक्कम आधार असणारे सरसेनापती हंबीरराव धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सुरक्षिततेला धक्का पोहोचला. आपल्या हयातीत कायम निरपेक्ष साथ दिलेल्या आपल्या मामांच्या मृत्यूने संभाजी महाराज हळहळले. आपले वडील आबासाहेबांच्या मृत्यूनंतर प्रथमच छत्रपती एवढे हळवे झाले. या धक्क्यातून ते अखेरपर्यंत सावरू शकले नाहीत.
आणि,संकटे कधी एकटी येत नसतात...
🔘 *भाग ७*
🗡 *_जगदंब जगदंब_*🗡
🖋 *स्वकीयांकडूनच धोका*
छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश तळकोकणातील एक मोहिम संपून श्रमपरिहारासाठी संगमेश्वर मुक्कामी होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर खूप मोठे सैन्यदळ नव्हते. मुकर्रबखान,इखलास व गणोजी शिर्के अणुस्कुरा घाटामार्गे कोकणात उतरून छत्रपतींच्या मागावर जात होते. गणोजी शिर्के छत्रपतींचे सख्खे मेहुणे होते व घोडदळात सरदार होते. पण, _वतने न वाटण्याचे शिवाजी महाराजांचे धोरण संभाजी महाराजांनीही पुढे चालू ठेवल्यामुळे_ त्यांची स्वतःला वतन मिळावे ही मागणी सख्खे मेव्हणे असूनही संभाजी महाराजांनी धुडकावून लावली. यामुळे गणोजी शिर्के कायमचा दुखावला गेला. मुघलांना हाताशी धरून त्याने छत्रपती संभाजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कवी कलषांनी त्याचा हा हल्ला परतवून लावला व त्याचा पराभव केला. या सर्वांचा राग त्याच्या मनात होताच, त्यात औरंगजेब दक्षिणेत आल्याने गणोजीच्या सुप्त इच्छा व आशा-आकांक्षांनी चांगलीच उचल खाल्ली. स्वतःच्या छोटाशा स्वार्थासाठी तो स्वराज्याचा कट्टर शत्रू असणाऱ्या औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखानाला जाऊन मिळाला.
आणि... _पाहुण्याच्या काठीने साप मारणे हे तर राजकारणच आहे._ दुर्दैव इतकेच की या स्वराज्य स्थापनेचा उद्देश व महत्त्व घरच्यांनाच समजले नाही किंवा फालतू स्वार्थामुळे आंधळे झालेल्याला ते समजूनच घ्यायचे नव्हते.
'पेरते हात कितीही पुण्यवान असले तरी बियाणेच गणंग लागावे त्यास काय?' (संदर्भ :- 'छावा')
🖋 *विश्रांती'काळ'*
संगमेश्वराहून रायगडाकडे जाण्यापूर्वी त्या भागातील जनतेच्या अडचणी सोडवाव्यात म्हणून न्यायनिवाड्याला छत्रपती बसले होते. जवळच्या प्रदेशातून शत्रूसैन्याच्या हालचालीची कोणतीच खबर नसल्याने त्यामानाने सगळेच थोडेसे निवांत होते...आणि, आणि अचानकच राजांचे हेर मुकर्रबखान व त्याचे ६००-७०० सैन्य अगदी जवळ येऊन ठाकल्याची खबर घेऊन आला. अचानक झालेल्या या हल्ल्याने सर्व मराठा सैन्य गोंधळून गेले आणि सर्वत्र एकच धावपळ सुरू झाली. पाठीमागून आणखी हजार- बाराशेचे सैन्य मुकर्रबखानाला येऊन मिळाले. छत्रपतींचे मधल्या मध्येच अडकलेले साडेचारशे शिपायांचे सैन्य त्यामुळे केविलवाणे भासू लागले.
🖋 *प्रतिकार*
या गोंधळलेल्या परिस्थितीतून मराठा सैन्य लगेचच बाहेर पडले.
_या सैन्यात म्हाळोजी घोरपडेंसारखे सेनापती होते तर संताजी,धनाजी आणि खंडो बल्लाळसारखे लढवय्ये व तडफदार तरूण होते._
या सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांवरील हल्ला पाहताच शर्थीची व निकराची झुंज दिली. वयस्कर असणाऱ्या म्हाळोजींनी तर पराक्रमाची शर्थ केली आणि शेकडो तरुणांना लाजवेल अशी कामगिरी केली. छत्रपतींनी येसूबाई व दुर्गाबाईंच्या संरक्षणासाठी संताजी व धनाजीला त्यांच्या रणांगण सोडून न जाण्याच्या इच्छेविरुद्ध रायगडाकडे पाठवून दिले.
क्षणार्धात चारशे पाचशे मुस्लिम सैन्याच्या प्रेतांचा तिथे सडा पडला;पण अखेरीस मराठ्यांची ताकद कमी पडली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती कैद झाले.
🖋 *जिवघेणा प्रवास*
स्वराज्याच्या छत्रपतींना कैद झाल्याचे पाहताच मुकर्रबखान, इखलासखान आणि गणोजी शिर्केचा आनंद गगनात मावेनासा झाला.
त्यांनी छत्रपतींना व कवी कलशांना मेळघाट,रामदऱ्याचा घाट, मिरज अशा मार्गाने ४० दिवसांचा जिवघेणा बादशहाच्या छावणीपर्यंत आणले. मात्र, मराठ्यांच्या व छत्रपतींच्या ऐनवेळी उचल खाण्याच्या स्वभावाची माहिती व अनुभव असल्याने बादशहाने त्यांना दूरच थांबवायला सांगितले.
🖋 *आमनेसामने*
बादशहा जेव्हा प्रथमच कैदी बनलेल्या छत्रपतींना बघायला गेला त्या क्षणाचे अत्यंत रोमहर्षक वर्णन 'छावा'कार *शिवाजी सावंतांनी* पुढीलप्रमाणे केले आहे...
''आज या क्षणाला आग्र्यातल्या दरबारानंतर प्रथमच मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि दिल्ली तख्ताचा शहेनशाह औरंगजेब यांची इतकी वर्षे कुचमलेली 'नजरभेट' झाली!
जसे अंगपूत पेटलेल्या ज्योतीला वादळ बघत होते ! चिवट जीवशक्तीला सर्वग्रासी मौत बघत होती ! माणसाच्या मर्दपणाला राजकारणातले कपट न्याहाळत होते ! काफरी जिंदादिलीला तख्तनशीन मगरूरी पारखत होती! ''
'जखडबंद राजांना पायांपासून न्याहाळत, काळजात प्रचंड खळबळ माजलेली त्याची शाही नजर राजांच्या डोळ्यांवर येऊन खिळली. घालमेल घालमेल झाली नुसती त्याची. काळजाचा देठच हलला गेल्याचे आज पहिल्यानेच त्याला जाणवून गेले, '' इतने हुए बच्चे पैदा हमारे ! तैमूरका ये खानदान ! एक भी नाबकार की आँखे क्यों नही देखी हमने ऐसी ! आफताब से रिश्ता बतानेवाली! "
ती नजर नव्हतीच ! बघणाऱ्याचे काळीजच पोखरून टाकील अशी, कुणालाही जाणवावी अशी डोंगरटोकावर बसलेल्या गरुडपक्षाची चोचच होती ती ! ती नजर आणि पापण्यांचा काठ फोडून टाकत उतू जाणारी नफरतच, एवढा काळीजकठोर औरंगजेब,पण त्यालाही जाणवली.
गर्दन वर करून बघणाऱ्या माणसाची त्याला कधीच सवय नव्हती आणि अशा फेकून देणाऱ्या नफरतीची तर नव्हतीच नव्हती. (संदर्भ व उद्धृत- 'छावा', लेखक - शिवाजी सावंत)
🗡 *अंत*
अत्यंत शारीरिक छळ करून बहादूरगड, मौजे पेडगाव, ता. श्रीगोंदा येथे छत्रपतींची धिंड काढली गेली व ११ मार्च, १६८९ रोजी मौजे तुळापूर येथे इंद्रायणी व भीमा नदीच्या काठी त्यांची निघृण हत्या करण्यात आली.
"राजन् हो तुम साँचे खूब लड़े तुम जंग !
तुव तप तेज निहारके तखत त्यजत् औरंग!"
केवळ दोनच वर्षांत मराठा साम्राज्य धुळीस मिळविण्याच्या हेतूने दख्खनला आलेला बादशहा पुढील २७ वर्षे इथेच अडकून पडला आणि १७०७ साली जर्जर व गरीब अवस्थेत त्याचा मराठा भूमीतच अंत झाला आणि त्याच्या साम्राज्याच्या अंताची सुरुवातही इथेच झाली! पुढील १०० वर्षांत अखिल भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार झाला आणि मुघल साम्राज्य ऱ्हासास गेले.
अखेरीस शिवछत्रपतींनी लावलेल्या बीजाचा महाप्रचंड वटवृक्ष झाला!!!
"श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव जायते,
यदंक सेविनो लेखा वर्तते कस्य नोपरी॥"
(छत्रपती संभाजी महाराजांची राज्याभिषेकानंतरची राजमुद्रा)
केवळ धर्मवीर नाही तर स्वातंत्र्यवीर आणि सिंहाचा छावा असलेल्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना आणि ज्यांच्या हौतात्म्यामुळे मराठी मुलखाचीच नव्हे तर अखिल भारतभूची शान वाढली त्या शिवपुत्र 'रुद्र' असणाऱ्या शंभुराजांच्या चरणी अर्पण...
(समाप्त)
© 2016,Author-Dr.Amit Tukaram Patil
Very hard working analysis of great maratha history. The Shivaji is reborn again with sword of word.
ReplyDeleteThank you very much, Sir.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletekhupach chhan Amit.
ReplyDeleteThank you very much Santosh. Your support is appreciated.
ReplyDeleteVery Nice Written..
ReplyDeleteVery good Amit sir. Very informative
ReplyDeleteसर खूपच छान धन्यवाद
ReplyDelete