‘आबांच्या पश्चात मागे राहिलेल्या’ ‘आबांच्या-आईचा’ वेदनादायी ‘मदर्स डे’! (Mother's day with regards to a Mother who has lost her Son)

*‘आबांच्या पश्चात मागे राहिलेल्या’ ‘आबांच्या-आईचा’ वेदनादायी ‘मदर्स डे’!!!*
*(आबांसारख्या कर्तृत्ववान पुत्राला गमावलेल्या ‘आबाच्या आईची’ व्यथा!)*

आबांच्या-आई या माझ्या सख्ख्या आजी आहेत आणि मी त्यांना लहानपणापासून ‘मामाच्या-आई' अशी हाक मारतो.

(© डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस.,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ')
(प्रस्तुत लेखक हे मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)
(© या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय हा लेख अंशतः किंवा संपूर्णपणे  प्रकाशित करता/छापता/पुढे पाठविता येणार नाही.)
(आबांच्या अंतिम काळात प्रस्तुत लेखक प्रत्यक्ष त्यांच्यासोबत होते.)

≈≈≈ पूर्वपीठिका ≈≈≈

Everyone is afraid of dying,
Until you lose a child...
Then, you are afraid of living...
(मरणाला प्रत्येकजण घाबरतो,
तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाला गमावत नाही...
त्यानंतर, तुम्ही जगण्याला घाबरता...)

आपण रोजच्या जीवनात ज्याचा अनुभव घेतो; जे आपल्याला माहिती आहे; तेच ‘ग्लोरिया व्हॅन्डरबिल’च्या शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल, “ मी असे ऐकले आहे की, मानवी जीवनात स्वतःच्या मुलांना गमाविण्याइतके दुसरे मोठे दुःख नाही. हे खरे आहे. ते तुम्हाला बदलत नाही; तर ते तुम्हाला उद्ध्वस्त करते. त्यानंतरचे तुमचे संपूर्ण जीवन तुम्ही वेगळ्या पातळीवर जगता.”

वैद्यकीय क्षेत्रात एक डॉक्टर म्हणून काम करताना रुग्णांच्या मृत्यूच्या निमित्ताने मरणाशी आमची रोज नव्याने ओळख होत असते. एखादा रुग्ण मरण पावल्यावर त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या नातेवाईकांना देण्याचे काम मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप कठीण असते.

पण, जर रुग्ण एखादा तरूण असेल आणि त्याच्या आई-वडिलांना (शक्यतो अशा वेळी वडीलच असतात; कारण आपल्याकडे रुग्ण अत्यवस्थ असेल तर त्याच्या घरातील स्त्रियांना शक्यतो दवाखान्यात आणले जात नाही.) त्याच्या मृत्यूची बातमी द्यायची असेल तर त्यासारखे कठीणतम दुसरे काम नाही. कारण, अशावेळी त्या आई-वडिलांनी केवळ आपला भूतकाळच नव्हे तर वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ही गमावलेला असतो...त्यांनी स्वतःच्या शरीराचा एक तुकडा गमावलेला असतो...त्यांनी आपल्या पोटचा गोळा गमावलेला असतो...त्यांनी आपला स्वतःचा अंश गमावलेला असतो...

त्या मृत व्यक्तीच्या आईने तर आपले सर्वस्व गमावलेले असते; कारण तिच्या 'त्या' पाडसाला ती जगातील इतर सर्वांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते; त्या बाळाच्या हृदयाचे पहिले ठोके तिनेच ऐकलेले असतात आणि आता आम्ही डॉक्टर तिला तिच्या बाळाच्या हृदयाच्या पडलेल्या शेवटच्या ठोक्याबद्दल सांगत असतो. एवढ्या एका गोष्टीसाठी मला डॉक्टर झाल्याचे कधीकधी दुःख वाटते!

अशाच एका ‘आई’बद्दल मी लिहितोय. ती आबांची आई!
आबांसारखा कर्तृत्ववान पुत्र स्वतःच्या पोटी जन्माला आला आणि त्याला घडवता आले यासाठी तिला ‘नशीबवान’ ठरवावे की, अनेकांचा आदर्श ठरलेला हा मुलगा तिला मागे टाकून निघून गेला म्हणून तिला ‘कमनशिबी’ ठरवावे, हे मला माहिती नाही...माझ्या आयुष्यात तरी मला कधीच या प्रश्नाची उकल होणार नाही...

माझ्या आईच्या/मामांच्या आईंना, म्हणजे माझ्या आजींना 'आजी' शब्द फारसा रुचत नव्हता आणि नाही. मी माझ्या आजोळच्या पुढच्या पिढीतला पहिला मुलगा (म्हणजे, मुलामुलींत मी पहिल्यांदा जन्माला आलो.)! म्हणजे, माझ्या आजींचा मी पहिला नातू! त्यामुळे, आजींना मी ज्या नावाने हाक मारणार होतो, ते नाव मी पुढच्या भावंडांसाठी 'सेट' करणार होतो. मी माझ्या आजींना 'आजी'ऐवजी 'मामाच्या-आई' म्हणायला सुरुवात केली (म्हणजे घरच्यांनी माझ्याकडून करवून घेतली असेल) आणि आजही मी, माझा भाऊ आणि माझी मावस भावंडे आजींना 'मामाच्या-आई'च म्हणतो. आणि, आबा आमचे मोठे मामा; त्यामुळे साहजिकच त्यांना आम्ही भाचे 'मोठे मामा' म्हणतो!

१६ ऑगस्ट, १९५८ रोजी आबांचा जन्म झाला. आबांच्या आजींनी त्यांचे नाव 'रावसाहेब' ठेवले आणि आई-वडिलांनी तसेच ते रेकॉर्डला लावले. त्यावेळची घरची परिस्थिती पाहता, ‘रावसाहेब’ हे नाव घराबाहेरच्या कुणाच्या फार पचनी पडले नसेल! पण, आबांच्या आजींचा आणि आई-वडिलांचा आपल्या मुलाबद्दलचा आत्मविश्वास त्यातून जाणवतो. कदाचित ‘मुलाचे पाय त्यांना त्यावेळीच पाळण्यात दिसले’ असावेत! अशा आई-वडिलांचा मुलगा कर्तृत्ववान न निपजेल तर काय!

आबा आज मोठे झाले म्हणून नव्हे; पण मामाच्या-आई (आजोबा माझ्या जन्मापूर्वीच हे जग सोडून गेले होते), माझी आई-मामा, चुलत आजी-आजोबा, मोठ्या मामांचे (आबांचे) चुलत भाऊ-बहिणी नेहमी हेच सांगतात की, मामा (आबा) लहानपणापासूनच खूप आदर्शवादी आणि तत्त्वनिष्ठ जीवन जगायचे. ते लहानपणापासून खूप अभ्यासू आणि ध्येयवादी होते. त्यामुळे त्यांनी त्याबाबतीत त्यांच्या आई-वडिलांना काही फार त्रास दिला नाही. मात्र, आई-वडिलांचा स्वभाव कडक होता, हेही खरेच.

मामांच्या-आई आजही जेव्हा मामांच्या आठवणीने व्याकुळ होऊन हमसून हमसून रडत काही आठवणी सांगतात, तेव्हा दोन गोष्टींचा त्या आवर्जून उल्लेख करतात. एक म्हणजे, आबांनी सहावीत असताना तत्कालीन कॅबिनेट मंत्री मान. राजाराम (बापू) पाटील (राज्याचे माजी अर्थमंत्री श्री. जयंत पाटील यांचे वडील) यांना तासगाव भागात त्यावेळी पडलेल्या भीषण दुष्काळाबाबत लिहिलेले पत्र! या पत्राला बापूंचे उत्तर तर आलेच; शिवाय एवढ्या लहान वयाच्या विद्यार्थ्याने अशा गंभीर विषयावर खुद्द एका कॅबिनेट मंत्र्याला पत्र लिहिले आहे याचे कौतुक वाटून त्यांनी वाळवा येथे लहानग्या 'रावसाब'ला भेटायला बोलावले. राजारामबापूंनी उत्तर म्हणून पाठविलेले पत्र आजही मामांच्या-आईंनी आपल्या ट्रंकेत सांभाळून ठेवले आहे आणि अधूनमधून ते छातीशी कवटाळून त्या एकट्याच रडत बसतात. दुसरी गोष्ट म्हणजे,  मोठे मामा (आबा) मॅट्रिकच्या परीक्षेत सावळज केंद्रात पहिले (आणि, काही विषयांत जिल्ह्यात पहिले) आले, ते गुणपत्रक (मार्कलिस्ट)! ते गुणपत्रकही त्यांनी आपल्या ट्रंकेत जपून ठेवले आहे. ते गुणपत्रक म्हणजे केवळ 'आकडे' नाहीत. ते खरंच आबांचे 'गुणदर्शन' घडवितात. मामांचे वडील (आजोबा) मरण पावल्यानंतर फक्त दोन दिवसांत आबांनी मॅट्रिकची परीक्षा दिली होती. परीक्षेला जाताना आबांना घालायला कपडे नव्हते. शेवटचा पर्याय म्हणून मामांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर टाकून दिलेले कपडे अल्टर करून आणले होते आणि ते घालून आबांनी मॅट्रिकची परीक्षा दिली होती. स्वतःच्या पतीच्या निधनानंतरही जास्त न रडलेल्या 'आबांच्या-आई' आबांच्या अंगातील पतीचे कपडे पाहून त्यांना छातीशी कवटाळून रडल्या होत्या. आज आबांच्या निधनानंतर माझ्या मामांच्या-आई आबांचा फोटो, 'ते' पत्र आणि 'ते' गुणपत्रक हातात घेऊन धाय मोकलून रडताना कित्येकांनी पाहिले आहे. त्या 'पत्रात' आणि 'गुणपत्रिकेत' 'त्या' आईला तिच्या कर्तृत्ववान पुत्राचा चेहरा दिसत असणार, हे नक्की!

प्रत्येक आईला तिच्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी येत असतातच; पण जर ते बाळ तिला कायमस्वरुपी सोडून गेले तर त्या आईचे उर्वरित आयुष्य तिच्या मुलाच्या आठवणी काढत कंठावे लागते.



मी आता थोडासा पुढे सरकतोय. मामांच्या-आईंच्या इच्छेविरुद्ध मोठे मामा राजकारणात गेले. बी. ए. आणि नंतर एल. एल. बी. च्या परीक्षेत मामा विद्यापीठ गुणवत्ता यादीतून उत्तीर्ण झाल्यावर आजोबांच्या निधनापश्चात घरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मामांनी वकिली करून घराला हातभार लावणे आवश्यक होते. मात्र, स्वतःच्या अंतरात्म्याचा कौल स्वीकारत मामा राजकारणासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात आले. १९७९ साली आबा जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यावेळीही रहायला मातीची एकच पडकी खोली असल्याने मोठे मामा आणि मधले मामा गावातल्या एका मंदिरात झोपायचे. जि. प. सदस्य झाल्यानंतरही मोठे मामा आणि मामांच्या-आई वाटणीला आलेल्या शेतात रात्रपाळीला पाणी पाजायला जायचे. आज आबा या जगात नसताना मामांच्या-आई जेव्हा त्याच शेतात जातात, तेव्हा कदाचित आमच्या लक्षात येत नसेल; पण त्यांच्या डोळ्यांत जुन्या आठवणींमुळे तरळणाऱ्या अश्रूंच्या रुपात त्यावेळचं पाटाचं ते पाणीच येत असेल. आज शेती आहे, मामांच्या-आई आहेत, पाटही आहे आणि थोड्याफार प्रमाणात त्या पाटात पाणीही आहे; पण... पण, रात्रपाळीला जागून शेताला पाणी पाजायला मदत करणारा त्या आईचा लाडका 'रावसाब' मात्र कुठेही नाही!!!

१९९० ला मामा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. नंतर, १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा सलग सहा विधानसभा निवडणुका मामांनी जिंकल्या. १९९६-९७ साली मामा लोकलेखा समितीचे सदस्य झाले. १९९९ साली त्यांच्या विरोधी पक्षातील कामाच्या जोरावर ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता या महत्त्वपूर्ण विभागांचे थेट कॅबिनेट मंत्री झाले; डिसेंबर २००३ मध्ये पहिल्यांदा गृहमंत्री झाले; २००४ मध्ये उपमुख्यमंत्री झाले; २००९ साली परत गृहमंत्री झाले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते तीन वेळा अध्यक्ष झाले. सलग ६-६ वेळा विधानसभेवर निवडून येणारे काही नेते असतील; मंत्री, पक्षाध्यक्ष होणारेही बरेच नेते असतील; पण ज्यांचे निधन झाल्यानंतरही राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये ज्या अनेक गोष्टींपैकी दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे आबांचे नाव टिकून राहिले आहे, त्या म्हणजे, त्यांचा 'साधेपणा' आणि त्यांचे 'स्वच्छ चारित्र्य'! या दोन गोष्टी मामांच्या-आईंनी त्यांच्यात लहानपणापासून बिंबवल्या होत्या. पतीनिधनानंतर टोकाच्या गरिबीचं जीणं जगत असतानाही आपली आई कुणाही समोर कशाहीसाठी हात न पसरता -साधेपणाने का असेना- स्वतःच्या हिंमतीवर घर चालवते हे आबांनी पाहिले होते. तो आईने आपल्या कृतीतून शिकवलेला साधेपणा आबा कधीच विसरले नाहीत. “पोरांनो, तुमी आयुष्यात कुटलं बी काम करा; पर कुणाच्या वाळ्ळ्या (वाळल्या) पाचुळ्यावर पाय दिऊ नगा,” हे मामांच्या-आईंनी लहानपणापासून तिच्या सगळ्या मुलांच्या मनावर बिंबवले होते. आबांच्या (आणि त्यांच्या भाऊ-बहिणींच्या) स्वच्छ चारित्र्यामागे आणि आबा राजकारणासारख्या भ्रष्ट लोकांनी भरलेल्या क्षेत्रात राहूनही त्यांच्या शेवटापर्यंत मिस्टर क्लीन राहण्यामागे त्यांच्या आईची ही साधीसोपी शिकवण होती.

आबा ६-६ वेळा आमदार आणि १५-१६ वर्षे मंत्रीपदावर राहूनही त्यांच्या आईच्या अंगावर सोन्याचा एक नवीन दागिनाही आला नाही, त्यामागे ही विचारसरणी होती.

एक आठवण सांगतो. साधेपणा, निरागसता (innocence) आणि नम्रपणा किती टोकाचा असू शकतो, त्याचे एक उदाहरण! २००३ सालची गोष्ट आहे. एकदमच तंतोतंत सांगायचे तर, तो दिवस होता २५ डिसेंबर, २००३ चा. नेहमीप्रमाणे मामांच्या-आई शेतावर गेल्या होत्या. मला सुट्टी असल्यामुळे मी अंजनीत होतो. संध्याकाळचे ४-४.१५ वाजले असावेत. मोठ्या मामांच्या 'चित्रकूट' या शासकीय निवासस्थानावरून अंजनीतल्या घरच्या नंबरवर एक फोन आला. “आबांची राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून निवड झाली आहे,” असा निरोप मला मिळाला. मी तो धाकट्या मामांना आणि गावातल्या इतरांना सांगितला. गावात सर्वांनी साखर वाटायला चालू केले. फटाके वाजू लागले. शुभेच्छांचा वर्षाव चालू झाला. यात मामांच्या-आई कुठेच नव्हत्या. आमच्या सगळ्यांच्या हे लक्षात आले. धाकटे मामा मला म्हणाले, “ अमित, गाडी घेऊन जा. आईला घरी घेऊन ये. जोतिबाच्या मळ्यात बायकांच्याजवळ (काम करणाऱ्या स्त्रिया) आहे ती!” मी पटकन निघालो. मामांच्या-आईंजवळ गेलो. त्यांना निरोप दिला. गृहमंत्री म्हणजे नक्की काय हे त्यांना पूर्णपणे माहिती नव्हते. पण, आपला 'रावसाब' आणखी मोठा झाला एवढं त्यांना समजलं. त्यांना मी घरी घेऊन आलो. टी. व्ही. वर मामांची मुलाखत लागली होती. आपल्या जडणघडणीतला आईचा वाटा किती मोठा आहे, हे सांगताना  मामा डोळ्यांत येणारे अश्रू महत्प्रयासाने थांबविण्याचा प्रयत्न करत होते, तर इकडे त्यांची आई, म्हणजे ‘आबाची-आई’ ते ऐकताना रडत होती.

पुढे पुढे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आबांचे पद आणि मान-सन्मान वाढू लागले. जसजसे आबा मोठे मोठे होऊ लागले, तसतसे ते लोकांच्या-सामान्य जनतेच्या गराड्यात जास्त आणि घरात कमी-कमी राहू लागले. आणि मग, आमच्या घरच्या 'मामांच्या-आई' मतदार संघातील आणि बाहेरील लोकांच्यासाठीही 'आबाच्या-आई' बनल्या. घरची सगळी जबाबदारी परत एकदा त्यांच्यावर येऊन पडली. दिवस पुढे पुढे सरकत राहिले...

१ नोव्हेंबर, २००४ रोजी उभ्या महाराष्ट्राने एक गोष्ट पहिल्यांदाच अनुभवली. आबा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, त्यांचे हात कापू लागले आणि आवाजाला काही काळासाठी कंप सुटला. थरथरणारे आबा पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. पत्रकारांच्या नजरेतून अशी गोष्ट सुटेल तर आश्चर्य! संध्याकाळी मुलाखत घेताना पत्रकारांनी मामांना याबद्दल विचारले. मामा म्हणाले, “ हो, मी काही क्षण भावुक झालो हे खरे आहे. माझी आई समोर होती. ज्या आईबरोबर टोकाच्या गरिबीत मी 'हाती' नांगर धरला, शेती केली, कष्ट केले, मेहनत घेतली; त्या आईसमोर, तिच्या जिद्दीमुळे आणि शिकवणीमुळे माझ्या 'हातात' आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेचा कागद आला होता... मग, माझी अवस्था काय होणार होती?” त्यादिवशी सर्व संभाव्य मंत्र्यांनी आपापल्या पत्नीला आपल्या शेजारच्या खुर्चीत बसवले होते, त्यादिवशी आबा संपूर्ण मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री होते ज्यांनी आपल्या शेजारी आपल्या पत्नीला नव्हे तर आईला बसविले होते... एका जिद्दी 'मातेचे' आणि तिच्या तितक्याच कर्तृत्ववान 'पुत्राचे' अश्रू एकरूप झाल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिले होते! धन्य ती माता अन् धन्य तो तिचा मुलगा!! एरव्ही मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होणारा 'मदर्स डे' त्यावर्षी नोव्हेंबरच्या १ तारखेला साजरा झाला होता !!!



≈≈≈ उत्तरपीठिका ≈≈≈
१६ फेब्रुवारी, २०१५.
संध्याकाळचे ४.३० वाजले आहेत.
मुंबईतील लीलावती रुग्णालयातील ११ व्या मजल्यावर एक आई धाय मोकलून रडत आहे...तिच्या कर्तृत्ववान मुलग्याची मृत्यूशी गेले ३ महिने सुरू असलेली झुंज संपली आहे...तिचा अत्यंत लढाऊ मुलगा आयुष्यात आज पहिल्यांदाच पराभूत झाला आहे...आणि, जाताजाता त्या पुत्राने आपल्या 'आईचाही पराभव केला' आहे...जीवनमरणाच्या या चक्रात 'तो' आईला मागे सोडून खूप पुढे निघून गेला आहे...त्यांचे भविष्य सांगताना लहानपणी एक ज्योतिषी वदला होता, “ हा मुलगा खूप मोठा होईल, घराण्याचं नाव काढेल. आई-बापाचं नाव मोठं करेल. पण, स्वतःच्या आई-बापाला त्यांच्या मृत्यूसमयी अग्नी देणे त्याच्या नशिबात नाही.”...आबांनी ते तंतोतंत खरे करून दाखवले होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी जवळ पैसे नसल्यामुळे आणि वाहतुकीची व्यवस्था न झाल्याने आबा वेळेत पोहचू शकले नव्हते. आणि, आता तर ते आईच्याही पुढे निघून गेले होते.

मोठ्या मामांनी शेवटचा श्वास घेतला त्यावेळी मी त्यांच्याजवळ होतो. दहा मिनिटांनी आम्ही मामांच्या निधनाची बातमी मामांच्या-आईंना सांगितली होती. त्या कोसळून गेल्या होत्या. “अमित, तू घरचा डॉक्टर असूनही तुझ्या मोठ्या मामाचा आजार बरा करू शकला नाहीस. तू डॉक्टर होऊन तरी काय फायदा?”, हे त्यांचे शब्द कुणीतरी माझ्या कानात शिशाचा रस ओतावा तसे घुसत होते. आम्ही सारेच सुन्न झालो होतो.

आबा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक कार्यतत्पर, मनमिळावू, सामान्य जनतेच्या समस्यांचा चांगला अभ्यास असणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात तुफान गर्दी झाली होती. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची सर्वांचीच इच्छा होती. मामांच्या-आईंनी आबांना शेवटचे भेटणे गरजेचे होते; कारण आयुष्यभर लोकांच्या गराड्यात राहिलेले आबा मृत्यूनंतरही लोकांची साथ सोडणार नव्हते!

दिवाळीनंतर सलग तीन आठवड्यांपासून गायब असलेल्या आबांचे जबड्याचे ऑपरेशन झाल्याची बातमी एका वर्तमानपत्रात आल्यानंतर आम्हाला समजली होती. मी ५ डिसेंबर, २०१४ रोजी ब्रीच कॅंडी रुग्णालयात आबांना रात्री ११.३० वाजता भेटलो होतो. मी डॉक्टर असल्याने त्यावेळी मला मामांचा आजार आणि त्यांचे गांभीर्य यांची कल्पना होती (मात्र, मोठे डॉक्टर्स आबांना यातून बाहेर काढतील असा माझा भाबडा विश्वास होता). मी १० मिनिटे मामांच्या जवळ होतो. थोडी विचारपूस झाल्यानंतर मी निरोप घेताना मोठ्या मामांच्या पाया पडलो. उठताना मामा मला म्हणाले, “हे बघ अमित, हे काही सगळं तू घरी सांगू नको. आईला तर काहीच बोलू नकोस, तिला हे काही सहन होणार नाही. मी अशा अवस्थेत तिला भेटू इच्छित नाही. संपूर्ण बरा झाल्यावर एक-दोन आठवड्यांत मी गावी जाऊन आईला भेटतो. तू जर बाकीचं काही आईला बोललास तर मला आयुष्यात परत भेटू नकोस.” “हो मामा, मी कुणाला काही बोलणार नाही”, असे सांगून मान हलविण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय माझ्यासमोर होता!

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी मामांच्या-आई आणि मामी मुंबईला गेल्या. आबांना भेटल्या. “आई, माझ्या दाढेला जरा सूज आल्यामुळे माझं डॉक्टरांनी एक छोटं ऑपरेशन केलंय. आता बरा झालो आहे. विशेष काही काळजी करण्याचं कारण नाही. थोड्या दिवसांतच मी अंजनीला येणार आहे.” मामांच्या-आई काही बाकीचं बोलल्या नाहीत. फक्त “बरं” एवढ्याच बोलल्या. त्यांना त्यांच्या बाळाला जवळ घेऊन रडायचं होतं; पण सगळ्यांनी त्यांना ‘आबांसमोर रडू नको’ असे सांगितल्यामुळे त्यांनी कसेबसे स्वतःला आवरले होते. मोठ्या मामांच्यासमोर त्या रडल्या नसल्या तरी बाहेर आल्यावर त्या कितीतरी वेळ रडत होत्या. आजपर्यंत त्या तशाच रडत आहेत आणि त्यांना नक्की काय सांगून समजवायचे हे आम्हाला आजपर्यंत समजले नाहीए.

नंतर, आबांचे 'रेडिएशन' उपचार सुरू झाले. रेडिएशन उपचार म्हणजे, ‘आजारापेक्षा उपचार भयंकर’ अशी स्थिती. ‘तुम इतना क्यूँ मुस्कुरा रहें हो? क्या दर्द है जिसको छुपा रहें हो?’ अशी तंतोतंत अवस्था! आईला वाईट वाटू नये आणि अन्य नातेवाईकांचा धीर खचू नये म्हणून आबा स्वतःचा चेहरा हसतमुख ठेवण्याचा प्रयत्न करीत असत. डिसेंबरमध्ये एके दिवशी अचानक मामांचे हृदय बंद पडले (Cardiac Arrest). आबा त्यादिवशी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. तोही धक्का मामांच्या-आईंनी मोठ्या धीराने पचवला. पण, आपल्या जीवाचा तुकडा असणाऱ्या 'रावसाब'ची तब्येत ढासळत चालली आहे हे त्या 'जन्मदात्री'ला समजत होते... आणि, स्वतःच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी मी स्वतः काहीच करू शकत नाही, ही हतबलता त्यांच्यात आली होती. त्या देवाला बोल लावत होत्या. “माझं उरलेलं सगळं आयुष्य माझ्या पोराला दे, त्याच्याशिवाय जगून मी काय करणार आहे? देवा, आयुष्यात मी तुला कधीच काही मागितले नाही; आता माझं एवढं तरी ऐक रे!,” अशी त्यांची आर्त विनवणी होती. परंतु, देव काही ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
एक एक दिवस आम्ही ‘ढकलत’ होतो. मामांना Cardiac Arrest झाल्यानंतर त्यांना विश्रामगृहात ठेवायला डॉक्टरांनी ठाम नकार दिला. त्यांना मग लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिल्यांदा प्रकृती थोडी थोडी सुधारत असल्यामुळे आबांना विशेष कक्षात ठेवण्यात आले होते. एक-एक दिवस जात होता. दरम्यानच्या काळात मामांच्या-आईंनी मामांबद्दल एक निरीक्षण केले होते किंवा त्यांच्या ते विशेषत्वाने लक्षात आले होते. “रोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत 'रावसाब' जास्त अस्वस्थ होतो बघ, अमित. रोज ह्यावेळी त्यो एकटक भिंतीवरच्या श्री दत्त आणि स्वामी समर्थाच्या फोटोकडं बघत राहतो”, असे त्या मला म्हणाल्या. “ह्या वेळेत एकदा तू डाक्टर सायबास्नी आबाला तपासायला सांग”, असेही त्या पुढे म्हणाल्या. मी डॉक्टरांना तशी विनंती केली. डॉक्टरांनी ती मान्य करून त्या वेळेत आबांना तपासले त्यावेळी आबांच्या श्वासाची गती खेळ वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तात्काळ आबांना अतिदक्षता विभागात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. आबा परत बाहेर आलेच नाहीत. एवढे मोठे डॉक्टर दिमतीला असतानाही त्यांच्या कोणाच्याही ही गोष्ट लक्षात न येता चौथीही धड न शिकलेल्या एका वयस्कर स्त्रीच्या लक्षात ती गोष्ट यावी यात वैद्यकीय ज्ञानापेक्षाही एका आईची आपल्या पोटच्या गोळ्याबद्दलची ओढ, कसल्याही परिस्थितीत त्याला अडचणींतून बाहेर काढण्याची जिद्द या गोष्टी जास्त संबंधित होत्या. केवळ एक आईच हे करू जाणे!

त्यानंतर मोठ्या मामांना अतिदक्षता विभागात जाऊन मामांच्या-आई दिवसातून किमान पाच-सात वेळा भेटून यायच्या. दोघांनाही एकमेकांना पाहिल्या-भेटल्याशिवाय चैन पडायचा नाही. मामांच्या-आई बाहेर येऊन खूप रडायच्या-सावरायच्या-आणि परत रडायच्या. आपल्या लेकरासाठी कोणताही त्याग करायला त्या तयार होत्या.

हळूहळू मोठ्या मामांची प्रकृती लक्षणीयरीत्या खालावली. कोणत्याच उपचारांना त्यांचे शरीर दाद देईनासे झाले. आजार खूपच पसरून शरीराच्या सगळ्या यंत्रणा काम कमी प्रमाणात करू लागल्या. केमोथेरपीसारख्या भयानक उपचारांचा मामांच्या शरीरावर विपरीत व अनिष्ट परिणाम होऊ लागला. त्यांना फुफ्फुसदाह (Pneumonia) झाल्याने श्वास घेता येईनासे झाले. बोलणे बंद झाले. त्रास थोडा कमी व्हावा म्हणून आबांच्या घशाला छिद्र पाडण्यात आले (Tracheostomy). आबांचा आवाज गेला. ज्या आवाजाच्या आणि गळ्याच्या ताकदीच्या जोरावर आबांनी अखंड महाराष्ट्रातील लोकांची मने जिंकली, त्याच गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने आबा आणखीनच खचले!

जेव्हा मोठ्या मामांना बोलायला यायचे बंद झाले, त्यावेळी ते आईशी बोलताना हातवारे करीत असत. एवढ्या गंभीर परिस्थितीतही आई जवळ आल्यावर आबा हसण्याचा प्रयत्न करायचे. मृत्यूआधी ४८ तास आबा कोम्यात गेले. त्याआधी त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती. दुखणे अतितीव्र स्वरुपाचे असल्याने आबांना अन्य बऱ्याच औषधांबरोबर झोपेची औषधेही मोठ्या प्रमाणात दिली जायची. कोम्यात जायच्या अगोदर आबांना त्यांच्या मृत्यूच्या जाणिवेमुळे असो किंवा अन्य कोणत्याही कारणाने का असेना; आबांनी डॉक्टरांना पेन आणि पेपर पुरविण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टरांनी ती त्वरीत मान्य करून आबांना ते साहित्य पुरविले. आबांच्या उजव्या हाताला खूप सूज होती. तो हातही आबांना धड हलविता येत नसे. तरीही आबांनी पेन हातात धरले. बहुधा त्यावेळी सुप्रियाताई हजर होत्या. सर्वांनी आबांच्या हातातील पेपर पॅडला थोडा आधार दिला. आबा आता काय लिहिणार अशी सर्वांना दुःखमिश्रित उत्सुकता होती. अखेरीस आबांनी सर्व ताकद एकवटून ते 'दोन शब्द' लिहिले. आबांनी लिहिले होते, ‘माझी आई!’ ते पाहून डॉक्टर्स आणि सुप्रियाताईंसह आम्ही सगळेच भावनाविवश झालो! “माझ्या पश्चात माझ्या आईची काळजी घ्या”, इतके सांगण्यासाठी आबांनी आपले बळ एकवटले होते. खरेच, आबांच्या आपल्या आईवरील प्रेमाला आणि तिच्याबद्दल स्वतःच्या अंतिम क्षणीही वाटणाऱ्या काळजीला कसलीच मर्यादा नाही!

यानंतर मामांच्या-आईंची कोणत्याच प्रकारे आम्हाला समजूत काढता आली नाही...अगदी आजपर्यंत... अखेरीस १६ फेब्रुवारीला मामा हे जग सोडून निघून गेले.

संध्याकाळी ५ वाजता आबांच्या-आईंनी आबांचे अंतिम दर्शन घेतले. मी आणि मामांच्या-आई (आबांच्या-आई) एकाच गाडीत बसलो होतो. आबांचा अंतिम प्रवास चालू झाला होता.

आबांचे पार्थिव प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. आईंना सावरणे कठीण झाले होते. मामांच्या-आईंना जेव्हा पक्षकार्यालयात मामांना जेथे ठेवले होते त्याठिकाणी आणले गेले त्यावेळी आईंनी त्यांच्या शवपेटीवर स्वतःचे डोके आपटून घेताना सबंध राज्याने पाहिले. ते पाहणाऱ्या सगळ्या मातांना आपल्या लाडक्या बाळाचा वियोग होणे किती त्रासदायक असते ते जाणवले होते...‘ये हृदयांतरीचे ते हृदयी..!’ जाणवले होते.

त्यानंतर अंजनीकडे आबांना घेऊन जाण्याचा वेदनादायी प्रवास सुरू झाला. माझ्या आयुष्यातील तो सर्वांत कठीण आणि वेदनादायी प्रवास! मी आणि मामांच्या-आई एकाच गाडीत होतो. मुंबईतून जसजशा आमच्या गाड्या बाहेर पडू लागल्या तसतशा 'आबांच्या-आई' हमसून रडत म्हणत होत्या, “माझ्या बाळा, माझ्या पोरा, मुंबईत येताना तू कसा आला होतास आणि आता जाताना कसा चाल्लायंस? आईवर नाराज झालास का रे लेकरा? का मला सोडून निघाला आहेस?”...जी मुंबई आपल्या कार्यकर्तृत्वाने आबांनी जिंकली होती, ती आज ते अशा पद्धतीने सोडत होते...सगळंच विचित्र आणि अनपेक्षित!!!

संपूर्ण प्रवासात आम्ही कोणीच झोपलो नाही. मामांच्या-आईंनी तर अन्न राहू दे, पण पाण्याचाही घोट घेतला नव्हता. कोणत्याही भाषेत त्यांना त्यावेळी (आणि आजही) शक्य नव्हते! आम्ही सगळे दुःखसागरात बुडलो असलो तरी आबांच्या-आईशी आम्ही समदुःखी नव्हतो. मी मामांना गमावले होते, मामींनी पतीला गमावले होते, आबांच्या मुलांनी वडिलांना गमावले होते, त्यांच्या भावंडांनी भावाला गमावले होते; पण माझ्या मामांच्या-आई अशा एकमेव व्यक्ती होत्या ज्यांनी 'स्वतःला' गमावले होते. त्यांचे दुःख कोणत्याच तराजूत मोजता येणार नव्हते, अन्य कोणत्याच गोष्टीने त्या दुःखाची भरपाई होणार नव्हती!

संपूर्ण​ रात्र मामांच्या-आई रडायच्या थांबल्या नाहीत; झोपेची गोळी देऊनही एक क्षणभरही त्यांचा डोळा लागला नाही. सकाळी उजाडल्यावर बघू तिकडे रस्त्याच्या दुतर्फा लोक त्यांच्या हक्काचा आणि घरचा 'आपला माणूस' असणाऱ्या आबांचे दर्शन घेण्यासाठी जमले होते. ती गर्दी आम्हाला जास्त रडवत होती, आबा आता आमच्याबरोबर नसल्याची जाणीव करून देत होती. तासगावमध्ये गाडी येताच मामांच्या-आईंनी मोठ्याने हंबरडा फोडला, “रावसाब, आता तरी उठ लेकरा. बग, कित्ती माणसं तुला भेटायला आल्यात. त्येंची कामं हायंत तुज्याकडं. उठ की रं पोरा. त्यास्नी नमस्कार का करत न्हाईस आज तू? उठ की रं, रावसाब. आज काय झालंय तुला?” त्यांची ती हाक माझं काळीज कापत थेट मेंदूत शिरली आणि माझं मन सुन्न झालं...


आबांवर शासकीय इतमामात १७ फेब्रुवारी, २०१५ रोजी दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्यापासून ते त्यांना त्यांच्या मुलग्याने पाणी पाजेपर्यंत 'आबांच्या-आई' त्यांच्या लेकराजवळ, त्यांच्या सर्वस्वाजवळ, त्यांच्या लाडक्या 'रावसाब'जवळ बसून होत्या. भडाग्नी द्यायच्या वेळी मात्र त्या तिथे थांबल्या नाहीत.

‘आपल्या पाडसाला आपल्यासमोरून यमरुपी शिकारी खेचून नेतोय आणि आपण त्याला वाचविण्यासाठी काहीच करू शकत नाही, हे कोणती हरिणीरुपी माता सहन करू’ शकेल, मान्य करू शकेल?!’
Most women say there is no pain than to bear a child...
I say there is no greater pain than to bury one...
(बऱ्याच स्त्रिया असे म्हणतात की, बाळाच्या जन्मावेळच्या दुखण्यापेक्षा दुसरे मोठे दुखणे नाही.
मी म्हणते, स्वतःच्या बाळाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी होणाऱ्या दुःखाएवढे दुसरे मोठे दुःख नाही...)





आबांना जाऊन आता अडीच वर्षे उलटून गेली आहेत; पण 'आबांच्या-आई'जवळ आपण बसलो तर आबा कालच आपल्याला सोडून गेले आहेत असे वाटावे इतक्या त्या रडतात, आबांच्या आठवणीने व्याकुळ होतात, देवाने मलाही आता लवकर येथून घेऊन जावे असा धावा करतात...त्यांना समजवायला गेलेले आम्ही सगळेच मग रडू लागतो. कोणी कोणाला सावरावे, हेच कळत नाही. आबा जवळच असतील किंवा मुंबईत असतील आणि उद्या सकाळी ते परत येतील असे वाटते...सगळेच 'मृगजळ'!...समोर दिसते पण हातात सापडत नाही...मृगजळ सापडेल या आशेने क्षितिजाकडे त्यादिशेने धाव घेणाऱ्या हरणासारखी आमची अवस्था होते; हाती काहीच लागत नाही- ऊर मात्र धपापतो!!!

आता अडीच वर्षांनंतर काळाच्या ओघात मोठे मामा आम्हाला सोडून जाण्याच्या दुःखाची तीव्रता थोडी कमी झाली असेल. पण, मामांच्या-आई कधीच यातून सावरणे शक्य नाही. मी तशी अपेक्षाही कधी करू शकणार नाही. स्वत्वच निघून गेलेल्या माणसाला समजावण्याइतपत आमच्या बुद्धीची झेप नाही! लोक आता आईंना या दुःखातून थोडंसं बाहेर पडायला सांगतात, घर सोडून जरा बाहेर फिरा म्हणतात. आबाची-आई किती काळ अशा राहणार असेही काहीजण म्हणतात. माझ्या 'मामांच्या-आई' हे कधीच बोलून दाखविणार नाहीत; पण नेट्टा विल्सन (Netta Wilson) अशा मातांचे दुःख काही शब्दांत मांडतात...माझ्या मामांच्या-आईंच्या भावनाही अशाच काहीशा असतील का!

Time has not moved on for me
The numbness it has disappeared
My eyes have now cried many tears
I see the look upon your face
'She must move and leave this place'
Yet I am trapped here in time
The song is the same, as is the rhyme
I lost my child... TODAY

(माझ्यासाठी काळ पुढे सरकलेलाच नाही.
माझी संवेदनशीलता हरपली आहे.
आतापर्यंत माझ्या डोळ्यांनी बरेच अश्रू ढाळले आहेत.
मी तुमच्या चेहऱ्यावरचा भाव वाचू शकते.
“तिने आता पुढे सरकले पाहिजे, ही जागा सोडली पाहिजे.”
तरीही मी काळाच्या चक्रात तेथेच एका ठिकाणी अडकून पडले आहे.
गाणे तेच आहे आणि यमकही तेच.
मी माझ्या बाळाला गमावले आहे...आजच!!!

माझ्या 'मामांच्या-आई'साठीही काळ आता कधीच पुढे सरकणार नाहीए.

त्यांनी त्यांच्या अंशाला बाळाच्या रुपात या भूतलावर आणले आणि तो अंकुर त्यांच्या पोटात असल्यापासून ते आजपर्यंत, हो अगदी आजपर्यंत त्या 'त्या बाळावर' तितकेच निर्व्याज प्रेम करतात...
आबांच्या-आई आबांशी आजही बोलतात...“बाळा, मी रोज तुझ्यावर इतकं प्रेम केलं की, जणू उद्याचा दिवस उगवणारच नाही...आणि, एके दिवशी, खरेच उद्याचा दिवस उगवलाच नाही...”
(I loved you like there was no tomorrow...
And, one day, there wasn't...)

‘जागतिक मातृदिन' आपण उत्साहाने साजरा करतो; आईला भेटवस्तू देतो; तिचे स्मरण करतो.
पण, या नाण्यालाही अशीही एक दुसरी बाजू आहेच!
अशा आईचा ‘मदर्स डे’ कसा जात असेल?




(© डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस.,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ')
(© या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय हा लेख अंशतः किंवा संपूर्णपणे  प्रकाशित करता/छापता/पुढे पाठविता येणार नाही.)
(आबांच्या अंतिम काळात प्रस्तुत लेखक प्रत्यक्ष त्यांच्यासोबत होते.)

Comments

  1. Speechless Amit.. khup javlun hee sarv anubhavlay mi.. kharch..kahich nhi bolta yet.. Dole ole zale re..

    ReplyDelete
  2. Thanks Kailash and Amit.
    I have personally gone through the pain that no one can even imagine.
    The sense of helplessness..!

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. I couldn’t stop my tears....he was true legend for comman man...his immense love and respect for mother is eternal ...!

    ReplyDelete

Post a Comment