आपल्या लाडक्या आबांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने...Remembering Aaba on his 5th death anniversary

आपल्या लाडक्या आबांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने...
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)



मोठे मामा, विनम्र अभिवादन! बरोबर पाच वर्षे झाली आज तुम्हाला आमच्यातून निघून जाऊन... पटत नाही मनाला; पचत तर बिलकूलच नाही...

जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी तुमच्याबद्दल लिहितो, मामा... आता नवीन काय लिहू असा प्रश्न आजपर्यंत तरी कधी पडला नाही; हो, किती लिहू हा प्रश्न मात्र रोज पडतो... लहानपणी तुमच्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या गोड आठवणींपासून ते तुम्हाला खांदा दिलेला पाहतानाच्या कटू स्मृतींबद्दल... आठवावे तितके थोडेच आणि न आठवावे तेही थोडेच!  पण, या ‘थोड्याशा’ लहान शब्दाने आमच्या आयुष्यात बराच मोठा बदल घडवला आहे. तुम्ही ‘थोडे’ लवकर दवाखान्यात गेला असतात तर... तुम्ही आणखीन ‘थोडी’शी काळजी घेतली असती तर... तुमचा कर्करोग ‘थोडा’सा आधीच्या स्टेजचा असता तर... तुम्ही आणखीन ‘थोडी’ वर्षे का होईना, पण आमच्यात राहिला असतात तर...



मला माहितीये, ‘जर-तर’च्या खेळाला लौकिक आयुष्यात फार काही स्थान नसते; पण तुमच्या बाबतीत मला तो ‘जर-तर’चा खेळ खेळावा वाटतो... “आज जर ‘आमचे आबा’ असते तर...” असा प्रश्न आम्हालाच नव्हे तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेलाही गेल्या पाच वर्षांत पदोपदी पडत आलेला आहे... राज्यात जेव्हा जेव्हा एखादी महत्त्वपूर्ण घडामोड घडते अथवा एखादे संकट येते तेव्हा, मामा, सर्वसामान्य जनतेला जर पहिल्यांदा कुणाची आठवण येत असेल तर ती तुमचीच- मग तो सांगली-कोल्हापूरचा महापूर असतो किंवा मराठवाड्यातील गारपीट असो, अडचणीच्या प्रत्येक प्रसंगी लोक म्हणतात, “२००५ च्या दुष्काळात अलमट्टी धरणातील पाणी त्वरीत सोडण्यावरून कर्नाटक सरकारला बेधडकपणे धमकी देऊन अल्टिमेटम देणारे आबा आज असते तर...” तुमच्या काळात भरती झालेल्या कितीतरी पोलिसांच्या पाकिटात देवाच्या शेजारी तुमचा फोटो लावलेला आढळतो, नव्हे ते तो अभिमानाने मिरवतात... अवघड प्रसंगी जेव्हा त्यांच्याकडे बोट दाखवले जाते, तेव्हा ते ही म्हणतात, “आज जर प्रामाणिक पोरांचा देव ठरलेले ‘आबा’ असते तर...” आजही जेव्हा जेव्हा विषारी दारूमुळे लोक मृत्युमुखी पडतात किंवा दारुड्यांमुळे महिलांवर अत्याचार होतो किंवा डान्सबार सुरू होऊन पिढी बरबाद होण्याचा विषय निघतो तेव्हा राज्यातील आयाबहिणींच्या तोंडी हमखास येणारे वाक्य म्हणजे, “आमचा मोठा भाऊ आबा आज असता तर...” राष्ट्रीय दिनाच्या दिवशी जेव्हा जेव्हा राज्यात सरपंच पदावर असणारी महिला सर्व गावासमोर अभिमानाने आपला राष्ट्रीय ध्वज फडकावते तेव्हा तेव्हा महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांच्या तोंडी येते, “अशा स्वरुपातील महिला सबलीकरण पहायला ‘आज आबा असते तर’...” चंद्रपूर-गडचिरोलीमधील विकासकामांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होतात किंवा सर्वसामान्य लोकांना साध्या साध्या गोष्टींसाठीही मंत्रालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडी येते, “आज आमचे हक्काचे पालकमंत्री ‘आबासाहेब असते तर’...” आजही जेव्हा जेव्हा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या होतात किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकली जातात, तेव्हा तेव्हा आम्ही म्हणतो, “आज स्वच्छ चारित्र्याचे खणखणीत नाणे असणारे आमचे आबा असते तर...” आजही जेव्हा जेव्हा दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करतात किंवा एखाद्या दुष्काळी भागात पाणीप्रश्न डोके वर काढू लागतो, तेव्हा तेथील जनतेच्या मनात हेच येते की, “आज आबा असते तर...” मरणाचे दारिद्र्य असूनही स्वतःसह स्वतःचे सर्वस्व पणाला लावून स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवणारे विद्यार्थी जेव्हा ‘सिस्टीम’मुळे फ्रस्टेट होऊ लागतात तेव्हा त्यांच्याही मनी हाच प्रश्न असतो की, “आज आबा असते तर...” निपाणी-बेळगावमध्ये आजही जेव्हा जेव्हा मराठी जनांवर अन्याय-अत्याचार होतो तेव्हा तेव्हा तेथील जनतेच्या मनात पहिल्यांदा येणाऱ्या भावना म्हणजे, “आज आमच्यात मिसळून आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या हक्कासाठी लढणारे ‘आमचे आबा असते तर’...” ‘मोठमोठ्या निवडणुका लागल्यानंतर आणि प्रचारासाठी बाहेर जायला कोणीच नेता उपलब्ध नसल्यावर तुमच्या पक्षाच्या प्रमुखांनाही वाटते की, “आबांसारखा स्टार प्रचारक आज माझ्याजवळ असता तर...”

या तर लोकभावना झाल्या, मामा... आम्हा घरच्यांच्या भावना याहूनही थेट आणि तीक्ष्ण आहेत. प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तुमची मोठी बहीण सुमन (माझी आई) आणि रंजना (मावशी) यांच्या अश्रूंचा बांध फुटून जातो... आणि, एकदा तुमच्या आठवणीने व्याकुळ होऊन रडू येऊ लागले की, आम्ही सावरत नाही एकमेकांना... रडत राहतो पोटभर; कारण “आज आमचे लाडके आबा असते तर...” या एका जर-तरच्या अवतरणाशिवाय आमच्या हाती काहीच नसते... मोठ्या मामींची परिस्थिती तर अशी की, लढणारे सारे लोक त्यांच्याकडे पाहूनच मैदानात उभे असल्यामुळे त्यांना मनातील घालमेल व्यक्त न करता सर्वांसमोर कर्तव्यकठोर भाव ठेऊन जावे लागते... खूप अवघड आहे असे राहणे... मधले मामा तर तुमच्याच पोलिस खात्यात असल्यामुळे अगदी रोजच्या रोज तुमची आठवण येतच राहते; तुमच्या शेवटच्या क्षणांतील भेटींच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांच्या कडा कित्येकदा पाणावतात... सेनापती नसताना मैदानात दम-सास ठोकून उभे राहण्याची कला आता सुरेश मामांनी त्यांच्या हृदयावर दगड ठेऊन आत्मसात केलीय मामा, पण आधार नसल्याची भावना त्यांच्या (आणि आम्हा सर्वांच्याच) मनातून कधीच जाता जाणार नाही...

मामांच्या-आईंच्या (आबांच्या आई) भावना तर शब्दांत बांधणे शक्यच नाही... त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याची हिंमत तर देवालाही होणार नाही; तिथे आम्ही कोण बापडे! काळजाला घरे पाडणारा त्यांचा आक्रोश, जगण्यातील उर्मीच गेल्याप्रमाणेचा त्यांचा आवेश, जन्मापासून परिस्थितीशी सातत्याने दोन हात करणाऱ्या त्यांची पराभूत आणि हतबल झालेली मानसिकता, स्वतःचा जीव देऊन ‘त्यांचा रावसाब’ परत आणण्याची त्यांची तयारी... आणि, आता ‘आपलं बाळ’ आपल्या हाती कधीच लागणार नाही या अतिकटू सत्याची जाणीव होऊन त्यांची होणारी घालमेल..! यापुढे लिहिताही येत नाहीये, मामा...

तुम्ही इतक्या लवकर आम्हाला सोडून गेले आहात की, “आबा जर आज असते तर...” हे आम्हाला आमच्या संपूर्ण आयुष्यात, अगदी आमच्या अंतापर्यंत म्हणत रहावे लागणार आहे, जे खूप वेदनादायी आणि निराशाजनक आहे..! तुमच्या शेवटच्या दिवसांत आणि अगदी शेवटच्या घेतल्या गेलेल्या श्वासाचा मी साक्षीदार आहे मामा... तुमच्या अंतिम प्रवासातील पार्थिव वाहण्याच्या आणि तुम्हाला भडाग्नी देण्याच्या प्रत्येक प्रसंगी मी तुमच्याजवळ होतो मामा... मी इतका नशीबवान की माझ्या जन्मापासून ते तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सान्निध्यात राहिलो... आणि मी इतका कमनशिबी की, माझ्यावर तुमचा अंत पाहण्याची एक भाचा म्हणूनच नव्हे, तर एक डॉक्टर म्हणूनही वेळ आली! माझ्या मनाची अगतिकता, तगमग, नैराश्य, हतबलता, वैषम्य, क्लेश, आत्मक्लेश, वेदना, दुःख... सगळ्या-सगळ्याची केवळ त्या ईश्वराला आणि तुम्हालाच जाणीव...

बाकी, “मोठे मामा, खरंच तुम्ही आज हवे होता...”

आता, सत्यवानाला यमलोकातून परत आणणाऱ्या सावित्रीइतकी ताकद तर आमच्या कुणातच नाही... देवावरचा हा राग आमच्या मनातून कधीच जाणार नाही... शेवटी एवढंच म्हणणं आमच्या हाती राहतं की, “... मोठे मामा (आबा), प्लीज परत या..!”

डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)
(प्रस्तुत लेखक हे मान. आर. आर. (आबा) पाटील,माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.dramit100wordstories.blogspot.com

Comments

  1. आबांच्या जाण्याने महाराष्ट्राची आणि त्याहून मोठी तुमच्या कुटुंबाची झालेली हानी कोणीच भरून काढू शकत नाही पण विचारांनी बाबा सर्वांच्या मध्ये सतत जिवंत राहतील आबा नसतानाही त्यांचे विचार आणि त्यांचे कर्तृत्व महाराष्ट्रात अजरामर आहे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले आबा आज आपल्यात नाही हे प्रचंड दुःख आहे अश्या थोर व्यक्तीला आज विनम्र अभिवादन ।

    ReplyDelete
  2. आबांना कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन💐

    ReplyDelete
  3. भावस्पर्षी लेख व लेखन आबांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली

    ReplyDelete
  4. विनम्र भावस्पर्शी लेखन असून वाचताच मनाला गहिवरून येत...... विनम्र अभिवादन 🙏🙏

    ReplyDelete
  5. आबांना विनम्र अभिवादन. खूपच भावस्पर्शी लेखन केलय सर तुम्ही💐🙏

    ReplyDelete

Post a Comment