“आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके..!” (Self realization)(Premachi gosht)
“आभाळ खाली झुके; पावलांखाली धुके..!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(© लेखाचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित असून सदर लेख कॉपीराइट कायद्यांतर्गत सुरक्षित केलेला आहे.)
(प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील गाण्यावर आधारित लेख)
(गीतकाराला सलाम!)
भारतीय माणसाला सिनेमाचे आकर्षण असणे हे काही नवीन नाही. माझ्यासारख्या एखाद्याला सिनेमा पहायला फारसे आवडत नसले तरी सिनेमाचे कोणतेच अंग स्पर्शून जाते नसलेला माणूस सापडणे तसा विरळाच! तर, सांगायचा हेतू हा की, मला सिनेमा पाहणे जरी फार आवडत नसले तरी त्यातील गाणी, त्यातही मराठी चित्रपटांमधील गाणी ऐकायला (आणि कधीकधी पाहायलाही उदा. 'अधीर मन झाले" किंवा 'रंगा रंगा' मधील 'बायगो बायगो' ही गाणी) खूप आवडतात. केवळ भारतीय सिनेमांचेच वैशिष्ट्य असणारी ही गाणी मनाला केवळ भुरळच पाडत नाहीत, तर बऱ्याचदा रोजच्या जगण्याशीही correlate करत असतात. अशी गाणी ऐकताना मन हरखून जाते, मनावरील मळभ दूर होते आणि निळ्याशार आभाळासारखे मन स्वच्छ आणि विलोभनीय (स्वतःसाठीच) बनून जाते.
२०१३ साली आलेल्या 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटातील 'ओल्या सांजवेळी' या गाण्याने माझ्या मनावर कायमची मोहिनी घातली आहे. (हा चित्रपट मी २०१६ साली पाहिला; तोपर्यंत मात्र हे गाणे मी शेकडो वेळा ऐकले असेल; आजही ऐकतो.) गंमत अशी की, या गाण्याचे बोल आणि मी ज्या वातावरणात जगत होतो त्या दोन्ही गोष्टी अशा काही जुळून आल्या होत्या की 'जो की बात वो!' २०१३ साली मी कोल्हापूर जिल्ह्याच्या दुर्गम आणि डोंगरी भागातील गगनबावडा येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर रुजू झालो. तो मार्च महिना होता. रुग्णालयातील कामाचा अतिताण कधीच नव्हता. मुळात खूप पाऊस पडत असल्यामुळे आणि जेवणाची फार चांगली सोय नसल्यामुळे तेथे कोणतेही डॉक्टर काम करायला फारसे उत्सुक नसतात. पण, मी गुणवत्ता यादीत पहिला असूनही स्वेच्छेने (खरेतर, अतिउत्साहाने) तिथे पोस्टिंग घेतले होते. रुग्णालयाशेजारीच एक मोठे तळे आहे आणि चारही बाजूंना उंचच उंच डोंगर-टेकड्या आहेत. उन्हाळ्यात डोंगरामधील झऱ्यांतील पाणी आटल्यामुळे भेकर, हरणे, रानडुकरे, रानगवे इत्यादी श्वापदे पाणी पिण्यासाठी त्या तळ्यांवर येत आणि आम्हाला कधीमधी दर्शन देत असत. संपूर्ण उन्हाळा आम्ही जांभळे, करवंदे, पेरू (जांभा), आंबे आणि काजू अशा फुकट आणि मुबलक मिळणाऱ्या रानमेव्यावर काढला होता. मध्येच दोन-तीनदा अवकाळी पाऊस झाला होता. माझ्या आवडीचे पक्षी आणि साप तर न थकता रोज दर्शन देत असत. एकूणच काय तर, माझ्यासारख्या निसर्गप्रेमी माणसासाठी ती काम करायला एकदम योग्य जागा होती. आणि, हे चालू असताना गावात झालेले नवीन मित्र गगनबावड्यातील छप्परतोड पावसाचे वर्णन करून माझी उत्सुकता उगाचच ताणत असत. पावसाळ्यात तर क्षणार्धात इथली ओपीडी धुक्याने भरून जाते आणि पेशंटही दिसायचे कठीण होते अशी स्टाफची वदंता! (नंतर ते खरेच खरे असल्याचे ज्ञान अस्मादिकांस प्राप्त झाले!) तसे माझे बरेच शिक्षण शहरात झाल्यामुळे आणि माझे मूळ गाव दुष्काळी पट्ट्यात येत असल्यामुळे 'पडून पडून कसला पडत असेल इथे पाऊस!' असे विचार माझ्या मनात नेहमी येत असत.
पण... अखेरीस मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ग्रामीण रुग्णालयातील डांबरी रस्त्यावर क्रिकेट खेळत असताना 'प्रॉपर मॉन्सूनपूर्व' पहिला पाऊस पडला. (हे अस्मादिकांना पावसाकडे पाहून न कळता दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे समजले होते! उगाचच माझ्या भूगोलाच्या ज्ञानाचे इथे कौतुक कशाला, नाही का!!!) आणि, त्या क्षणापासून तो पाऊस माझ्या रोमरोमांत असा काही भिनत गेला की, विचारूच नका... गगनबावडा हा महाराष्ट्रातील सर्वांत कमी लोकसंख्येचा आणि सर्वाधिक पावसाचा तालुका आहे. गगनबावड्याला महाराष्ट्राची चेरापुंजीही म्हणतात. इथे एकदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरू झाला की थेट दिवाळीतच तो कोसळायचा थांबतो. मला हे सर्व अनुभवायचे होते. माणसाला जितकी पाण्याची भीती वाटते त्याहून कितीतरी जास्त त्याला त्याचे आकर्षण असते. अर्थातच, मलाही होतेच!
हां, तर, मे महिन्यात क्रिकेट खेळताना सुरू झालेला 'तो' पाऊस... पाऊस येताच नेहमी जसे सगळे घराकडे धाव घेतात, तसे काही तेव्हा तेथे झाले नाही. हातातली बॅट आणि बॉल बाजूला ठेऊन आम्ही सगळे तसेच भिजत राहिलो. माझ्याकडे उदयने मला दिलेला 'बोस' कंपनीचा एक भारीतला स्पीकर आहे. माझ्या रुममध्ये त्यावेळी मी सतत मोठ्या आवाजात मराठी गाणी लावून ठेवत असे. (मनोरंजनाचे तेवढे एकच साधन आमच्याकडे होते. टी. व्ही. नव्हता; इंटरनेटला काही रेंज येत नसे आणि तेव्हा डेटापॅक महागही होते. महिन्याला ३५०/- रुपयांना कसाबसा १.५ जीबी डेटा मिळे. त्यामुळे नेट गरजेच्याच वेळी वापरले जात असे.)
मी तडक आत गेलो आणि 'प्रेमाची गोष्ट' या तेव्हाच आलेल्या चित्रपटातील माझे आवडते गाणे 'ओल्या सांजवेळी...' मोठ्या आवाजात स्पीकरवर लावले. सिनेमात ते गाणे नायकाने त्याच्या प्रेयसीसाठी म्हटले असले तरी मला मात्र मी ते निसर्गाला उद्देशून म्हणतोय असे मनातल्या मनात तीव्रतेने वाटत होते. (माझी पत्नी हीच माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेयसी होती, आहे आणि राहील हे सांगण्याची सुसंधी मी आत्ता दवडू इच्छित नाही! असो...) उन्हाळ्यातलीच ती संध्याकाळ आणि पाऊसही अवकाळी (की, अवखळ!) असल्याने बाहेर कोवळे ऊन आणि पावसाची भूरभूर यांचा लपंडाव रंगला होता. आणि, स्पीकरवर 'बॅकग्राउंडला' वाजत असलेले ते गाणे... मी (म्हणजे माझ्या कथेचा नायक) पावसाला उद्देशून म्हणतोय, “ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी; तसा तू जवळी ये जरा; कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी तसा तू हलके बोल ना...” (लहानपणी पावसाळ्यात कागदाच्या फक्त होड्या होत असत; मोठा झालो तसे त्या कागदांची आधी गाणी (कोरा कागज़ था यह दिल मेरा...) आणि नंतर कविता होतात याची 'समज' येऊ लागली! असो...) आणि मग, पावसाने (आणि निसर्गानेही) माझे म्हणणे ऐकायला चालू केलंय असे मला वाटू लागले!
अचानकच 'त्या'ने आणखीन जोराने (आणि उत्साहाने) कोसळायला चालू केले; जसे काही त्यालाही (धरणीपेक्षा) मला भेटण्यातच जास्त रस असावा! आता 'तो' केवळ माझ्यासाठीच कोसळत होता; मला त्याच्या सरींनी चिंब भिजवून टाकण्यासाठी..! 'तो' आवेगाने माझ्याशी हितगुज करतोय; मला आवाहन करतोय, “डोळ्यातल्या सरी, विसरून ये (निसर्गाच्या) घरी; (आपल्या दोघांची इतके दिवस खंड पडलेली) ओळख आता (परत) खरी होऊन जाऊ दे..!” आणि मग, मला 'त्या'च्या आवाहनाला प्रतिसाद देण्याशिवाय कोणतेच गत्यंतर राहत नाही. मलाही त्याला बिलगायचेच आहे; मलाही निसर्गाच्या कुशीतला आपलेपणाचा थंडगार 'ओलावा' अनुभवायचाच आहे... मला खरेच 'त्या'च्याशी आणखीन जवळीक साधायची आहे; मला आता त्याला खूप जास्त जाणून घ्यायचे आहे... हो, मला 'त्या'ला आता भेटायचेच आहे...
क्षणार्धात मी सावरतो; आणि पटकन निर्णय घेतो. “चला अमितराव, आज ही संधी सोडायची नाही... तिचं (सायंप्रभेच्या लालसर सोनेरी किरणांसारखं) 'सोनं'च करायचं आज...” मी माझा रेनकोट घालतो. (पावसात भिजायला निघालेला 'हेल्थ कॉन्शस' डॉक्टर; दुसरे काय!) आज कॅमेरा भर पावसातसुद्धा बरोबर हवाय; आणि पहिल्या क्रमांकावर 'सेट करून' ठेवलेलं हे गाणं; “ओल्या सांजवेळी...” माणसाने लावलेल्या शोधाचा 'स्वत:'चा शोध घेण्यासाठी आज वापर करूया; बघूया किती 'जवळ' जाता येतंय 'त्या'च्या आणि 'स्व'च्याही..!
गगनबावड्यातून कोकणात उतरायला दोन घाट आहेत- एक भुईबावडा घाट आणि दुसरा करूळ घाट. दोन्हीही घाट मला तितकेच प्रिय; पण भुईबावडा घाटात वर्दळ बरीच कमी असल्यामुळे तो थोडासा जास्त आवडतो. हा घाट गावच्या मुख्य चौकातून उजव्या हाताला वळले की लागतो. पण गाव आणि घाटाला जोडणारा रस्ताही लाजवाब. मोठ्या परिसंस्थेचा तितकाच वैविध्यपूर्ण एक भाग... आणि, रस्ता कसा वळणावळणाचा! चौकातल्या तात्यांच्या टपरीवजा हॉटेलात एक फक्कड चहा पिऊन मी थेट भुईबावडा घाटाकडे कूच केले- जराही वेळ न दवडता... छोटी छोटी वळणे पार करत आणि दोन्ही बाजूंचे खळाळणारे स्वच्छ (crystal clear) पाण्याचे झरे (खरेतर, ते मला बोन्साय केलेले धबधबेच वाटतात..!) न्याहाळत मी घाट सुरू होतानाच्या मोठ्या वळणासमीप येतो... आणि मग, इतका वेळ शांतपणे पडणारा 'तो' (पाऊस) मोठ्याने गाणे म्हणू लागतो, “वळणावरी तुझ्या, पाऊस मी उभा; ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे!” माझी ओंजळच काय, पण सर्वांग 'त्या'च्या 'जीवन'दानाने भरून जाते... मी तसाच रस्त्याच्या मध्यभागी अलगद आडवा पडतो (हे काल्पनिक नाही; शब्द अन् शब्द अक्षरशः खरंय!); नव्हे नव्हे; तो रस्ता मला अगदी प्रेमाने त्याच्या कवेत घेतो. मी 'प्रशांत' होऊन जातो. पाऊस पडून गेल्यावर झालेल्या निरभ्र आभाळाप्रमाणे माझे मनही स्वच्छ होते; मनाची पाटी अक्षरशः कोरी होते. परंतु, मला जाणवतंय, “हा रितेपणा नाहीये; हे 'भारावले'पण आहे!”
पंधरा-वीस मिनिटांनी मी उठतो आणि पुढे चालू लागतो. समोरच्या डोंगरदऱ्यांवर आता केवळ धुक्याचेच साम्राज्य आहे. घाटाच्या सुरुवातीलाच डाव्या बाजूला एक छोटेसे फूट-दोन फूट उंचीचे महादेवाचे मंदीर आहे. त्याच्या भोवती सिमेंटचा बांधीव कट्टा आहे. आतला 'रुद्रावतारी देवाधीदेव महादेव'ही त्या चिंब सरींनी 'शीतल' झालाय. तोही माझ्यासारखाच त्या केवळ त्याचेच साम्राज्य असणाऱ्या दऱ्याखोऱ्यांकडे पाहतोय. शांतपणे. फुलपाखरात रुपांतर होण्याची अळीमध्ये जी अनामिक ओढ असते अगदी त्याच ओढीने दऱ्याखोऱ्यांमधील धुके वेगाने ढगांत रुपांतरित होण्यासाठी उर्ध्व दिशेने प्रवास करतंय! आणि तेव्हाच समोर असीम पसरलेल्या क्षितिजाला आभाळ टेकलंय. मी घाटाच्या संरक्षक कठड्यावर सुरक्षितपणे एकटाच उभा असताना माझ्या मोबाईलवर सुरू असलेल्या गाण्याच्या कडव्याचे बोल तंतोतंतपणे माझ्या मनातील भाव टिपतायंत, “आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके; सुख हे नवे सलगी करे;” पण ते बोल मला “का सांग ना..!” असे विचारत नाहीयेत. माझ्या आणि 'त्या'च्या (पावसाच्या) तारा जुळल्या आहेत. आम्ही दोघेही आता एकमेकांच्या मनीचे भाव अन् अंतरीचे रंग जाणून आहोत..! पाण्यात सगळे रंग एकरूप होतात आणि निखळपणे मिसळून जातात. अगदी तस्संच आमचंही आत्ता झालंय. मन परत एकदा कोरं करकरीत झालंय... बिलगत कोसळणारा पाऊस सोडून माझ्या अंतःचक्षूंनाच नव्हे तर बहिर्चक्षूंनाही आता काहीच दिसत नाहीये! मी आता पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात पतीत होतोय.
मध्येच कोकणातून वर येणाऱ्या उबदार वाऱ्याची एक झुळूक जोराने घाटमाध्याला भेटण्यासाठी आवेगाने जाते. वाऱ्याच्या त्या दबावाने धुक्याची दुलई क्षणात दूर ओढली जाते; सकाळी आई आपल्या बाळाच्या अंगावरची दुलई जशी हळुवारपणे ओढते तशीच..! अचानकपणे समोरचे धूसर दृश्य स्पष्टप होऊ लागते. मी चालत चालत घाटात बराच खाली आलेला असतो. सात्विकतेच्या त्या वातावरणात माझी नजर अनाहूतपणे डाव्या दिशेकडे वळते. अरे, हा तर गगनगड! ऊन-पावसाच्या त्या खेळात दूर कुठेतरी रत्नागिरीच्या वर असणाऱ्या सूर्याची किरणे (हा माझा कल्पनाविलास. सूर्य होता तिथेच होता!) गगनगडाच्या माथ्याला चमकवताहेत. गगनगिरी महाराज आपल्या सहस्रकिरणांनी मला आशीर्वाद देताहेत असा उगाच आपला माझ्या मनाला भास होऊन जातो. घाट आणि गगनगडाच्या मध्ये अस्ताव्यस्तपणे पसरलेली अवाढव्य दरी आपल्यात असंख्य झरे, नाले, ओढ्यांना सामावून घेतेय. आणि, त्यांना पुढे जायला दिशाही देतेय. स्वच्छ खळाळत आनंदाने वाहणारे आणि सूर्यकिरणांच्या स्पर्शाने मोहून जाऊन चित्कारत पुढे जाणारे हे चमचमते पाणी! छान वाहतंय. अगदी पुढच्याच क्षणीही आपण मागच्या गेलेल्या क्षणाला स्पर्श करू शकत नाही याचे कसलेही वैषम्य न वाटणारे ते पाणी! त्या सहस्रावधी जलधारा माझ्या कानात हळूच गुंजारव करताहेत, “सारे जुने दुवे, जळती जसे दिवे; पाण्यावरी जरा सोडून देऊया...” इतिहासात न रमता आनंदाने जीवनक्रमण करत जाण्याचा वडिलकीचा सल्ला 'त्या'ने मला दिला आहे आणि मी ते तत्त्व माझ्या आयुष्यात 'फॉलोव्ह' करणारच असा मी माझ्याशीच तिथे केलेला तो पण... झऱ्याच्या त्या पाण्याने आज मला 'जीवनामृत'च पाजलंय... मी खूप खूश आहे आणि मला 'relax' वाटू लागलंय..! मी हळूहळू मस्तमौला होतोय; निदान त्या-त्या क्षणापुरता तरी..!
घाटातून ४-५ किमी चालत आणि पावसाला अंगाखांद्यावर खेळवत मी भुईबावडा घाटाचे आकर्षण असणाऱ्या सर्वांत मोठ्या धबधब्याजवळ येतोय. ही जागाही बऱ्यापैकी धुक्याने झाकली गेलीय. आता मला तीन-चारच रंग दिसतायंत; वरून पडताना जखमा होण्याची शक्यता असतानाही गाणे म्हणत थेट दगडावर कोसळणाऱ्या पाण्याचा फेसाळणारा शुभ्र रंग; धुक्याचा दुधावरल्या स्निग्ध सायीप्रमाणे असणारा दुधी पांढरट रंग; वरून इतक्या जोरात स्वतःच्या शिरावर कोसळत असणाऱ्या पाण्याने होणाऱ्या वेदना चेहऱ्यावर जराही न दाखवणाऱ्या स्थितप्रज्ञ 'महादेवा'सारख्या असणाऱ्या पाषाणाचा दाट निळसर छटांचा काळाशार रंग आणि धुक्यामधून हळूच डोकावणाऱ्या झाडांच्या पानांचा हिरवाकंच रंग..! आज काळा-पांढरा रंगही जीवनाच्या 'रंगीत'पणाची जाणीव करून देतोय.
वरून खाली पडणारे पाणी मग रस्त्याखालून हळूच मार्ग काढत थेट दरीत झेपावतंय... पुढे जाऊन ते प्रथमतः त्या सरितेच्या पवित्र जलात आणि अंतिमतः सर्वसमावेशक अशा सिंधुसुधाकरासारख्या बापाला जाऊन मिळणार आहे. अरेच्या, पण काल तर या पाण्याच्या पावलांच्या 'जलवाटा' कुठेच दिसत नव्हत्या; आणि आज लगेच त्यांनी नवे मार्ग शोधून काढलेही... त्या चिमुकल्या जलधारा आता थेट मलाच नादमय साद घालतात, “रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे; पुसुया जुन्या पाऊलखुणा सोबत तुझी साथ दे..!” हातात हात दिला की समस्येचा मार्ग कसा पटकन निघतो नाही..! माझ्या आयुष्यातील एका सर्वांत सुंदर संध्याकाळच्या स्मृती आता माझ्या मनःपटलावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत; परत कधीही न पुसून टाकण्याजोग्या...
आता अंधार पडू लागलाय. 'आदित्य' राजकुमार आजचे काम आटोपून आज्ञाधारक मुलाप्रमाणे 'सातच्या आत घरात' जाऊ पाहताहेत. पावसालाही थोडी विश्रांती घ्यायचीय. धुक्याला आता स्वतःच्या दुलईवर काळीशार रजनीरुपी शाल ओढून घेऊ वाटतीये. झाडं आता थोडी दमली आहेत. त्यांना पटकन झोपायचंय... आणि, मलाही परतायला हवंय आता... ते रश्मीकिरण, ते कोसळणारे पाणी, तो भुरभुरणारा पाऊस, ते खळाळते झरे, तो स्थितप्रज्ञ दगड, तो शांत रस्ता, ती पोक्त हिरवाई आणि गगनगडाचा तो आशीर्वाद... सारं सारं माझ्या अंतरंगात आता भिनलंय... मला ते सगळं केवळ माझ्यापुरतं साठवायचं नाहीये; तो आनंद, ते समाधान, ते भान, ते ज्ञान आणि ती 'स्व'ची जाणीव मला सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे... मला ते 'जीवनदान' तुमच्याही पदरात टाकायचंय...
मी माझ्या ग्रामीण रुग्णालयाच्या जवळच्या तळ्याशेजारी असणाऱ्या झुडपांपर्यंत पोहोचलोय... गेल्या महिनाभरापासून इथे काजव्यांची रोज सभा भरते; सभेत कोलाहल माजतो... पण हे भांडण नाही... हे प्रियाराधन आहे... ही त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाची खूण आहे... एका लयीत सगळे काजवे एकापाठोपाठ एक चकाकत राहतात... आता पावसाला सुरूवात होतीये, म्हणजे काजवे परत स्वतःच्याच अंधारात गडप होणार आहेत तर... ते माझा निरोप घेताहेत का! अरे, काय म्हणताहेत ते... ते मला जाताजाता काहीतरी सांगू पाहताहेत, “माझी ही आर्जवे, पसरून काजवे... जातील या नव्या वाटेवरी तुझ्या!!!” अरे हो की... मला माझ्या 'स्वत्वा'कडे नेणारी एक नवीकोरी वाट आज सापडलीये... मी... आणि, माझी नवी वाट... मला समाधानाने पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणारी..!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))
(© सदर लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाधीन असून कॉपीराइट केलेले आहेत.)
(वॉट्सएप संपर्क- ८३२९३८१६१५)
(www.dramittukarampatil.blogspot.com)
(www.dramit100wordstories.blogspot.com)
(www.trekdoctoramit.blogspot.com)
(छायाचित्रे: संग्रहित; साभार: गुगल)
अतिशय सुंदर भाषाशैली आणि हृदयस्पर्शी लेख आहे.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा, तुमचा हा लेख वाचून मन एकदम फ्रेश झालं.
खूपच छान सर
ReplyDeleteश्री गणेश रेंदाळे
खूपच छान लेख सर
ReplyDeleteखूप छान डॉक्टर साहेब👌👌👌👍👍
ReplyDeleteNamaskar sir
ReplyDeleteKhup chaaan ✌
Dear Dr Amit,
ReplyDeleteMi tuza lekh part 2nd time vachla. Tuzyasarkh shabdrachna shabdkosh mazyapashi nahi varnan karaila. Nahitr mi khup chan dad dili asti tuzya lekhala.
Pan tari tu samjun ghe mazi manapasun dileli dad accept kar.
Are mi sudha extreme nisargpremi aahe.
Mi tuza lekh wachtana swata tyat itki ramun gele ki mi sagl je tu lihiles te sagl feel kele.
Itr lekhakahi lihitatch ki no dout, pan jevha aapl manasacha lekh aapan jara kautukane wachato nahi ka.
Yat mala ek gane aathvle "chimb pavsane ran zale aabhaldani..." paus ani shrugar sobtine chaltat.
Ani pavsatle natlele nisarg aaplya nasa nasat bhintat na.
Kay kimaya aahe bagh nisargachi.
Agadi niras mansala sudha helaun taknara paus kay jadu aahe nisargachi....yat aapl vay suddha visraila lavnare wavea sparshun jatat.
Kharach tu tya hospital la pisting ghenyacha decision khup chanch hota.
Nahitr tu he sagl anubhavl nastas
Ani itkya varshame suddha jivant picture vachkanchya samor mandla aahe. Kharach sagla nisarg tu ya lekhat samaun aamchya padrat takla aahes. Thank you Amit. God bless you.
Mi trupt zale vachun
Karan
Mi ek Nisarg premi🥰
Vaa apratim amit...chan
ReplyDelete