“मैं आग दिल में लगा दूँगा वो, के पल में पिघल जाओगे..!” (अमिताभ वाढदिवस विशेष)

“मैं आग दिल में लगा दूँगा वो, के पल में पिघल जाओगे..!”
(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

अमिताभवरच्या लेखात त्याला ‘अमिताभ’ म्हणू की ‘बच्चन’ म्हणू मला आकळत नाही. अमिताभ बच्चन असा उल्लेख करावा इतका परका तर तो नक्कीच नाही. (जसे ‘आपला लक्ष्या’ म्हटले की लक्ष्मीकांत बेर्डे घरचाच सदस्य वाटतो, तसेच हेही! या दोघाही सुपरस्टार्सचा उल्लेख उगीचच ‘अमिताभ बच्चन’ किंवा ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ असा आदरार्थी करावा असे कधीही वाटत नाही, त्याची गरजही नाही इतके ते ‘घरचे, जवळचे’ वाटतात. शिवाय, ‘अमिताभ’ किंवा ‘बच्चन’ किंवा ‘लक्ष्या’ म्हणण्यात जी आपुलकी किंवा आपलेपणा आहे, तो या पूर्ण नावांत नाही.)

दरवर्षी ११ ऑक्टोबरला अमिताभचा वाढदिवस येतो, अगदी न चुकता! (सगळ्यांचाच येतो; ही मी उगीच केलेली थोडीशी गंमत!) तर हां, दरवर्षी बच्चन साहेबांच्या वाढदिवसाला काय नवीन लिहायचं असा प्रश्न पडतो, १० ऑक्टोबरपर्यंत... आणि मग, ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा सकाळी सकाळी मी वॉट्सॲपवर अमिताभचा स्टेटस ठेवताना त्याच्याबद्दल काही ओळी लगेच सुचतात. अतिशय साध्या, बिगरफिल्मी बॅकग्राऊंडच्या घरातून ९० च्या दशकात ‘स्ट्रगल’ करत करत सुपरस्टार बनलेला शाहरूख खानही मला एक अतियशस्वी माणूस, व्यावसायिक कलाकार म्हणून खूप आवडतो. (त्याच्या किंवा कुणाच्याही अभिनयाच्या दर्जावर लिहावे इतकी माझी बुद्धिमत्ता नक्कीच नाही. अभिनयतज्ज्ञांनी ते ठरवावे.) शाहरूखची तेजतर्रार विनोदबुद्धी (wit), त्याच्या बोलण्यातला खुसखुशीतपणा, त्याची अपार मेहनत करण्याची वृत्ती आणि कायम practical राहून विचार करण्याचा स्वभाव या सर्वांची मला सतत भुरळ पडते. तरीही आजतागायत मी त्याच्यावर फार काही लिहिलेले मला आठवत नाही. पण, बच्चनचं तसं नाही. लोकांनी त्याच्याबद्दल इतकं लिहिलं-वाचलं असलं तरीही मी त्याच्या वाढदिवसाला दोन-चार ओळी तरी लिहायचा प्रयत्न करतोच. तर पुढे लिहिल्या आहेत, त्या यावर्षीसाठीच्या दोन-चार ओळी!



आम्ही लहानपणी कुठल्याही केशकर्तनालयात गेलो की, तिथे भिंतीवर दिसायचा त्याचा दीवारमधला ‘डेनिम ब्ल्यू’ रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाच्या पँटमधला हिप्पी हेअरस्टाईलमधला पाय लांबवून खुर्चीत बसलेला ‘तो’ फोटो! तो फक्त फोटो असायचा, पण तो पाहताच माझ्या (किंवा, तो पाहणाऱ्या कुणाच्याही) मनात आपोआपच “पीटर... तुम लोग मुझे उधर ढूँढ़ रहे हो, और मैं यहाँ तुम्हारा इंतज़ार कर रहाँ हूँ” या ओळी यायच्या आणि आपण स्वतःच अमिताभ वाट बघत असलेला ‘पीटर’ वगैरे आहोत की काय असा ‘फील’ यायचा. त्यात, तो केशकर्तनकार ‘डाय-हार्ड’ बच्चन फॅन असेल, तर मग त्याच्या दुकानातल्या खरखरणाऱ्या टेपवर किंवा रेडिओवर सतत अमिताभची गाणी वाजत असायची. त्यामुळे केस कापायची (आणि, कापून घेणाऱ्याची) ‘बोअरिंग’ वेळही अक्षरशः चैतन्यमयी होऊन जायची. (पुढे कधीतरी अमिताभने त्याच्या ‘दीवार’मधल्या लूकविषयी बोलताना म्हटले होते की, ‘‘दीवार’मधला माझा तो प्रसिद्ध कपडेपट (कॉस्च्युम ओ!) ही त्यावेळी टेलरने केलेली एक मोठी चूक होती’. टेलरने शर्ट शिवताना तो गुडघ्यापर्यंतच्या लांबीचा शिवला होता, आणि त्यामुळे तो बराच विचित्र वाटत होता. दिग्दर्शक यश चोप्रा मात्र शूटिंगच्या तारखा पुढे ढकलण्यास राजी झाले नाहीत, आणि त्यामुळे अमिताभला पूर्ण बटने घालण्याऐवजी त्या शर्टच्या खालच्या भागाला गाठ मारावी लागली. आता जरा अलंकृत किंवा ललित (खूप गंभीर झालं का हे?) भाषेत लिहायचे तर, ‘अमिताभने ‘ती’ गाठ शर्टाला नव्हे, तर भविष्यातल्या यशाला मारली होती’ असे लिहिण्याचा थोडासा आगाऊपणा मी करून घेतो.) आता अमिताभच्या हेअरस्टाईलवरून विषय निघालाच आहे, तर हेही सांगायला हरकत नाही की, अमिताभची त्याकाळातली हेअरस्टाईल ही प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट श्री. हकीम कैरन्वी यांनी केली होती.

१९७५ साली आलेल्या सुपरडुपर हिट ‘दीवार’च्या आधी, म्हणजे, १९७३ साली आलेल्या ‘जंजीर’मुळे तसा अमिताभ ‘ऑलरेडी’ जनमाणसाच्या मनावर अधिराज गाजवू लागला होताच! पण, ‘दीवार’ने त्याच्या कितीतरी पट पुढे पाऊल टाकले. ‘जंजीर’मध्ये अमिताभ इन्स्पेक्टर विजय खन्नाच्या भूमिकेत होता‌, तर १९९० साली आलेल्या ‘अग्नीपथ’मध्ये तो नामचीन गुंड बनून, कमिशनरच्या समोर बसून त्याचे (जग)प्रसिद्ध डायलॉग फेकत होता. (‘अग्नीपथ’च्या वेळी अमिताभ त्याच्या सिनेमांची संख्या शंभरी गाठत आला होता. अगदीच exactly सांगायचे तर, ‘अग्नीपथ’ हा बच्चनचा ९५ वा सिनेमा होता!)



१९९० पर्यंत यशाची केवळ चढती आणि चढतीच कमान अनुभवलेल्या अमिताभला त्यानंतर जवळपास दहा वर्षे सिनेमा जगत आणि आर्थिक बाबींमधले अपयश पहावे लागले. ‘Cycles never stop’ या आर्थिक जगतातील उक्तीप्रमाणे अमिताभच्या यशाची चढती कमान खालावत जाऊन त्याला मोठ्या अपयशाचे धनी व्हावे लागले. पुढे २००० साली आलेल्या ‘कौबक’ने (कौन बनेगा करोडपती!) त्याला चांगलाच हात दिला आणि तो या सर्व वाईट प्रसंगांतून सहीसलामत बाहेर पडला. वयानुरूप भूमिका निवडण्याचे चातुर्य आणि अंगभूत गुणवत्तेच्या जोरावर त्याने नवीन पिढीला भावणारे आणि नवीन तरूण कलाकारांबरोबर अभिनय केलेले ‘पिंक', ‘पा’, ‘ब्लॅक’, ‘सरकार’, ‘सरकारराज’, ‘आरक्षण’, ‘बागबान’ असे अफलातून सिनेमे केले. आपण अभिनयाचे खरेखुरे ‘शहेनशहा’ आहोत, हे त्याने वेळोवेळी अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिले. नव्वदोत्तरीतील अमिताभ अतिशय छान आणि ‘प्रौढ’ आहे यात काहीच शंका नाही.

पण, मला आवडतो तो ‘तो’ सत्तर-ऐंशी-नव्वदच्या दशकातल्या तरूण तडफदार अमिताभ... अर्थात, ‘अँग्री यंग मॅन’! त्याकाळच्या अमिताभला पडद्यावर पाहिले की अंगातले रक्त कसे सळसळते! ‘जंजीर’मधल्या “जब तक बैठने को ना कहा जायें, शराफ़त से खड़े रहो... ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं’ पासून ‘अग्नीपथ’मधल्या “विजय दीनानाथ चौहान... बाप का नाम...” म्हणत म्हणत “आज शाम ६ बज़े मौत के साथ अपना अपिइंटमेण्ट है, कमिश्नर” या डायलॉगपर्यंतच्या अमिताभच्या प्रवासावर जीव ओवाळून टाकणारे आम्ही!



१९७३ सालच्या ‘जंजीर’ने अमिताभची ‘अँग्री यंग मॅन’ ही प्रतिमा रुजवली; तर पुढे १९७५ चा ‘शोले’, १९७८ चा ‘त्रिशूल’ आणि १९७९ चा ‘काला पत्थर’ या चित्रपटांनी ती प्रतिमा आणखीनच घट्ट केली. ‘शोले’ मध्ये अमिताभने साकारलेल्या धीरगंभीर आणि विनोदी या दोन्ही प्रकारच्या भूमिकांवर आजही प्रेक्षक जीव ओवाळून टाकतात. या चित्रपटात अमिताभने गंभीरपणे केलेल्या विनोदाचा प्रकार मी क्वचितच अन्यत्र कुठेतरी पाहिला असेल, इतका तो अपवादात्मक वाटतो. हा संपूर्ण चित्रपट सगळ्याच कलाकारांच्या डायलॉग आणि अभिनयाच्या जादूगिरीने ओतप्रोत भरलेला आहे. पुढे १९७८ साली आलेल्या ‘त्रिशूल’मधले काही डायलॉग्ज वानगीदाखल पहा. ‘त्रिशूल’मध्ये “मेरे ज़ख़्म ज़ल्दी नहीं भरतें” म्हणत आपण काय करू इच्छितो याचा थोडासा अंदाज आधी अमिताभ आपल्याला देतो. आणि नंतर, “मैं वापस जाने के लिये नहीं, तुम लोगों को यहाँ से भेजने के लिये आया हूँ, और इसीलिए यह एम्ब्युलन्स साथ में लाया हूँ” अशी संवादफेक करत गुंडांना यमसदनी पाठवतो ते पाहणे केवळ लाजवाब! ‘त्रिशूल’मध्ये “... उसे मौत से क्या ड़र लगेगा?” म्हणणाऱ्या अमिताभला १९७९ साली आलेल्या ‘काला पत्थर’मध्ये जेव्हा “My pain is my destiny; and I can't avoid it,” म्हणताना आपण पाहतो, तेव्हा क्षणभर आपण आपली दुःखे आणि वेदना विसरून जाऊन त्या प्रसंगाशी एकरूप होतो! “मैं पाँच लाख का सौदा करने आया हूँ; और मेरी जेब में पाँच फूटी कौड़ियाँ भी नहीं हैं” म्हणणाऱ्या अमिताभला पाहताच उमेद हरवून नाउमेद झालेल्या कोणालाही परिस्थितीशी दोन हात करण्याची नवसंजीवनी मिळायला हरकत नाही! (‘त्रिशूल’)




१९८१ साली आलेल्या ‘लावारिस'पर्यंत “आज या तो इन्साफ़ होगा, या मामला साफ़ होगा” असे म्हणत अमिताभ यशाच्या सर्व सीमा ओलांडत होता. १९८३ च्या ‘कूली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभवर जो अपघाती प्रसंग ओढवला, त्यातूनही प्रेक्षकांच्या सदिच्छा आणि ईश्वरकृपेच्या बळावर अमिताभ बाहेर पडला. शिवाय, सामान्य जनतेपासून ते बड्या असामींपर्यंत अमिताभचा चाहतावर्ग किती मोठा आहे याचा प्रत्ययही खुद्द अमिताभच नव्हे, तर सर्वांनाच आला. इतका अवघड प्रसंगही अमिताभच्या ‘अमिताभ’ बनण्यातला अडथळा बनू शकला नाही. 

नंतर मात्र १९९१ साली प्रसारित झालेल्या ‘अजूबा’मध्ये “मैं फौलादी शैतान की मदद से सुल्तान तो क्या, सारी दुनिया पर फतेह हासिल कर सकता हूं... शैतान जिंदाबाद, शैतान जिंदाबाद,” असे अमिताभ म्हणत होता; परंतु त्याचवेळी तो त्याच सिनेमात “सुख और दुख दोनों ऊपरवाले की मांद है... इसलिए सुख की तरह दुख को भी अपनाना सीखो,” असा समजुतीचा सल्लाही देऊ लागला होता. एकेकाळी अन्यायाविरूद्ध झगडत, न्याय अक्षरशः हिसकावून मिळविणाऱ्या अमिताभला असा समजुतीचा सल्ला देताना पाहणे बहुधा प्रेक्षकांना रुचले नसावे. पुढच्या संपूर्ण दशकभरात अमिताभच्या खाजगी आणि फिल्मी आयुष्यात काय काय उलथापालथी झाल्या याचा इतिहास आता सर्वांना तोंडपाठ आहे, तो सांगण्याची ही जागा नव्हे. पण, १९७५ साली आलेल्या ‘ज़मीर’ चित्रपटात अमिताभच आपल्याला सांगून गेलाय... “तेरे गिरने में भी तेरी हार नहीं; कि तू आदमी है, अवतार नहीं... जो देश वो भेष बना प्यारे, चले जैसे भी काम चला प्यारे... प्यारे तू गम न कर..!” अमिताभ हे फक्त गाण्यात म्हणून गेला नाही, तर त्याच्या प्रत्यक्ष जीवनातही त्याने या मंत्राचे तंतोतंत पालन केले आहे.



गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत कितीही अत्याधुनिक आणि ठेका धरायला लावणारी देशी किंवा पाश्चिमात्य गाणी आली तरी, अमिताभच्या कित्येक गाण्यांना ती कधीच मागे सारू शकली नाहीत. ‘डॉन’ मधले ‘अरे दीवानों, मुझे पहचानो’ हे गाणे वाजवले नसेल असे एकही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देशभरात कुठेही नसेल. अमिताभच्या या ‘डॉन’च्या प्रेमात पडण्यापासून तर, नंतर सुपरस्टार झालेला शाहरूखही स्वतःला रोखू शकला नाही. पण, नंतरच्या ‘डॉन’ला अमिताभच्या ‘त्या’ ‘डॉन’ची सर नाही. दरवर्षी पावसाळा येतो, आणि दरवर्षीच त्याची सुरूवात झाल्याचे संकेत दोन कोमल नाजूक आवाजांवरून मिळतात... पावसाची चाहूल लागताच ‘पावशा घुम, पावशा घुम’ गाणाऱ्या एका पक्षाचे गाणे; आणि, रेडिओवरून वाजणारे ‘रिमझिम गिरे सावन’ हे सार्वकालिक हिरवेगार (evergreen!) गाणे! अमिताभ फक्त मन लावून कामच करत नव्हता, तर तो काळाच्याही पुढे होता. आजकलच्या ‘रिअॅलिटी शो’मध्ये तरूण मुले ‘प्रॉपर्टी’चा अभिनव वापर करण्याच्या कित्येक वर्षे आधी, म्हणजे १९८१ सालीच अमिताभने ‘है सारा ज़माना हसीनों का दीवाना, ज़माना कहे फिर क्यों बुरा है दिल लगाना’ या गाण्यातून दमदार नाच करत कित्येक वोल्टच्या बल्ब्सनाही स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवले होते. ‘अँग्री यंग मॅन’च्या भूमिका एका बाजूला गाजत असतानाच अमिताभ दुसऱ्या बाजूला ‘पहले पहले प्यार की मुलाक़ातें याद हैं; मुझ को तो तुम्हारी सारी बातें याद हैं’ म्हणणाऱ्या हळुवार प्रियकराचीही ‘दो लफ़्जों की दिल की कहानी’ रंगवत होता. 



अमिताभबद्दल लिहावे तितके थोडेच आहे. पण, ९० च्या आधीच्या ‘अमिताभ’मध्ये जो चार्म होता, त्याची तुलना नंतरच्या कशाशीही होऊ शकत नाही. आता अमिताभ जास्त ‘मॅच्युअर’ झाला आहे. वय वाढेल तसतसा तारुण्यातला ‘वेडेपणाही’ कमी कमी होत जातो, आणि अंगात ‘शहाणपण’ भिनत जाते! पण, आम्ही प्रेमात पडलो होतो, आणि यापुढेही ज्याच्या प्रेमात राहू, ते ‘त्या’ ‘वेड्या बच्चन’च्या! आजकालच्या नटांप्रमाणे, ‘मी rowdy आहे,’ हे ज्याला कधीही ओरडून सांगावे लागले नाही, तो ‘तो’ बच्चन! आजही ज्याच्या अभिनयाला पकडणे ‘मुश्कीलही नहीं, नामुमकीन हैं’ तो ‘तो’ बच्चन! ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’ म्हणत आत्मविश्वासाच्या जोरावर एका विशिष्ट ठामपणाने पडद्यावर जोरकसपणे उभ्या राहणाऱ्या ‘त्या’ बच्चनचे डाय-हार्ड फॅन आम्ही! 

‘लावारिस’ चित्रपटात अमिताभच्या तोंडी एक गंभीर डायलॉग आहे, ‘हम तो उन लोगों में से है, जो इस दुनिया में सिर्फ़ शरीर लेकर पैदा हुए है... हमारी ना तो तक़दीर लिखी जाती है, ना ही आसमाँ में हमारे मुक़द्दर के सितारे होते हैं!’ पण, अमिताभची ‘तक़दीर’ लखलखीत लिहिली गेली आहे.

मी अमिताभला पाहिले आहे, पण त्याच्याबरोबर आणखीन एकदा कधीतरी पाच मिनिटे घालवायची माझी खूप इच्छा आहे. कदाचित त्या भेटीत त्याच्या हिमालयाएवढ्या मोठ्या व्यक्तिमत्तवासमोर मला फार काही बोलता येणार नाही, त्याचे तोंड भरून कौतुक करता येणार नाही; पण ती पाच मिनिटे कधीतरी आयुष्यात यावीत ही इच्छा कायमच आहे. नाहीतर ‘त्रिशूल’मध्ये अमिताभने म्हटल्याप्रमाणे “मुझ से पाँच मिनट ना मिलकर आप ने अपना पाँच लाख का नुकसान किया हैं,” असे काहीतरी होईल. खरेतर ते नुकसान पाच लाखांचे नसेल, तर न मोजण्यासारखे असेल.

अमिताभ, तूच तुझ्या एका गाण्यात म्हणून गेला आहेस...
“वो सिकन्दर क्या था ज़िसने, ज़ुल्म से जीता ज़हां;
प्यार से जीते दिलों को, वो झुका दे आसमां...
जो सितारों पर कहानी प्यार की लिख जाएगा;
वो मुक़द्दर का सिकन्दर जानेमन कहलाएगा..!”



तू तुझ्या अदाकारीने, अभिनयावरच्या अखंड प्रेमाने, भारदस्त व्यक्तिमत्त्वाने, तुझ्या त्या खर्ज्यातल्या आवाजाने आणि विजीगिषु वृत्तीने कायमच आमच्या मनाला जिंकत आला आहेस, आणि खराखुरा ‘मुक़द्दर का सिकंदर’ ठरला आहेस!!!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अमिताभ..!

(महत्त्वाची तळटीप- अमिताभच्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रचंड मोठ्या यशामागे लेखकद्वय सलीम-जावेद (सलीम खान आणि जावेद अख्तर) आणि अभिनेते-लेखक कादर खान यांनी लिहिलेल्या आणि अमिताभच्या व्यक्तिमत्वाला साजेश्या संवादांचा (डायलॉग्ज) सिंहाचा वाटा होता. एखाद्या अभिनेत्याला सुयोग्य अशी भूमिका मिळणे आणि त्याच्या तोंडी त्याला साजेसे संवाद असणे यालाही सद्भाग्य लागते. अमिताभ याबाबतीतही सर्वांपेक्षा अधिक नशीबवान ठरला हे कोणीही नाकारू शकणार नाही.)

(आपल्याला हा लेख आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या आणि फॉरवर्ड करा. न आवडल्यास बिनधास्त डिलीट करा.)

(© डॉ‌. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस.,एम.डी.)
(वॉट्सॲप संपर्क- 8329381615)
(www.dramittukarampatil.blogspot.com)
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन)

Comments

  1. साहेब.... वाचताना अंगावर शहारा आला.... जबरदस्त... असे लिहीण्याची ताकत फक्त आणी फक्त एका कट्टर चाहत्यातच असते....❤️❤️. सलाम आपल्या लेखणीला व आपल्या समृद्ध शब्द भंडाराला...... Happy birthday Big B.. 🎉🎊💐

    ReplyDelete
  2. अमित ! खूप छान लिहला आहे लेख...नेहमीप्रमाणे एकदा वाचायला सुरुवात केली की संपेपर्यंत इतरत्र लक्ष विचलित होत नाही...हीच तुझ्या लेखनाची जादू ...
    या लेखातून खूप काही काही शिकण्यासारखं आहे
    Happy Birthday Big B 🎂💐

    ReplyDelete
  3. अमित सुंदरलेख! मला इथे आवार्जुण उल्लेख कारवासा वाटतो तोअमिताभची देहबोली आणि शैली ओळखुण त्याला साजेशे लिखान लिहणार्या त्या सर्व बुध्दीवंतानी केलेली शब्दांची योग्य निवड. माझे त्यांना ही माझे कोटी कोटी प्रणाम .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, सर. आपले म्हणणे एकदम खरे आहे.

      Delete

Post a Comment