गावपळण: श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा यांचा अमीट वारसा (Gaonpalan/ Gavpalan: An age old tradition of temporary migration of a native village to another village for various reasons)
‘गावपळण’: श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा यांचा अमीट वारसा
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
आधी ‘सुंदर प्रवासा’विषयी...
(आपल्या बाबतीतही प्रवासाचे नियोजन करताना हे सगळं असंच घडतं ना..?)
बुधवारी रात्री १०:०० वाजता-
दि. ०८ जानेवारी, २०२५ रोजी रात्री दै. ‘पुढारी’च्या ऑनलाईन वर्तमानपत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बातम्या चाळत असताना, अचानक समोर आलेल्या “वैभववाडी: शिराळे गावची गावपळण सुरू” या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले आणि मनात विचारचक्र सुरू झाले.
खरे सांगायचे तर ‘गावपळण’ या परंपरेबद्दल मला काही फारशी माहिती नव्हती. पण, पेपरमधील त्या बातमीने मनात जराशी हालचाल माजवली. हिवाळा संपत आला तरी यंदा (दरवर्षीप्रमाणे!) कुठेही फिरायला गेलो नव्हतो. त्यामुळे रात्रीच ‘गुगल मॅप’वरून ‘शिराळे’ गाव नक्की कुठे आहे, याचा कानोसा घेतला. वैभववाडीपासून पुढे जवळपास १६-१८ किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकाचे हे शेवटचे गाव असल्याची माहिती मला मिळाली. बुधवारी मी ड्यूटीवर असल्यामुळे ‘दुसऱ्या दिवशी बघूया, जायला जमलं तर जमलं’ असे मी मनात ठरवले होते. पण, याबद्दल मी कोणाशीच काही बोललो नाही. (छान प्लॅन केला की तो त्यापेक्षाही छान प्रकारे फसतो इतका अनुभव तर आता माझ्या गाठीशी आहे. शिवाय, आधी कुणाला प्लॅनबद्दल सांगितले तर लगेच, ‘उद्या जरा माझे काम आहे’, ‘जाऊया, पण जरा दुपारनंतर निघू’, ‘मला पण कुठेतरी जायचंच होतं फिरायला, पण उद्याऽऽऽ... जमेल असे वाटत नाही’, ‘उद्या गुरूवार, बाजाराचा दिवस, दुकान हॉटेल बंद ठेवता येणार नाही’, ‘सर, आज फर्स्ट शिफ्ट आहे माझी, पुढच्या आठवड्यात जाऊया की...’ अशी मासलेवाईक उत्तरे मिळण्याची शक्यता असते. म्हणून मग अकराला निघायचे असेल तर सगळ्यांना बरोबर पावणेअकराला सांगायचे आणि अकराला थेट गाडीला किक मारायची (आणि बरोबरच्यांनाही मारायला लावायची) हे उत्तम! प्लॅन यशस्वी करण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे, हे मी आता अनुभवांती हक्काने सांगू शकतो. असो... विषयांतर, विषयांतर...)
![]() |
‘गावपळण’ असलेल्या मूळ ‘शिराळे’ गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अशा पद्धतीने बंद केला जातो. |
गुरुवारी सकाळी १०:३० वाजता-
मी एकनाथना फोन करतो.
रिंग होताच एकनाथ म्हणतात, “गुड मॉर्निंग, सर. बोला की. आवरलंसा काय?”
मी, “गुड मॉर्निंग कुठलं... दुपार झाली... एवढा वेळ लागतोय होय आवरायला?” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
“आज जरा पोलिस स्टेशनमध्ये काम जास्त आहे, सर. आलोय तितंच,” इति एकनाथ.
“अहो, आवरा की मग. किती वेळ! चला जरा वैभववाडीला जाऊन येऊया,” माझा प्रेमळ आग्रह.
“अं... सर, काम आवरायला जरा वेळ लागणार ओ... आज उरूस पण आहे गडावर, सायेब पण लवकर येतील नाय,” एकनाथ म्हणाले.
“मला काही माहिती नाही. आवरा लवकर. किती वेळात आवरणार सांगा. लगेच जाऊन यायचंय दोन तासांत,” मी म्हणालो.
“एक अर्धा तास द्या की, सर... आवरतो जरा पटापट... खरं तेवडा वेळ लागणार,” एकनाथनी उत्तर दिले.
“ठीक आहे... आवरा, आणि मला फोन करा लगेच,” मी फोन ठेवताना म्हणालो.
.
.
.
अकरा वाजता एकनाथचा फोन आला.
“सर, दवाखान्याजवळ आलोय. येताय काय भाईर?”
“अहो, ओपीडीतच आहे मी. सर आले नाहीत अजून. आज जरा जास्त वेळ झाला सरांना,” आता अडचण सांगायची माझी वेळ होती.
.
.
.
साडेअकरा वाजून गेले होते.
दहा मिनिटांत ओपीडीतून बाहेर पडलो.
बाहेर प्रदीप (नेहमीप्रमाणे) फोनवर बोलत उभा होता.
“प्रदीप, आज ‘डे’ आहे का ‘नाईट’ तुझी?” मी विचारले.
“आत्ता ड्यूटी नाही, सर. माझी ड्यूटी झाली. काय झालं?” तो म्हणाला.
“चल की तात्यांच्याकडे, चहा घेऊ जरा. तुझी गाडी घेऊन ये लवकर, नेहमीप्रमाणे वेळ लावू नको. काम आहे,” माझा धमकीवजा आदेश!
“येतो, सर,” उत्तर आले.
.
.
.
जवळपास बारा वाजत आले आहेत.
“तात्या, एक चहा करा मस्त. एकनाथ येऊन गेले काय इथे?” मी विचारले.
“हो, आत्ताच गेला. तुमची वाट बघत थांबला होता,” तात्या.
“चला, वैभववाडीला जाऊन येऊया लगेच,” मी गळ घातली.
“न्हाई सर... परवा पडलेलो दुखतंय अजून,” तात्या बोलले.
“ठीक आहे. मग ओंकारला नेतो बघा. (ओंकार हा माझे मित्र तात्या यांचा पुतण्या आहे.) आता काही ऐकणार नाही मी तुमचं,” माझा ठाम निर्णय.
“न्या, न्या. फिरवून आणा त्याला,” उत्तर आले.
.
.
.
तोपर्यंत सव्वाबारा झाले होते.
“प्रदीप, एकनाथना फोन लाव रे. एवढा वेळ कुठं गेले आहेत? लई कामाचे आहात माहिती आहे म्हणावं. सर ओरडायला लागलेत म्हणून सांग,” मी म्हणालो. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
“सर बोलणं झालं. जेवायला बसलेत ते,” प्रदीप म्हणाला.
“अरे काय हे! तिथं वैभववाडीत खाल्लं असतं ना काहीतरी. असू दे आता. यायला सांग लवकर,” मी रागावलो.
.
.
.
“सर, एकनाथदा आलेत बघा. ओंकार पण आलाय. काय सांगायचं त्यांना?” प्रदीपने विचारले.
“काय म्हणजे? वैभववाडीला जायचंय म्हणून सांग. चला लवकर. आता काही कारणं नकोत. तोपर्यंत ‘मॅप’वर शिराळे गाव शोध बरं जरा,” मी गडबडीत बोललो.
“ओक्के, सर,” प्रदीप.
![]() |
गगनबावडा - वैभववाडी - सडूरे - शिराळे मार्ग |
“ते नव्हं, सर. असं अचानक का वैभववाडीला? का जायचंय तितं?” एकनाथने खडा टाकून बघितले.
“अहो, गेले आठ दिवस वाघ दिसतोय तिथं,” असे म्हणत मला अंशुमन भोसले साहेबांनी पाठवलेला आजऱ्यातल्या वाघाचा व्हिडिओ मी एकनाथना दाखवला.
“सर... अहो अस्सल पट्टेरी हाय की ह्यो... डेंजर दिसतोय,” एकनाथ डोळे विस्फारून बोलले.
“होय ओ... असाच कसा मी नेईन तुम्हाला! चला वाघ दाखवतो. तो ‘फॉरेस्ट’मध्ये संदेश नावाचा मित्र आहे माझा, त्यानेच पाठवलाय हा व्हिडिओ,” मी त्यांना फसवतोय हे मी कुणाच्याही लक्षात येऊ दिले नाही.
“चला मग, जाऊया लवकर. कसला आहे तो पट्टेरी वाघ आज बघूयाच एकदा,” एकनाथच्या उत्साहाला भरते आले होते.
“चला प्रदीप, किक मारा...” मी प्रेमळ आदेश दिला!
गगनबावड्यातील मुख्य चौकातून निघताना आमच्या ओळखीच्या आण्णांकडे गाडीची ‘एअर' मी चेक केली आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात झाली.
दुपारी अंदाजे १२.३० वाजता-
नव्याने बांधलेल्या आणि काम चालू असलेल्या करूळ घाटातील अक्षरशः ५०-५० मीटर अंतरावर असणाऱ्या नागमोडी वळणांवरून ‘बुलेट’ चालवताना जी मजा येत होती, तशी दुसरीकडे नाही! (सगळीकडे प्रवास करताना हेच म्हणायचे, म्हणजे जरा बरे वाटते!) (घाट किंवा करूळ घाट हा आजचा मुख्य विषय नसल्यामुळे मी आज त्याबद्दल फार काही लिहीत नाही. त्यावर एक विशेष लेख पुन्हा कधीतरी...)
मजल-दरमजल करत आणि थोडीशी दंगामस्ती करत आम्ही १.३० वाजेपर्यंत वैभववाडीच्या मुख्य चौकात पोहोचलो. तिथून पुढे जे दोन रस्ते जातात, त्यातल्या डाव्या रस्त्याने जायला लागेल असे प्रदीप म्हणाला. मग तिथल्या आमच्या आवडत्या ‘भगवती टेस्ट Tea’ या गुळाच्या चहाच्या दुकानासमोर थांबून ‘लगेच चहा घ्यायचा की येताना घ्यायचा’ यावर धावती चर्चा झाली, आणि चहासाठी परत येताना थांबायचे ठरले. (इथल्या गुळाच्या चहाची चव छान आहे. ती इतकी की, एरव्ही एखादा कप चहा प्यायला टाळाटाळ करणारा प्रदीप इथे आला की २-३ कप चहा सहज पितो. बाकी, मी ज्या गावात जाईन तिथे चांगला चहा कुठे मिळतो याची माहिती लगेच गोळा करतो... चहा हाच आमचा खरा धर्म आणि ‘टी पॉझिटिव्ह’ हाच आमचा रक्तगट!)
![]() |
वैभववाडीतला मुख्य चौक. माझे आवडते गुळाच्या चहाचे दुकान याच चौकात आहे. छायाचित्रात डावीकडून उजवीकडे मी, प्रदीप, ओंकार आणि एकनाथ. |
दहा-पंधरा मिनिटांनी-
रस्त्यावर लागलेल्या सांगुळेवाडी गावातून पुढे १६-१७ किलोमीटर अंतरावर शिराळे गाव असल्याचे समजले. सुरुवातीचा हा जवळपास १० किलोमीटरचा रस्ता कच्चा आणि फक्त खड्डे आणि मातींनी भरलेला होता. शिवाय ठिकठिकाणी रस्त्याची कामेही सुरू आहेत. जाताना मध्येमध्ये खूप वाड्या लागत होत्या, चव्हाण वाडी, बौद्ध वाडी, राणे वाडी अशी गावे होती. मध्ये तर एक चक्क ‘तुळशीचे भरड’ नावाचा नामफलक आम्हाला दिसला. निमअरूळ, अरूळ, सडुरे आणि सरतेशेवटी शिराळे असा गावांचा क्रम आहे. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
![]() |
‘तुळशीचे भरड’ हे गावाचे नाव आहे की अन्य काही ते समजले नाही. त्या रस्त्यावर लावलेले असेच असणारे इतर सगळे फलक हे गावांच्या नावाचेच होते, हे मात्र नक्की! |
![]() |
निसर्गरम्य ‘हिरवागार’ रस्ता |
गगनबावड्यात थंडी होती म्हणून आम्ही सर्वांनी आपापले ‘जर्किन’ बरोबर नेले होते; पण कोकणात जाताच लगेच थंडी कुठल्या कुठे उडून गेली आणि उन्हाचा जोरदार चटका बसू लागला. त्यात धुळीची जराही कमतरता नव्हती. त्यामुळे आमच्या सर्वांच्या जर्किनचे रंग काही मिनिटांतच बदलून गेले.
जवळपास दहा किलोमीटर अंतर गेल्यावर मूळ रस्त्याच्या डावीकडे आम्हाला एक पूल लागला, जो संपला की त्याच्या समोरच ‘सौंदरणे-तांबुळघाटी’ नाका आहे. या भागात बारमाही वाहणाऱ्या ‘शुक नदी’वर हा पूल आहे. मागेच (आणि तिन्ही बाजूंना) हिरवेगार उंचच उंच डोंगर आहेत. पुलावरून पाहतानाही खाली नदीच्या पाण्यातील डोहात मुक्तपणे पोहणारे असंख्य मासे अगदी स्पष्ट दिसत होते. असे दृश्य पाहून आम्ही तिथे थांबलो नसतो तरच नवल! तिथे उतरून आम्ही खाली नदीपर्यंत गेलो. तोपर्यंत एकनाथनी खिशातून आणलेली पिवळ्या वाटाण्यांची दोन पाकिटे काढली. वाटाणे चघळत चघळत आम्ही नदीच्या डोहापर्यंत पोहोचलो. काही वाटाण्यांची पूड करून ती तिथल्या माशांना खायला घातली. वाटाणे पाण्याच्या पृष्ठभागावर पडताच ते खाण्यासाठी होणारी माशांची झुंबड पाहून आम्ही थोडावेळ अक्षरशः भान हरपून गेलो होतो.
तिथे दिसलेली आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, तिथल्या दगडगोट्यांत पडलेले गारगोटीचे मोठ्ठाले दगड! गारगोटीचे इतके मोठे दगड आम्ही क्वचितच इतरत्र कुठे पाहिले असतील. शिवाय, तिथेच नदीच्या थंडगार पाण्याभोवती दगडांवर बसून ‘गारगोटीच्या दगडांची निर्मिती कशी होते’ यावर एकनाथ आणि प्रदीप या भूविज्ञान शास्त्रज्ञांचा परिसंवाद झडला, तो वेगळाच! आमच्याबरोबर फिरणाऱ्या मित्रांकडे ज्ञानाचे इतके मोठे भांडार आहे हे पाहून आमच्यासारख्या अज्ञानी लोकांचा ऊर अभिमानाने भरून येतो (आणि, मग आम्हाला खूप दम लागतो,) ही गोष्ट वेगळी!
![]() |
मी हातात घेतलेला आणि खाली पांढऱ्या रंगाचा दिसणारा हे दोन्ही दगड गारगोटीचे आहेत. |
सौंदरणे-तांबळघाटी नाका...
यांपैकी तांबळघाटी हे केवळ १० घरांचे गाव डोंगराच्या कड्यावर अशा ठिकाणी वसले आहे की, कोणी विशेषकरून सांगितले नाही तर त्याठिकाणी एखादे गाव आहे हे कुणाला कळणारसुद्धा नाही. वैशिष्ट्य म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूर सीमेवरील हे शेवटचे गाव असूनही इथे जायला एकदम चांगल्या पद्धतीचा डांबरी रस्ता उपलब्ध आहे. या गावाच्या अलीकडून जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे शिराळे गावात आपला प्रवेश होतो; आणि शिराळे गावची हद्द चक्क दाजीपूर अभयारण्याला (जि. कोल्हापूर) लागून आहे.
![]() |
‘शुक’ नदीवरील पूल व सौंदरणे-टेंबुळघाटी नाका |
![]() |
बारमाही वाहणाऱ्या ‘शुक’ नदीचे पात्र |
त्या नाक्यापासून पुढे डावीकडे ४ किलोमीटर अंतरावर ‘शिराळे’ गाव वसले आहे. त्याच्या अलीकडे २.५-३ किलोमीटर अंतरावर ‘सडुरे’ गावच्या हद्दीतील रस्त्याकडेच्या एका शेतात शिराळे गावच्या लोकांची ‘गावपळण’ बसली आहे अशी माहिती जाताना रस्त्यावरील काही लोकांनी आम्हाला दिली होती. ‘गावपळणी’च्या ठिकाणचे वर्णन करण्याआधी वर लिहिलेले सर्व हे ‘नमनाला घडाभर ओतलेले तेल’ आहे. ते वाचताना तुम्हाला मजा आली असेल अशी खात्री आहे. (नसली तरी तुम्हाला ते वाचण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय होता, नाही का!) (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
![]() |
रस्त्यातली खूप मोठी आमराई |
![]() |
बांबूचे बेट |
दुपारचे २-२.१५ वाजले असताना आमचा राहिलेला थोडासा पुनर्प्रवास सुरू झाला. हिरव्यागार रस्त्यांवरून न थांबता आम्ही जिथून पुढे रस्ता अडवला गेला होता त्याठिकाणी पोहोचलो. तिथे एक दादा गुरं राखत उभे होते.
“दादा, ‘गावपळण’ केलेले गाव सडुरे इथेच आहे का?” आम्ही विचारले.
“व्हंय, हेच... गाडी लावा इकडं,” ते उत्तरले.
‘ठीक आहे,’ म्हणून आम्ही रस्त्याकडेला आमच्या गाड्या लावल्या. तसेही पुढचा रस्ता बंद असल्यामुळे तिथून काही वाहतूक सुरू नव्हतीच; पण कशाला उगीच रिस्क घ्यायची, नाही का?
तिथेच उभारून आम्ही त्या दादांना जुजबी माहिती विचारली. ‘‘गावपळण’ नक्की कधी असते, त्यात काय काय प्रथा असतात, ती किती दिवस असते, यावेळी मूळ गावात कशी परिस्थिती असते’ वगैरे माहिती आम्ही रस्त्यावर उभारूनच घेत होतो.
मागे एका चरीच्या पलीकडे माळासारख्या भागात ‘दडोबा’च्या डोंगराच्या पायथ्याशी कुशीत वसवलेल्या आणि कापड-प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करून बनविलेल्या छोट्या झोपडीवजा घरासमोर बसलेले साठीतील एक काका आमचे बोलणे ऐकत होते. बोलणे ऐकता-ऐकताच आमच्याकडे पाहून ते ओरडले, “त्येंका कित्यांक इचारतंय? हिकडं या, मी सांगतो सगळं. या, बसा इथं निवांत.”
ते ऐकताच आम्ही जरा ‘रिलॅक्स’ झालो. जास्तीचा कोणताही विचार न करता मी पटकन त्या काकांनी घरासमोर टाकलेल्या चटईवर जाऊन बसलो.
माझा अनुभव बोलतो...
२०१५-१७ साली महाराष्ट्रातल्या जवळपास पन्नासहून अधिक गडकिल्ल्यांवर मी फिरलो आहे. पालघर-ठाणे-नाशिक-अहिल्यानगर ते कोल्हापूर इथल्या अतिशय दुर्गम आणि आदिवासी भागांत वसलेल्या किल्ल्यांवर मी गेलो आहे. तिथे गेल्यावरचा सार्वत्रिक छान अनुभव म्हणजे या सगळ्या ठिकाणी भेटलेली बोलणारी माणसं! आपण जरा चौकशी करायचा अवकाश की, तिथली जुनीजाणती माणसं लगेच माहिती सांगायला पुढे येतात. मूळ गोष्ट म्हणजे, आपण आधी बोलायला सुरू करायला पाहिजे. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याला जरी तिथली काही माहिती असली तरी त्या भागात प्रत्यक्ष राहणारे लोक जी माहिती सांगत असतात ती उत्सुकतेने ऐकण्याची आपली तयारी पाहिजे. आणि, तिसरी सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एखादी गोष्ट दोघांनाही सारखीच माहिती असली तरी त्या गोष्टीकडे पाहण्याचा स्थानिकांचा दृष्टिकोन वेगळा असतो; आणि आपला दृष्टिकोन वेगळा. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी मी नेहमीच तयार असतो. प्रदीप, ओंकार आणि एकनाथनाही मी ही गोष्ट नेहमी सांगत असतो.
गावपळण म्हणजे..?
थोडक्यात सांगायचे तर, ‘गावपळण’ म्हणजे, वर्षातून एकदा (किंवा, काही गावांत तीन वर्षांतून एकदा) आपल्या मूळ गावातल्या ग्रामदैवताचा कौल घेऊन काही दिवस (तीन, पाच, सात किंवा एकवीस) दुसऱ्या गावच्या हद्दीत जाऊन राहणे. यावेळी मूळ गाव सोडताना तेथील ग्रामदैवत व ज्या नवीन गावठाणात काही दिवस रहायचे आहे, तेथील ग्रामदैवत या दोन्ही दैवतांची परवानगी घेतली जाते. या कालावधीदरम्यान मूळ गावात कोणालाही जाण्या-येण्याची परवानगी नसते. शिवाय, मूळ गाव हे स्वतःसह घरातील पाळीव प्राण्यांनाही बरोबर घेऊनच सोडले जाते.
प्रेम, माया, आपुलकी आणि विश्वास-
आम्ही त्या काकांजवळ जाऊन बसलो आणि येण्याचे कारण सांगितले.
“काल पेपरमध्ये तुमच्या गावाच्या ‘गावपळणी’ परंपरेबद्दल वाचलं, काका,” मी बोलायला सुरुवात केली.
“हं, बरीच माणसं येतात. आमदार-खासदारसुद्धा दरवर्षी आमच्या गावाला न चुकता येऊन जातात,” काका म्हणाले.
“हो, येत असणार... वेगळी परंपरा आहे ही... खूप कमी गावं अशी आहेत,” मी म्हणालो.
“इकडं तळकोकणात थोडी गावं आहेत... तिकडे वर आचरा, चिंदर गावातल्या ‘गावपळणी’बद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण, त्या गावांत दर तीन किंवा चार वर्षांनी ‘गावपळण’ पाळतात; तेही फक्त तीन दिवस. आमची ‘गावपळण’ दरवर्षी असते आणि ती किमान सात दिवस असते. सात दिवसांनंतरही देवाने ‘डावा’ कौल दिला, तर मग आणखीन तीन दिवस आम्ही वेशीबाहेर थांबतो,” काकांनी जरा वेगळी माहिती दिली.
![]() |
‘शिराळे’ गावात भेटलेले ग्रामदैवत ‘श्री गांगेश्वर’ मंदिराचे पुजारी श्री. पाटील काका |
काका पुढे बोलत राहिले, “तुमच्या राधानगरी बाजूला पण काही गावांत ‘गावपळण’ असते... तुम्ही कोल्हापूरचे, म्हणजे मानबेट, चौके गावांबद्दल तरी तुम्हाला माहिती असेलच.”
वर मी काकांचे संवाद जरा प्रमाणभाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे; पण कोकणात जाऊन कोकणी ऐकायची नसेल तर काय मजा? इथून पुढचे संवाद थेट काकांची कोकणी आणि आमची मराठी यांतून... बघा, किती गोड वाटतंय ते!
कोकणी भाषेचा आणि माणसांचा गोडवा-
“काका, जरा तुमच्या गावातल्या ‘गावपळणी’बद्दल सांगा ना!” आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.
![]() |
कोकणी माणूस आणि कोकणी भाषा- हापूस आंब्यासारखे मधुर असतात. |
“आं... आमका गाव शिराळा (शिराळे)...आमी पाटील समाज... पाटील समाजापैकी आमी हिता वर्साचा वार्षिकी करूचा... ह्यां आमकां तां करताक... आणि, त्या करूकच्या आदी देवाक प्रसाद घालतांव... ‘बाबा, हे देवा, आमी वार्षिक करतांव... तुजं बारा-पाच कराचं हुकुम हांय काऽय?’ म्हणून विचारतंव... मंग ह्येच्यात त्यो देव परवांगी देतंय आमकाक... परवांगी दिल्यानंतर ‘बाबा, ह्यच्यात हानी-नुसकानी त्येचो मालक तू...’ मग काय आडवा-उभा आसंल तं त्यें देव पष्ट सांगणार... ‘उजवं आसंल तं उजवं दे, डावं मागितलं तं डावं दे’,’’ काका सलगपणे सांगत राहिले, “पण आत्तापर्यंत आमची हानी-नुसकानी अशी झालेली नाय, ह्यां मी सांगतंय... ढ्वॉर-वासरू असू दे... कसा पण येऊं दे... आता आमी जर गावात ढ्वॉरं सोडली तं ह्यें दाव्याचं माजी ढ्वॉरं येतील ह्यां दाव्याला... हंयसूक त्या दाव्याला जाणार न्हाई... मंग आणि काय सांगू?” काकांनी एका दमात बऱ्याच गोष्टी झटकन सांगून टाकल्या.
“काका, मग ते डावं-उजवं काय?” मी विचारले.
“... उजवं म्हंजे, रखवाल करणार असशील तं उजवं दे... न्हाय रखवाली करणार तं डावं दे... आसं असतं...” काका उत्तरले.
“काका, ते तुमचं गाव सोडून दुसऱ्या गावच्या हद्दीत जायचं ते कसं विचारता तुम्ही?” माझा पुढचा प्रश्न! (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
काका उत्तरासह तयारच होते, “आता दुसऱ्या गावात जायचं म्हंजे... ही आमची जागा ती ठरलेली हाय... मंग ह्या जाग्यालासुद्धा आमका रखवाली बांधून लागतंय... ह्या देवाची परवांगीसुद्दा घेऊची लागते... म्हंजे ‘सडूर’च्या (सडूर हे गावाचे नाव आहे.)... हीसुद्दा परवांगी... त्या देवाकंडं काडूक लागत्या... त्यो देव सांगणार, ‘माजी रखवाली हाय, जावा तुमी’... मंग हंयवण आमी येऊन चार कोंबडी देतांव, नारल दोन... ‘बाबा, हंय इवल्यानंतर आमका रखवाली कर, ह्यां चतुस्सीमेत...”
“बरं... मला ते नैवेद्याचं विचारायचंच आहे; पण त्याआधी देवाला गाऱ्हाणं कसं घालताय ते जरा सांगता का?” मी विचारले.
“हां... त्ये आसं,” काका सांगू लागले, “बाबा देवा गांगेश्वरा, पुरका सत्ताईस देवा, देवा... तें चतुस्सीमेत जांव? (म्हणजे, मूळ गाव सोडून दुसऱ्या गावच्या हद्दीत.) मग झाल्यांन रखवालीचो कौल दे... गाव घराचो... त्याठिकाणी गेल्यानंतर कोणाचे लुळे ढक्को न लावता तूं तेंका परवांगी दे ‘गावभरांक’ (दुसऱ्या गावात रहायला जाणे म्हणजे ते गाव भरणे, म्हणून ‘गावभरांक’)... मं तों देणार... दिल्यांनंकी बरं समजा एकादं तितलं काय झालं तंऽ आमी तेंका परत विचारावू शकतांव की, ‘बाबा, तू सांगितलंयंस, ह्या का केलंस?’ इचारू शकतो ना! डॉक्टरापेक्षा ह्यां भांरीयाऽऽऽ... डॉक्टरका आमी इचारू शकत नाय ह्यां इंजक्शन का असा दिलंस का?”
निदान तोपर्यंत तरी काकांना मी डॉक्टर आहे याची जराही कल्पना नव्हती. नंतरही आम्ही बराच वेळ त्यांना ते सांगितले नाही. पण, बोलता बोलता काकांनी डॉक्टर -पेशंट यांच्यातील communication gap चे महत्त्वाचे कारण मात्र आपसूकच सांगून टाकले होते.
“हं... असं आहे तर ते... बरं ते नारळ आणि कोंबड्यांचं राहिलं की मध्येच. आणि, ते दोन्ही गावांतले वेगवेगळे देव वगैरे... त्याबद्दल जरा सांगा ना,” माझी उत्सुकता अजून संपली नव्हती.
“दोन देव... ह्यं रवळनाथ, त्यें गांगेश्वर... गांगेश्वर आन् रवळनाथ हे दोन्ही एकंच हैत... पण, त्यों मालक तिकडं, पुडं, गांगेश्वर! ... आणि त्याचा उपमां हांय ह्यों रवळनाथ... गांगेश्वरला कोंबडं चालत न्हांय... आन् रवळनाथाला पण चालत न्हांय...” काका सांगत होते.
“मग?” प्रदीपने माझा प्रश्न विचारला.
“रवळनाथाक नारल चालतंय... इतं एक भक लागतंय... गांगेश्वराचो शिपाईयो तो ‘घोरपी’ म्हणून... तेंका भक लागतंय... गांगेश्वर फक्त आमचा हांय तो फक्त नारलाचं वचन मागतो, एका नारलाचं...” काका उत्तरले.
“मग, तुम्ही कोंबडी कुणाला देता?” माझा प्रश्न.
“त्यें आंमी ‘घोरप्या’, तेंका देतंय,” काका म्हणाले.
“मग नेहमी (दरवर्षी) इथं तुम्ही (पौषातल्या) १४ तारखेलाच येता का?” आम्ही विचारले.
“हो, हो... तितनं पुढं सात दिवस इथंच राहतंय... मग जायाच्या आदल्या दिवशी परत तेंका इचारूतला आमका... आमी सगळे पाटील लोक जातो... ‘की, बाबा, जायाचं... बाबा, ह्यां वार्षिक पूर्ण झाला का?’ हंय इचारतो आमी... परत कौल लावतो... त्येंना जर परवांगी दिला, माजं बाबा वार्षिक पूर्ण झाला, तर जातो; नाय म्हंटला तर परत तीन दिवसांनं कौल लावूक... म्हंजे काय म्हाईत्यायकां? म्हंजे आमकासुद्दा (इतकं दिवस) ह्यें ऱ्हावचां नायंय... पण, आमचीसुद्धा परवांगी घ्यांवी नं... देवाजवळ इचारूक नकों कां? ‘बाबा, आमचा कसूचा घरात घे... घरात घे’... अशी रीत आं...” काकांनी हेही सांगून टाकलं.
(यंदा शिराळे गाव आणि सडुरे-अरूळे गावची ‘वार्षिकी’ उत्सव एकत्र येत असल्यामुळे सडुरे-अरूळे ग्रामस्थ आणि शिराळे ग्रामस्थ यांच्या चर्चेनंतर शिराळे गावची ‘गावपळण’ नेहमीपेक्षा एक आठवडा आधी करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती आम्हाला शिराळे ग्रामस्थांनी दिली.)
“खूप छान सांगितलं, काका तुम्ही,” आम्ही सगळे एका सुरात म्हणालो. आम्हाला सगळं ऐकून खूपच आनंद झाला होता.
सामाजिक दृष्टिकोनाचा पदर-
तेवढ्यात काकांनी त्यांच्या पत्नीला चहा करायला सांगितले. मी, अर्थातच ‘नको’ म्हटले नाही. चहाला नाही म्हणणे हे माझ्या तत्त्वाच्या विरोधात आहे. फक्त त्यांच्याकडे तितके साहित्य होते का हाच प्रश्न होता. पण ते जवळपास दोन आठवडे पुरेल इतके सामान जवळ ठेवतात असे त्यांनी आम्हाला सांगितले. (चहाला माझ्याबरोबरचे तिघेही ‘नको’ म्हणाले होते; पण समोर आल्यावर सर्वांनी भुरके मारत तो पिला ही गोष्ट अलाहिदा!) काकींनी चहा करेपर्यंत आम्ही त्यांची परवानगी घेऊन त्या एका खोलीच्या झोपडीत गेलो.
आत दोन चटया आणि दोन चुली होत्या. दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या पत्नी त्यात राहत होत्या. भाऊ वेगवेगळे झाले असले तरी ‘गावपळणी’च्या वेळी मात्र सर्वांना एकाच घरात रहावे लागते. शिवाय, गावातील श्रीमंत किंवा गरीब अशा सर्वांना त्याच पद्धतीच्या झोपडीवजा घरात आणि दिलेल्या जागेतच रहावे लागते, हे वैशिष्ट्य. आपल्याकडे कागदावर असणारी समानता लौकिकार्थाने मागास असणाऱ्या या गावात प्रत्यक्ष नांदताना दिसत होती. ‘गावपळणी’च्या कालावधीत सर्वांनी रहायचेही एकसारखेच, आणि खायचेही एकसारखेच! (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
चहा कोरा होता, पण छानच झाला होता.
चहा घेत घेत मग आम्ही काकांना जरा ‘गावपळण’ परंपरा नक्की कशी सुरू झाली याबद्दल विचारले.
![]() |
पाटील काकींनी आग्रहाने करून दिलेला ‘कोरा’ चहा! ‘जिथे चांगला चहा मिळतो तोच माझा स्वर्ग असतो’ हे माझ्या परिचितांना आता चांगलेच ठाऊक आहे! |
काकांनी चहाचा एक भुरका मारला आणि ते सांगू लागले, “ह्यं पाटील ह्यां गावात... गावात गेल्यानंतर आमच्या पूर्वजांनी... तवा ढोरा-वासरां भरपूर हुती... पन्नापन्नास ढोरा असायचा... त्या ढोरावर काय झालं, बोचडी पडली... मंग त्या पाटलांनं काय केलं, “बाबा रे, ह्यां ढोरावरली बोचडी जाण्यासाठी म्यां जरा भाईर जावूं का? गाव सोडून भार (बाहेर) जावूं का? अशा ठिकाणी मंग तो भाईर गेलो... (म्हणजे, शिराळे गावातून सडूरे गावी.) आन् त्यां ढोरांनं बोचडी... तापलेली जमीन आसंतं ना, तवा ती बोचडी उतारता ढोरावरली... मंग तेंचा बी परंपरा लागली... त्यां आसं झालं त्या...” हे सांगत सांगत काकांनी शिराळे गावच्या वसण्याचीही कहाणी थोडक्यात सांगितली, “तंवा किती, एक पाटील आणि एक बोडेकर... आणि, तो बोडेकर निगालो होतो पाटलांक टाकून... पाटील काय म्हटला, ‘आरं तू माका टाकून निगालंस, मग म्या कशाला ऱ्हावं इतं..? दोगंजण ऱ्हाऊया ना संगती’... मंग म्हणून तो गाव वसलो... आशी परिस्थिती... धनगर समाजाचे बोडेकर आणि पाटील एकत्रच ऱ्हाईले...”
इतक्या व्यवस्थित माहिती सांगणाऱ्या त्या काकांचे नाव आहे श्री. रवींद्र मुकुंदा पाटील. काका सध्या त्यांच्या वयाच्या साठीत आहेत, आणि शिराळे गावातील श्री. गांगेश्वर मंदिराचे पुजारीही आहेत. सध्या गावात वयोवृद्ध असे पंचाहत्तरीतले एकच आजोबा राहतात. बरीच तरूण मुले नोकरीधंद्याच्या निमित्ताने मुंबईला असतात.
‘गावपळणी’बद्दल तेथील ग्रामस्थ व मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणखीही बरीच माहिती बोलण्याच्या ओघाओघात दिली. ती अशी-
(१) ‘गावपळण’ चालू असताना गावात (सडुरे मुक्कामी असताना) जर कोणी मयत झाले तर मग तीन दिवस ते सर्व लोक मूळ गावात (शिराळे) जाऊन राहू शकतात. तीन दिवस झाल्यावर ते परत देवाला कौल लावतात, आणि “देवा गांगेश्वरा, तुझी वार्षिकी पूर्ण झाली का?” असे विचारतात. देवाचा कौल ‘उजवा’ आला तरच ते वार्षिकी पूर्ण झाल्याचे मानतात, अन्यथा परत सात दिवस ‘सडुरे’ गावी येऊन ‘गावपळण’ पूर्ण करतात.
(२) ‘गावपळणी’दरम्यान गावात कुणालाही प्रवेश निषिद्ध असतो. अगदी ग्रामपंचायत आणि अन्य शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनाही गावाबाहेर थांबूनच कामकाजाचे कार्यवहन करावे लागते.
(३) ‘गावपळणी’च्या निमित्ताने गाव सोडताना मूळ शिराळे गावातील घरादारांना कोणीही कड्याकोयंडे लावत नाही. तिथल्या सर्व गोष्टी आहे तशा सोडून ग्रामस्थ गाव सोडतात. त्यामुळे, गाव सोडण्याच्या एक-दोन आठवडे आधीपासून ‘सडुरे’ गावी राहण्या-खाण्याची तरतूद ग्रामस्थांनी करून ठेवलेली असते.
(४) ‘गावपळण’ चालू असताना जिल्हा परिषदेची शाळाही मूळ शिराळे गावात न चालवता, ती सडूर गावातील एका आंब्याच्या झाडाखाली व्यवस्थितपणे कोणताही खंड न आणता चालवली जाते.
(५) ‘गावपळणी’दरम्यान वाटणी झालेले भाऊही एकाच झोपडीत राहतात. शिवाय, गावातील लहानथोर, श्रीमंत-गरीब असे सर्व लोक एकसारख्याच परिस्थितीत राहतात. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(६) ‘गावपळणी’च्या कालावधीत कोणाला सर्पदंश झाला किंवा कोणी आजारी पडले, आणि त्याला गावातून बाहेर उपचारासाठी नेले, तर त्याला किमान सात दिवस परत गावात येता येत नाही. तसेच, जर अशी बाधित व्यक्ती जर गावातच राहिली, तर पुढचे किमान सात दिवस त्या व्यक्तीला ते गाव सोडता येत नाही. (सर्पदंशाचे उपचार गावातच करण्याकडे इथल्या ग्रामस्थांचा कल आहे; जो अशास्त्रीय आहे. या गावातील ही एक गोष्ट मात्र अंधश्रद्धेच्या दिशेने जाणारी आहे.)
(७) शिराळे गावचे लोक ‘गावपळणी’दरम्यान शेजारच्या ‘सडूर’ गावठाणातील ‘श्री. रावराणे’ यांच्या शेतात स्थलांतरित होतात, आणि तिथेच पुढचे सात दिवस झोपड्या बांधून राहतात. श्री. रावराणे एरव्ही तिथे तांदळाची शेती करतात. ‘गावपळण’ पार पडल्यानंतर शिराळेवासी लोक त्या शेतातील सर्व वस्तू (अगदी काठ्यासुद्धा) आहे तिथे, आहे तशा अवस्थेत ठेवतात. तिथून कोणीही काहीही घेऊन जात नाही.
![]() |
गावपळणीदरम्यान सडुरे गावठाणातील श्री. रावराणे यांच्या मालकीच्या शेतात शिराळे ग्रामस्थ मुक्काम ठोकतात. एरव्ही या जमिनीवर श्री. रावराणे भातशेती करतात. |
(८) शिराळे हे गाव संपूर्णतः डोंगरात स्थित असून तिथे असणाऱ्या वृक्षवेलींमुळे गावात स्वच्छ सूर्यप्रकाश पडत नाही. आजही ते गाव तसेच आहे. तेव्हा ‘गावपळणी’च्या दरम्यान जेव्हा ते खाली माळरान भागात येतात, तेव्हा त्यांच्या गावातील लहान मुलांना असणारे काही आजार किंवा त्वचेचे विकार स्वच्छ प्रकाशात ठळकपणे दिसून येतात आणि मग त्यावर योग्य उपचार करता येणे शक्य होते अशीही एक धारणा तिथल्या ग्रामस्थांच्या डोक्यात आहे. सध्या दवाखाने झाल्यामुळे कदाचित ही गोष्ट तितक्या प्रकर्षाने जाणवत नसेल, पण पूर्वी मात्र या गोष्टीचे महत्त्व नक्की असणार.
![]() |
‘दडोबा’च्या डोंगराखालील माळावर जिथे गावपळणीदरम्यान गाव वसते, तिथे माळरान असल्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. |
(९) शिराळे गावची ही प्रथा सुमारे ४५० वर्षे जुनी आहे.
(१०) गावभेट करून परत वैभववाडीला येताना आम्हाला रस्त्यात एक कोकणी पद्धतीचे एक टुमदार घर दिसले.
आम्ही तिथे जाऊन घराचे फोटो काढत असतानाच गावातील मध्यमवयीन एकजण आमच्याजवळ आले आणि आमची चौकशी करू लागले. आम्ही एवढे सुशिक्षित लोक फक्त गावपळण पाहण्यासाठी इतक्या दुरून आलो आहोत ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला. बोलत बोलत त्यांनी आम्हाला या गावपळणीचा आणखीन एक सामाजिक पदर उलगडून दाखविला.
ते गृहस्थ म्हणाले, “शिराळे गावात आमचे बरेच पाहुणे आहेत; पण आम्ही कधी तिथे गेलो तर ते सगळेजण आम्हाला एकदम भेटत नाहीत. काहीजण डोंगरात गेलेले असतात, काहीजण शेतात असतात, तर काहीजण कामानिमित्त बाहेर वैभववाडी, रत्नागिरी, मुंबई अशा ठिकाणी असतात. ‘गावपळणी’दरम्यान मात्र सगळे ग्रामस्थ एकत्र एका ठिकाणी राहत असल्यामुळे आम्ही वर्षातून तिकडे एखादी फेरी जरी मारली तरी आमचे सगळे नातेवाईक आम्हाला एकदमच भेटतात. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारता येते. छान वाटते.”
(११) शिराळे गावाप्रमाणेच मालवण तालुक्यातील आचरा, चिंदर या गावातही ‘गावपळण’ पाळली जाते, पण ती दर तीन वर्षांनी! शिवाय, तिथला देव आणि त्याबाबतची आख्यायिकाही जरा वेगळी आहे. वसुमती करंदीकर यांनी लिहिलेल्या एका लेखानुसार शेकडो वर्षांपूर्वी आचरे या गावात भूत-पिशाच्यांनी उच्छाद मांडलेला. त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता. तेव्हा सर्व आचरेवासीय श्री देव रामेश्वराला शरण गेले आणि यातून तारण्याची विनंती केली. तेव्हा रामेश्वराने तीन दिवस आणि तीन रात्रींकरिता गाव सोडण्यास सांगितले. या काळात साक्षात रामेश्वराने संपूर्ण गाव भूत-पिशाच्यांपासून मुक्त केले. आजही अशी श्रद्धा आहे की, गावपळणीच्या काळात श्री रामेश्वर गावाचे शुद्धीकरण करतो.
‘गावपळणी’मागचे अनोखे तत्त्वज्ञान-
लेखिका वसुमती करंदीकर यांच्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण सृष्टी नश्वर आहे. जन्माला आलेली व्यक्ती कधी ना कधी जाणार असते. पण, जीवन जगतानासुद्धा आपल्यावर घर सोडण्याची कधीतरी वेळ येते. मग, ते लग्नानंतर मुलीचे सासरी जाणे असो, शिक्षणासाठी मुलांचे परगावी जाणे असो. अगदी इहालोकीतून परलोकी जाणे असो. हे आनंदात जायचे का रडत, हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु, सात दिवस आपल्या घराला सोडून पूर्णत: गांगेश्वराच्या हवाली करून दूर जाण्याचा 'गावपळण' हा जणू ट्रेलर आहे. 'गावपळणी'चे मंतरलेले दिवस अनोखे साहचर्याचे, सहयोगाचे तत्त्वज्ञान शिकवून जातात. (लेखिकेने मूळ लेखात आचरा आणि तेथील दैवत श्री रामेश्वर यांच्या संदर्भाने हे उल्लेख केले आहेत.)
‘गाव भरण्या’चे वेध-
‘गावपळण’ सुरू होते त्याला ‘गाव फुटणे’ असे म्हणतात. ‘गावपळण’ संपन्न झाल्यावर गावात परतणे याला ‘गाव भरणे’ म्हणतात.
“देवा, तुजी ऱ्हाटी पूर्ण झाली का? आता गाव भराक परवानगी हायं का?” असे श्री गांगेश्वराला विचारून आणि त्याला कौल लावून त्याची परवानगी विचारली जाते. कौल उजवा आला तरच सात दिवसांनी गावात पुनर्प्रवेश केला जातो, अन्यथा पुढचे आणखीन तीन दिवस सडुरे गावात घालवून परत गांगेश्वराला कौल लावला जातो. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
वैज्ञानिक दृष्टिकोन-
(लेखिका- वसुमती करंदीकर यांच्या लेखातून उद्धृत)
आठवडाभर संपूर्ण गाव रिकामे राहिल्याने गावातील प्रदूषण निम्नस्तरावर येते. माळरानावर निसर्गाच्या सान्निध्यात वास केल्याने आपोआप निसर्गाशी जवळीक वाढते. नवीन पिढीला निसर्गाची ओळख होते.
मानवशास्त्रीय दृष्टिकोन-
(लेखिका- वसुमती करंदीकर यांच्या लेखातून उद्धृत)
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या जैविक प्रेरणा आहेत. त्या मानवालाही आहेत. त्यांचा समतोल मानवाचे उन्नयन साधतो. थोडीफार का होईना भीती ही असली पाहिजे. आजकाल कोण कोणाला भीत नाही, ही समस्या झाली आहे. पूर्वी भीतीच्या विधायक छायेखाली देवराई सुरक्षित राही. वने, काही जागा या सुरक्षित ठेवल्या जात. त्यामुळे थोडी भीती हवी. शिवाची नको, पण अशिवाची, पापाची भीती हवी. 'गावपळणी'मध्ये ही प्रेरणा जोपासली जाते. देवाशी नातेसंबंध जुळवण्याचा, त्याला आपल्यातील एक व्यक्ती मानण्याचा हा भाग असेल. या ‘देवा’चा दरारा या गावाला एकत्र ठेवतो. त्याची असणारी आदरयुक्त भीती गावाला या विधायक रुढीसाठी प्रवृत्त करते. ती जोपासण्याची प्रेरणा देते.
काहीजण याला अंधश्रद्धा म्हणतील; पण मला तसे वाटत नाही. ही प्रथा जर कुणाचे काही नुकसान करत नसेल, कुणाला तिच्यामुळे त्रास होत नसेल तर अशा प्रथा उलट जोपासल्या पाहिजेत; कारण मग त्या अंधश्रद्धा ठरत नाहीत. मानवी श्रद्धेच्या, प्राचीन परंपरेच्या आणि उज्ज्वल संस्कृतीच्या त्या एक अविभाज्य भाग बनून जातात.
अखेरीस आम्ही मुक्काम हलवला...
आम्ही संध्याकाळी उशिरा येऊन रात्री तिथे थांबायला हवे होते असे तिथल्या सगळ्यांचे मत होते. रात्री गावातले वातावरण आणखीनच वेगळे असते अशी माहिती उपस्थितांनी आम्हाला दिली.
“दोन कोंबडे आणले असते, तर मस्त शिजवून खाल्ले असते,” काकांचे भाऊ म्हणत होते, “थांबता काय सांगा.”
तसाही जेवणाचा विषय काही आमच्या डोक्यात नव्हताच, तशी अपेक्षाही नव्हती. शिवाय, तिथली अनोळखी माणसं आम्हाला इतक्या आपुलकीने भेटतील-बोलतील याचीही काही कल्पना नव्हती. पुढच्या आठवड्यात असणाऱ्या ‘घोरप्या’च्या महाप्रसादाचे आग्रहाचे निमंत्रणही त्यांनी आम्हाला दिले. आता रात्र व्हायच्या आत मला कोल्हापूरला पोहोचायचे होते. गडबड होती, त्यामुळे निघणे भाग होते. पण, तिथे एखादी रात्र घालवायला मात्र आम्हाला नक्की आवडले असते.
ती संधीसुद्धा साधू लवकरच पुन्हा केव्हातरी..! अनोळखी किंवा कमी माहितीच्या ठिकाणी, अडचणीच्या-दुर्गम भागात फिरण्याची मला जास्त आवड आहे. आणि तसेही, अचानक ‘प्लॅन’ करून ते ‘सक्सेसफुली एक्झिक्यूट’ करण्यात माझा हातखंडा आहेच..!
ऋणनिर्देश-
(१) श्री. रवींद्र मुकुंदा पाटील व ग्रामस्थ, शिराळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
(२) लेखिका वसुमती करंदीकर यांचा लेख, ‘गावपळण: असाही दृष्टिकोन’; दि. १४ डिसेंबर, २०१९
(३) प्रमोद यादव यांचा दै. गोमन्तकमधील लेख, दि. १८ नोव्हेंबर, २०२२
(लेखक- © डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस., एम.डी.(पेडियाट्रिक्स))
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित.)
(केवळ वॉट्सॲप संपर्क- 8329381615)
(www.dramittukarampatil.blogspot.com)
खरंच आपल्या अमूल्य वेळेचा सदुपयोग कसा करावा आणि आपल्या दूरदृष्टी अभ्यासपूर्ण विचार, बुद्धिमत्ता, लेखन कौशल्य, भाषा आणि योग्य ठिकाणी चित्र रेखाटन खरंच कौतुकास्तब आहे सर 👍👍💐
ReplyDeleteआपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार!
DeleteKhup chan lekhan. Junya rudhi ani parampara japanare Gav. Te pan pratyek varshi.
ReplyDeleteहो, खरंय. धन्यवाद!
Delete"गावपळण" या प्रथेची अतिशय सुरेख माहिती आपल्या लेखातून वाचायला मिळाली सर !निसर्गरम्य फोटोसहित वाचताना त्यातच हरवून जायला झाले ..अप्रतिम !!
ReplyDeleteधन्यवाद, मॅडम!
Deleteहा लेख जेवढा सुंदर आहे तेवढाच सुंदर दृष्टिकोनातून लेखकांनी तो आपल्यासमोर मांडला आहे. तळकोकणात आणि एकूणच कोकणात इतक्या प्रथा परंपरा पाळल्या जातात पण कुठेही त्याबद्दल judgemental न होता लेखकाने आपल्यासमोर वेगवेगळे पर्याय ठेवले आहेत.(आज सोशल मीडिया वर वाट्टेल तसे react करणाऱ्यांसाठी शिकण्यासारखे !) स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी एका (अनेकापैकी) प्रथेची शास्त्रशुद्ध चिकित्सा केलेली आहे. सोबत वाचकांना वाचनाचा आनंद पण प्राप्त करून दिला आहे.
ReplyDeleteMany more to go 👍
आपली प्रतिक्रिया खूपच उत्साहवर्धक व impartially लिहिलेली आहे. खूप खूप धन्यवाद!
Deleteसर ब्लॉक खूप छान झालाय आपल्या कोकणातला प्रथा तुम्ही मस्त मांडलात व मला सुद्धा माहिती कळाली आणखी एक म्हणजे त्यातील मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांना कसं तयार करायचं आपल्याबरोबर बाहेर जाण्यासाठी ऐनवेळी सांगून त्यांना आपल्या सोबत घेऊन त्या दिवसाची मजा घेऊन यायची हे कळालं खूप छान सर.
ReplyDeleteबरं झालं. मित्रांना असंच तयार करावं लागतं. खूप खूप धन्यवाद!
Deleteखूप सुंदर वर्णन आहे, अमीत सरांची लेखणी अशी आहे ज्यामध्ये वाचक हिरावून जातो आणि त्यांच्यासोबत त्या जगताची सफर करुन येतो.कोकणी माणूस, कोकणी भाषा, त्यांची आपूलकी, त्यांच्या परंपरा, समृद्ध निसर्ग सगळ्याच गोष्टी अतिशय मनमोहकपणे ऊतरवलेल्या आहेत.
ReplyDeleteआपल्या कौतुकास इथून पुढेही पात्र राहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद, सर!
Deleteएका शब्दाच्या पाठीमागे दडलेली परंपरा इतिहास भूगोल पर्यावरण इतर विचार
ReplyDeleteआणि बरच काही उलगडून दाखविल्याबद्दल धन्यवाद आभार आणि लेखाबद्दल शुभेच्छा !!
आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आपला आभारी आहे!
DeleteApratim superb
ReplyDeleteधन्यवाद!!! 🙏
Deleteसर तुमच्या लेखना मुळे वाचनाचि सावय लागेल असे तुमचे लेख असतात अप्रतिम सर
ReplyDeleteतसे झाले तर उत्तमच असेल!
Deleteअप्रतिम लेख आहॆ सर
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteआणि तुमचे मनापासून धन्यवाद सर. मी कोकणातली असून जे मला माहीत नव्हतं ते तुमच्यामुळे माहिती झालं 😊
ReplyDeleteदूर पाहण्याच्या नादात कधी कधी जवळचं पहायचं राहून जातं. पण, हरकत नाही. सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणे शक्य नसते. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
Deleteडॉक्टर अमित सुमन तुकाराम पाटीलसरांचा आजचा गावपळण हा ब्लॉग वाचला. पाटील सरांचे ब्लॉग वाचणे म्हणजे आहो भाग्य, काहीतरी हटके आणी हटके अंदाजात वाचायला मिळणार याबद्दल त्यांचे स्टेटस वाचुन आधीच उत्कंठा वाढलेली. कितीही धकाधकीचा दिवस गेला तरी सरांचे ब्लॉग वाचणे म्हणजे आपल्याला आपल्याच देशातील विविध परंपरेचे नव्याने ज्ञान होणे.सरांचे वन्यजीव प्रेम सर्वाना माहितीच आहे. पण आज गावपळण परंपरे विषयी एका MD डॉक्टर ने लिहिणे म्हणजे अगदी दुर्मिळ. डॉक्टर असुनही अगदी सामान्य माणसांशी संबंध असणे आणी ते जोपासाने अगदी अशक्य म्हणावी अशी गोष्टसर अगदी सहज करतात. मला वाटतं ही गोष्ट त्यांना वारसा हक्काने आई कडुन आली. सरांच्या आई म्हणजे आपल्या आर आर आबांच्या भगिनी. आबा जसे सर्वसामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध तसेच अमित पाटील सर.
ReplyDeleteसर आजचा ब्लॉग कायम स्मरणात राहिलं. आपल्या नावासमोर वडिलांच्या आगोदर आई च नाव लिहिणारे माझ्या माहितीतील तुम्ही पाहिले व्यक्ती. या पुढे आपणा कडुन विविध दुर्मिळ विषयांचे ब्लॉग वाचायला मिळोत या सदिच्छा सह जय महाराष्ट्र.
आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे, सिस्टर. डॉक्टर असलो तरी आपल्या संस्कृती, प्रथा आणि परंपरा यांच्यामध्ये मला रस आहे, त्यामुळे या गोष्टी हातून घडत असाव्यात.
Deleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
खूप सुंदर, वास्तव्यजीवनाला धरून आणि विचार प्रबोधनपर लेख आहे सर .
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!
Deleteडॉक्टर . साहेब अतिशय सुंदर माहिती व लिखाण. आम्ही फक्त गावपळण या प्रथेबददल पेपरमध्ये वाचले होते.. पण त्यामागची शास्त्रोक्त माहीती आपण अत्यंत सोप्या भाषेतून या लेखाद्वारे सांगितली आहे..लाख लाख धन्यवाद आपणास व आपल्या टिमला... अशीच नवनवीन माहिती आम्हाला आपल्याकडून मिळो...ु🙏🙏
ReplyDeleteआपले खूप खूप धन्यवाद! आपल्यासारख्या लोकांचीच माझी टीम आहे! 😀
Deleteखूपच छान
ReplyDeleteनवीन संकल्पना नवीन श्रद्धा ऐकायला मिळाली
आणि ती माहिती करून घेण्यासाठी स्वतः व्यस्त डॉक्टर असलेल्या लेखकाने घेतलेले कष्ट, वेळ पाळण्यामागचा प्रयास, काहीतरी नवीन शिकता - पाहता यावे यासाठीची तळमळ , बरोबरचे सहकारी व गावकरी यांचे बरोबरची संवादकला आणि आपल्याला जे कळते जे समजते ते इतरांनाही कळलं पाहिजे, उमगले पाहिजे यासाठीचा हा एवढा मोठा अभ्यासपूर्ण प्रपंच .... सर्वच काबील-ए - तारीफ
एकदम अचूक प्रवास वर्णन
आम्हीच खरोखर प्रवास करत आहोत असे वाटले
सुरुवातीला दिलेली वेळ म्हणजे बिग बॉसमध्ये कोणत्या वेळी काय घडत आहे हे सांगितल्यासारखे वाटले
( उदाहरणार्थ - मराठी बिग बॉसच्या दमदार आवाजात - सकाळी दहा वाजता )
आणि एवढे सर्व स्वतः करूनही आपल्याला मदत करणारे लोकांचे ( मग ते अनुभवाने वयाने शिक्षणाने कमी का असेनात ) किंवा ती माहिती इतर कुठूनतरी मिळाली तरीदेखील हा माझा लेखकमित्र त्यांचेही ऋणनिर्देश करण्यास विसरत नाही.
Proud of You
Keep it Up.
Dr Ravindra Kale
MBBS DGO & LLB.
खूप खूप धन्यवाद, डॉ. रवी! आपल्या प्रतिक्रियेमुळे माझ्यातल्याच काही गुणांची मला नव्याने ओळख झाली!
Delete
ReplyDeleteसर, अतिशय सुंदर प्रवास वर्णन आणि प्रथे बद्दलची माहिती प्रत्यक्ष जे प्रथा पाळतात त्यांच्याकडून आहे त्या भाषेत आणि शब्दात मांडली हे उत्तम झालं, लेखकाच्या शब्दात मांडल्यास त्यातील मूळ गाभा हरवून जातो पण तुम्ही ते टाळलं हे छान केलं.
फोटो आणि त्याचे कॅप्शन पण अगदी समर्पक.
आणि शेवटी ऋणनिर्देश 👌
माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच असं म्हणण्याच्या काळामध्ये ऋणनिर्देश खरच महत्त्वाचा.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपला आभारी आहे, सर! आपले निरीक्षण उत्तम आहे. 🙏
DeleteVery nice writing and great curiosity to explore things also,gives feeling of being there
ReplyDeleteThank you very much!
Deleteलेख थोडा मोठा आहे पण नाविण्यपुर्ण आहे, माहितीदर्षक आहे. भाषा शेली सुंदर. कोकणी भाषा देखील अतिशय छान लक्षात ठेवली आहेत तुम्ही ती त्यांच्या तोंडची वाक्य. 👌
ReplyDeleteयाच पद्धतीची गावपळण पद्धत मौ. टिक्केवाडी तालुका. भुदरगड मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटते फक्त येथे गाव न बदलता फक्त शेती शिवारात जाऊन राहण्याची पद्धत आहे. राहतेवेळी भावकी भावकी, मित्र -मित्र किंवा पाहुणे - रावळे असे मिळून मिसळून राहतात. यामुळे अबोला तुटतो नात्यामध्ये वातावरण छान होतं.
लेख थेट तिथल्या ग्रामस्थांच्या भाषेत लिहायचा होता. शिवाय, यात प्रवासवर्णनही आहे, त्यामुळे लेख थोडा मोठा झाला आहे.
Deleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार!
7387057327
ReplyDeleteहा कोणाचा नंबर आहे? नाव?
Deleteगावपळण" या प्रथेची अतिशय सुरेख माहिती आपल्या लेखातून वाचायला मिळाली सर आपल्या जवळच्या एखाद्या भागातील प्रथा परंपरा व संस्कृती याची खूप छान माहिती तुम्ही करून दिलीत सर..अप्रतिम
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहे. खूप खूप आभार!
Deleteसाहेब एक नंबर खूप सुंदर विस्तृतपणे माहिती दिली आहे मला अगदी वाटले की मीच तिथे प्रत्यक्षात या गावपळन प्रथेविषयी माहिती घेत आहे एवढ्या सुंदरपणे तुम्ही लेखन केले आहे या परंपरेची परिपूर्ण माहिती देऊन तुम्ही आम्हाला या प्रथेविषयी खूप छान न माहिती असलेली माहिती करून दिली खूपच छान
ReplyDeleteआपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
ReplyDeleteअमित सर लेख लगेचच वाचला पण reply करायला वेळ झाला आहे. लेख खूप सुंदर लिहला आहे.एका जुन्या परंपरेची नवी माहिती अनुभवता आली. आपल्या busy schedule सोबत आपण आपला छंद खूप मनापासून जोपासता आणि फुली एन्जॉय करता.keep it up sir. नवीन प्रवासासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteआपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार! वेळ मिळत नाहीच; पण आवडीसाठी तो मुद्दामहून काढावा लागतो. यशस्वी जीवन जगण्याच्या मार्गामध्ये प्रवास आणि माणूस (travel & people) या महत्त्वाच्या गोष्टी आहेत; ज्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करत राहतो. समृद्ध जीवन जगण्याच्या मार्गांपैकी मी निवडलेला हा एक पर्याय आहे. 😊
Delete