स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विशेष लेख: “वो आसमान था, लेकिन सर झुका के चलता था!”
स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील: “वो आसमान था, लेकिन सर झुका के चलता था!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
![]() |
(सौजन्य- रुपेश क्रिएशन/ गुगल) |
आबांच्या पहिल्या निवडणुकीबद्दल-
(आबा पराभूत झालेली पहिली आणि एकमेव निवडणूक)
वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून आबा तत्कालीन मॅट्रिकला केंद्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी ‘शांतिनिकेतन महाविद्यालया’त प्रवेश घेतला.
आबा त्यावेळी ‘कमवा व शिका’ योजनेत काम करत होते. विज्ञान शाखेत प्रवेश घेतला तर काम करायला वेळ मिळणार नाही; आणि कला (आर्ट्स) शाखेत प्रवेश घेतला तर पुढे प्रशासकीय सेवेत करिअरही करता येईल या दुहेरी हेतूंनी आबांनी कला शाखेत प्रवेश घेतला होता. शिवाय, आबांची बुद्धिमत्ता पाहता आबा आय.ए.एस. होऊ शकतात असे माझ्या आजोबांना (आबांचे वडील) वाटत असे; आजोबांनी तसे काही वेळा बोलूनही दाखविले होते. पण, आबांच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण परिस्थितीच बदलली. घरात गरिबी आधीपासूनच होती; पण आजोबांच्या मृत्यूनंतर गरिबीने टोक गाठले. त्यामुळे, कला शाखेत प्रवेश घेण्यापासून आबांना गत्यंतर नव्हते.
१९७५-७६ साली आबा शांतिनिकेतनमध्ये एफ.वाय.बी.ए.ला (First Year B. A.) होते. त्यावेळी विद्यार्थी मंडळाची निवडणूक (जी.एस.ची निवडणूक असते तशा पद्धतीची) लागली होती. त्यात दोन पॅनेल्स एकमेकांविरोधात उभी ठाकली होती. एक आबांचे, आणि त्यांच्याविरोधात सुभाष कोठावळे यांचे. आबांच्या पॅनेलमध्ये कवठे महांकाळचे दादासाहेब ढेरे, आरवड्याचे वसंत जाधव, बाळू माने आदींचा समावेश होता; तर विरोधी गटामध्ये रणजीत धुरे, ए. के. पाटील, सांगोल्याचे दिघे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सर हे स्वतः आमदार होते. तर, त्या निवडणुकीचे संचलन प्रा. भगवान मोटे, प्रा. जगदाळे सर इत्यादी अध्यापकवृंद करत होता.
आबा उपजतच अंगी उत्तम नेतृत्वगुण असलेले, प्रचंड वाचन असणारे, मनमिळावू स्वभावाचे आणि विद्यार्थीप्रिय तर होते; पण पैशांच्या बाबतीत एकदम गरीब होते. त्यांच्या पॅनेलमधील सर्वजणही सामान्यतः तशाच परिस्थितीतून आलेले होते. (आबा अत्यंत गरीब घरातले असले तरी त्यांना त्याचा न्यूनगंड नव्हता असे प्रा. ढेरे यांनी मला आवर्जून सांगितले.) आबांच्या पॅनेलमधल्या विद्यार्थ्यांना कित्येकदा शिळ्या भाकरी-चटणीवर दिवस काढायला लागायचे, तर विरोधी पॅनेलमधली मुले त्यामानाने चांगलेचुंगले खाणारी-पिणारी होती. प्रचार जोरात चालू होता. आबा त्यांच्या वक्तृत्वाने विद्यार्थ्यांना आपलेसे करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत होते. त्यादरम्यान एका गंमतीशीर प्रसंगातून आबांच्या स्वभावातला करारीपणाही समोर येतो.
त्याचे असे झाले.
मतदानाच्या थोडेसे आधी आबांच्या विरोधी पॅनेलच्या विद्यार्थ्यांनी आबांच्या पॅनेलमधून ‘सांस्कृतिक कार्य प्रतिनिधी’ या पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या दादासाहेब ढेरे यांना एका ठिकाणी जेवणासाठी बोलावून घेतले. शांतिनिकेतनच्या जवळ असणाऱ्या एका पानपट्टीजवळ त्या विद्यार्थ्यांनी खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. उत्तम पक्वांनांनी भरलेल्या डब्यातले जेवण त्यांना खाऊ घातले गेले. त्यानंतर त्यांची तिथेच डुलकी लागली. आबांना गोंधळवण्यासाठी आणि निवडणुकीच्या राजकारणाचा एक भाग म्हणून सर्वत्र ‘ढेरेला किडनॅप केले आहे’ अशी आवई सर्वत्र उठविण्यात आली. ढेरे उठले त्यावेळी त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. ते कपांउंडवरून उडी मारून बाहेर पडले आणि कर्मवीर भाऊसाहेब पाटील आश्रमशाळेच्या कपांउंडजवळील एका बकुळीच्या झाडावर चढून बसले. तोपर्यंत आबांच्या कानावर ही गोष्ट पडली होती. पण, आबा जराही गोंधळले नाहीत. आबांनी निवडणूक निर्णय अधिकारी असणाऱ्या प्रा. मोटे व प्रा. जगदाळे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. “ढेरे जर सापडला नाही तर मी पोलिस तक्रार करणार” असे आबा ठामपणे म्हणाले. मग त्यांनी शोधाशोध सुरू केली. होस्टेलच्या कॉरिडॉरमधून शोध घेत असताना घाबरून झाडावर चढून बसलेल्या ढेरे यांनीच आबांना हाक मारली, आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. आबांचे मित्रप्रेम आणि त्यांचा करारी स्वभाव या दोहोंचेही त्यावेळी सर्वांना दर्शन घडले.
आबांच्या विरोधी पॅनेलमधील मंडळी परिस्थितीने चांगल्या घरातली होती. त्यातल्या काहींनी तर या निवडणुकीसाठी स्वतःच्या गळ्यातील चेन, अंगठी वगैरे मोडल्याची तेव्हा वदंता होती. मतदारांसाठी पुरीभाजी, शिरा, उपीट यांशिवाय उत्तमोत्तम पक्वांनांच्या जेवणावळी त्यांनी घातल्या होत्या. (त्याकाळी तेवढ्यानेच मतदारांवर प्रभाव पडायचा. आता ते शक्य नाही.) साम, दाम, दंड, भेद यांचा कमीअधिक वापर करण्याचे कौशल्य त्यांतल्या काहीजणांकडे होते. याच्या बरोबर उलट परिस्थिती आबांच्या पॅनेलची होती. भाषणे करणे, विद्यार्थीहिताचे मुद्दे जोरकसपणे मांडणे वगैरे गोष्टींवरच आबांच्या पॅनेलच्या प्रचाराचा भर होता. याचा अर्थात व्हायचा तोच परिणाम झाला. आबा विद्यार्थी कल्याण प्रतिनिधीपदाची निवडणूक ५ मतांनी हरले. आबांच्या पूर्ण पॅनेलचा काठावर पराभव झाला. निवडून आलेल्यांनी जल्लोष केला, गुलाल उधळला.
हे सर्व पाहून आबांच्या पॅनेलमधील त्यांचे मित्र व सहकारी निराश झाले. श्री. ढेरेंनी तर स्वतःला एका खोलीत कोंडूनच घेतले. पण, आबा खरेखुरे लढवय्ये होते. ते रुमवर आले. निराश सहकाऱ्यांना त्यांनी बाहेर काढले. त्यावेळी ५ पैशांना खाऊचे पान मिळायचे. आबांच्याकडे फक्त ४ आणेच होते, तरीही आबांनी ५-५ पैशांची ५ पाने मित्रांसाठी विकत घेतली. ती खात खात आबा म्हणाले, “अरे, एवढ्याने काय लगेच निराश होताय? आपला तर नैतिक विजय झाला आहे. हातात काहीही नसताना आणि विरोधकांकडे सर्व काही असतानाही आपण निवडणूक घासाघाशीची करून दाखवली. यापेक्षा अजून काय पाहिजे?”
आबांच्या शब्दांनी सर्वांना हुरूप आला आणि सगळे क्षणार्धात ‘रिलॅक्स’ झाले. आबांचे तत्कालीन सहकारी आणि विरोधी गटातील काही विद्यार्थीही पुढे चांगले शिकले; विविध प्रशासकीय, शैक्षणिक पदांवर कार्यरत झाले; काहींनी साहित्याच्या क्षेत्रात नाव कमावले. श्री. सुभाष कोठावळे सर तर आबांचे जीवलग मित्र झाले. आडनिड्या वयातले प्रतिस्पर्धी खऱ्या आयुष्यात एकमेकांचे सहकारी झाले.
मात्र, आपल्या आयुष्यातील पहिली आणि एकमेव निवडणूक काठावर हरलेले आबा पुढे महाराष्ट्राचे केवळ उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच झाले नाहीत, तर जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले नेते झाले. आपल्या कष्ट करण्याच्या वृत्तीमुळे आबा देशाच्या राजकारणातील एक आदरयुक्त दबदबा असणारे नेते बनले.
आबांच्या संवेदनशील स्वभावाबद्दल-
आबा तेव्हा गृहमंत्री होते. प्रसंग आबांचे त्यावेळी शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘चित्रकूट’ बंगल्यावरचा! दिनांक १७ नोव्हेंबर, २०१२ रोजी मा. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्या-नंतर सगळ्या मराठी वृत्तवाहिन्या त्यांच्या अंत्ययात्रेचे 'लाईव्ह' प्रक्षेपण करत होत्या, लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत जमा झाले होते. बंगल्यावरील हॉलमध्ये मा. आबा व स्व. विनायकराव मेटे एकमेकांशी बोलत बसले होते. हॉलमध्ये मीही उपस्थित होतो. आबा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधूनमधून सुरक्षा व्यवस्थेचे ‘अपडेट्स’ घेत होते. बोलता बोलता आबा एकदम अचानकपणे मेटे साहेबांना म्हणाले, “विनायकराव, माझ्या अंत्ययात्रेला पण अशीच लाखो लोकांची गर्दी होईल का? काय वाटते तुम्हाला?” आबांच्या या प्रश्नाने हॉलमधील वातावरण अचानक पालटून गेले. मेटे साहेबही क्षणभर गोंधळले. ते ओळखून आबाच पुढे म्हणाले, "अहो, माझ्या मरणाचं सोडून द्या. मला एवढेच जाणून घ्यायचेय की, माझ्या कामातून मी तळागाळातल्या लोकांपर्यंत खरंच पोहोचलो असेन का?" आबा इतके संवेदनशील राजकारणी होते.
आबांच्या संवेदनशीलतेचे आणखीन एक उदाहरण पहा. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पक्षातील तरुण नेत्यांना शरद पवार साहेबांनी थेट कॅबिनेट मंत्री केले. आबांना त्यावेळी ‘ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता’ ही खाती मिळाली. आबांना शासकीय निवासस्थान म्हणून ‘चित्रकूट’ बंगला मिळाला. मलबार हिल पोलिस ठाण्याच्या समोर हा बंगला आहे. बंगल्याच्या परिसरात समोरच एक ‘जलतरण तलाव’ (swimming tank) त्यावेळी होता, अतिशय देखणा असा. आबांनी बंगल्याची पहिल्यांदा पाहणी केली, तेव्हा ते त्यांच्या सचिवांना म्हणाले, “हा स्विमिंग टँक मुजवून टाका. राज्यभरात ठिकठिकाणी दुष्काळ पडला असताना आणि पाण्याची टंचाई असताना ‘पाणीपुरवठा’ मंत्र्याच्याच बंगल्यात पाण्याचा असा अपव्यय होणे योग्य नाही.” त्यानंतर लगेचच तो टँक मुजवून बंद करण्यात आला. शिवाय १९९९ च्या पहिल्या मंत्रिपदापासून ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री झाल्यावरही आबांनी बंगला बदलण्यासाठी कधीही आदळआपट केली नाही ही गोष्टही हल्लीच्या राजकारण्यांच्या अपेक्षांत विरळाच!
सर्वसामान्य जनतेला त्यांनी विश्वासाने निवडून दिलेल्या नेत्यांकडून काय अपेक्षा असतात याची आबांना पुरेपूर कल्पना होती. मुळात एखाद्या कामासाठी मुंबईत येणे हेच गावाकडच्या लोकांसाठी एक दिव्य असते. अशावेळी मंत्रालय किंवा मंत्र्यांच्या बंगल्यावर जाणे व मंत्र्यांना भेटणे अशा तुलनेने सोप्या असणाऱ्या गोष्टीही लोकांसाठी अवघड बनून जातात. लोकांची ही अडचण आबांनी मंत्री होताच ओळखली होती. त्यामुळेच आबांनी त्यांच्या निवासस्थान आणि मंत्रालयातील कार्यालयीन दालनांची द्वारे सर्वसामान्यांसाठी कायमची खुली केली होती. आबांच्या दोन्हीकडील कार्यालयांत सर्वसामान्य लोकांना कोणाच्याही शिफारशीशिवाय व चिठ्ठीशिवाय आबांना थेट भेटता येणे शक्य होते. तत्कालीन बऱ्याच पत्रकार मित्रांनी हे पाहिले असेल की, आबांच्या मंत्रालयातील दालनासमोर रेशनिंगच्या दुकानाप्रमाणे रांगा लागलेल्या असत. मंत्रालयातील प्रतिक्षालयात पांढरा सदरा आणि विजार किंवा धोतरातील गावाकडचा माणूस आणि सुटाबुटातील एखादा उद्योगपती किंवा व्यावसायिक एकाच सोफ्यावर आबांच्या भेटीची प्रतिक्षा करत बसलेले दिसत असत.
![]() |
आबांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली तो क्षण! |
आबांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र तैनात असणाऱ्या पोलिस व सुरक्षारक्षकांप्रतीही आबा तितकेच संवेदनशील होते. बऱ्याचदा व्ही. आय. पी. बंदोबस्तासाठी कार्यरत असणाऱ्या स्टाफची खाण्यापिण्याची व राहण्याची आबळ होण्याची शक्यता असते. आबा दौऱ्यावर असतानाही याबाबत वैयक्तिक लक्ष देत. आणि, गावी आल्यावर आबांच्या आई स्वतः प्रत्येकजण जेवला आहे की नाही याची चौकशी करत. कामात कितीही व्यग्र असले तरी, आबा दिवाळीचे तीन दिवस मात्र अंजनीत मुक्कामी असत. पोलिसांना कोणतेही सण कुटुंबियांसोबत साजरे करता येत नाहीत याचे आबांना वैषम्य वाटत असे. त्यामुळे दिवाळीच्या तीन मुख्य दिवसांत आबा त्यांच्या सुरक्षा रक्षकांना घरी जाण्यासाठी पाठवत असत.
आबांनी केलेली पोलिस भरती ही ऐतिहासिक व विक्रमी मानली जाते. कष्ट करूनही गरिबांच्या मुलांना पोलिस भरतीत योग्य स्थान मिळत नाही अशी समाजभावना झाली होती. स्वतः अतिशय टोकाच्या गरिबीचा सामना केल्यामुळे गावकुसातील घरांमध्ये रोजगार व त्यातही सरकारी नोकरीचे किती महत्त्व असते, याची आबांना कल्पना होती. त्यामुळे पोलिस भरती पारदर्शक करण्यासाठी आबांनी चांगलीच कंबर कसली होती. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आबांनी पोलिस भरती प्रक्रियेतून मुलाखतीचा भाग काढून टाकला. शिवाय, शारीरिक चाचणीचेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व या चाचणीचे गुण चाचणी होताच लगेच जाहीर करणे या बाबींचा अवलंब केला.
सामाजिक संवेदनांच्या जाणिवेतूनच आबांनी ऐतिहासिक असा डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता हे सर्वश्रुत आहेच. पण, या बंदीचा आबांच्या राजकीय जीवनावर जितका परिणाम झाला, त्यापेक्षाही जास्त वाईट परिणाम त्यांच्या शारीरिक व सामाजिक जीवनावर झाला होता. याच्याच परिणामस्वरूप ‘नाईट लाईफ’चे समर्थन (आणि, डान्सबारबंदीची ‘मोरल पोलिसिंग अशी निर्भर्त्सना) करणाऱ्या एका दैनिकाच्या प्रतिनिधींनी आबांचे खोटे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून आबांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आबांच्या सतर्कतेमुळे तो अयशस्वी ठरला. आबांच्या बंगल्यावरील जनता दरबारात अकारण त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला पत्रकार भगिनीला आबांनी “ताई, जरा लांबून बोला,” अशा शब्दांत विनंती केली होती. महिला पत्रकाराला आबांच्या जवळ गेलेले दाखवायचे आणि नंतर तिला मीडियातून ‘आबांच्या आसपास बारबाला’ अशी सनसनाटी बातमी करण्याचा (खोटे स्टिंग ऑपरेशन) त्या पत्रकार आणि कॅमेरामनचा हेतू होता. अर्थात आबांनी तो डाव क्षणार्धात हाणून पाडला होता. त्यावेळी फारशा मराठी वृत्तवाहिन्या नसल्यामुळे ती बातमी फार गाजली नाही; मात्र ‘चित्रलेखा' मॅगझिनमध्ये यावर एक मोठा लेख छापून आला होता आणि आबांनी दाखविलेल्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल (आणि, सतर्कतेबद्दल) आबांचे खूप कौतुक करण्यात आले होते. शिवाय ETV Marathi चॅनेलनेही आबांचे खूप कौतुक केले होते.
असाच आणखीन एक महत्त्वाचा प्रसंग आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत एक महिना आमचे सर्व कुटुंब ‘चित्रकूट’ बंगल्यावर मुक्कामी असे. घरातील सर्व मुले रोज संध्याकाळी आबांची वाट पाहत बसलेली असत. (आपल्या कुटुंबियांना ‘मुंबईची हवा’ लागू नये म्हणून आबांनी त्यांच्या आई, पत्नी व मुलांसह कोणालाही कायमचे मुंबईला नेले नव्हते. राजकीय पदे शाश्वत नसतात, त्यामुळे तशा सवयीही कोणाला लागू नयेत अशी आबांची यामागची धारणा होती.) घरी आल्यावर आबा सर्वांबरोबर गप्पा मारत कॅरम खेळत अर्धा तास बसत असत. आबांचे फोन त्यावेळीही चालू असत. (विद्यमान तरुण आमदार रोहितदादा त्यावेळी अगदीच लहान होते.) खेळणे चालू असतानाच टी. व्ही. वर अशा आशयाची एक बातमी आली की, ‘नागपूरमध्ये चोऱ्या-दरोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे तिथे महिलांनी रात्रीच्या गस्तीसाठी पथके बनविली आहेत.’ बातमी ऐकताच आबांनी लगेच नागपूरच्या एका वरिष्ठ जबाबदार पोलिस अधिकाऱ्याला फोन लावून त्याबाबत जाब विचारला. तिकडून ते अधिकारी काय बोलले माहिती नाही, मात्र आबा चांगलेच चिडले होते. “याला लोकसहभाग म्हणतात का? महिलांनी जर गस्त घालायची असेल, तर तिथले पोलिस काय करतात? काय ती ॲक्शन घ्या आणि मला सकाळी ‘ब्रीफ’ करा,” असे त्यावेळी आबांनी दरडावले होते. जनहिताचा विषय असेल तर आबा कधीच अधिकाऱ्यांच्या हाती लागायचे नाहीत!
आबांच्या ‘साधेपणा’बद्दल-
लोकांना भावणारा आबांचा दुसरा गुण म्हणजे, आबांचा साधेपणा! आबांचा साधेपणा दाखविणाऱ्या काही प्रसंगांचा मी स्वतः साक्षीदार आहे.
साल बहुधा २००४ असावं. आबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तेव्हा पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यानंतर ते सांगली दौऱ्यावर आले होते. तो दौरा आटोपून ते परत मुंबईला जाणार होते. मीही आबांबरोबर मुंबईला निघालो होतो. सांगलीतून पुण्याला 'बाय रोड' आणि पुण्यातून विमानाने मुंबईला जायचे होते. जाताना पुण्याच्या अलीकडे जवळपास २० किलोमीटर अंतरावर आबा बसलेली कार पंक्चर झाली. आबा तेव्हा अजून ग्रामविकास मंत्रीच असल्याने सोबत पोलिसांच्या दोन कमांडर जीप इतकाच आबांना बंदोबस्त असायचा. गाडी थांबताच सुरक्षा अधिकारी खाली उतरले आणि पर्यायी गाडीच्या उपलब्धतेच्या मागे लागले. ते पुरते गोंधळले होते. पण, आबा पटकन खाली उतरले आणि बरोबर असलेल्या त्या साध्या कमांडर जीपमध्ये जाऊन बसले, सोबतचा सुरक्षा अधिकारी आबांना तसे न करण्यासाठी विनवण्या करत होता; पण आबा ठाम होते. त्या साध्याश्या एसी नसलेल्या, कुरकुर आवाज करणाऱ्या जीपमधून आबांनी जवळपास २०-२५ किमीचा प्रवास केला होता, आणि त्या संपूर्ण प्रवासात मी आबांसोबत होतो. गंमतीची गोष्ट म्हणजे, आबांनी कसल्याही सूचना न करताही ड्रायव्हरचा हात मात्र थरथर कापत होता, आणि तो पूर्णपणे घामाने भिजलेला होता.
राज्याचे सर्वाधिक काळ गृहमंत्री, एकदा उपमुख्यमंत्री, तीन वेळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहूनही आबांनी कधीच पांढऱ्या रंगाची 'अम्बॅसॅडर' कार वापरायचे सोडले नव्हते; इतकेच काय, पण 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा व्यवस्था असतानाही आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी वारंवार त्यासंदर्भात सूचना करूनही आबांनी कधीच 'बुलेटप्रूफ' कारही वापरली नाही. यावर झी २४ तास या वृत्तवाहिनीने आबांच्या निधनानंतर एक खास रिपोर्टही बनवला होता.
![]() |
आबांच्या नेहमीच्या वापरातील ही ॲम्बॅसॅडर कार! मंत्रिपदावर असताना आबा नेहमी हीच कार वापरत असत. (सौजन्य- झी २४ तास) |
कोल्हापूर दौऱ्यावर असताना आबा मंगळवार पेठेतील शाहू बँकेजवळच्या आमच्या भाड्याच्या घरी येत असत. अत्यंत साधे कौलारू असे ते घर होते. पण, आबांच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेसाठी तो मुख्य चौकातला रस्ता बंद केल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर मात्र आबांनी दिवसाच्या वेळी आमच्या घरी यायचे खूप कमी केले. कामांची आणि मीटिंगांची आवराआवर झाल्यावर रात्री १२.३०-१.०० वाजता ते एखादी रिक्षा किंवा मित्राची छोटीशी कार घेऊन आमच्याकडे यायचे. घरी कधीही आले तरी थेट फरशीवर बसून आबा भाकरी, वांगे, दही, चटणी आणि कांदा हेच पदार्थ खायचे, आणि "तुझ्या हाताला आईच्या हाताची चव आहे बघ, सुमन," असे आईला म्हणायचे. आबांच्या गाडीतही घरी केलेला भडंग, घरचे पापड, भाजलेले शेंगदाणे, फुटाणे आणि चुरमुरे हेच पदार्थ असायचे.
आबांच्या साधेपणाचे बरेच किस्से आहेत. पालकमंत्री असताना आबा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात कोणतीही सुरक्षाव्यवस्था न घेता एखाद्या जिल्हा परिषद सदस्याच्या गाडीवरून बिनधास्त फिरायचे. कुलदैवत श्री जोतिबाच्या दर्शनासाठीच्या रांगेत एखाद्या रविवारी आबांना उभे असलेले पाहून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसायचा नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फाटाफूट होण्याच्या आधी आणि नंतरही काहीवेळा पत्रकार परिषदा आणि जाहीर सभांमधून ज्येष्ठ नेते मा. खास. शरद पवार साहेब यांनी त्यांना आबांची कमतरता जाणवत असल्याचे विधान केले. आबांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचीच नाही, तर राज्य व देशाचीही अपरिमित हानी झाल्याच्या जनसामान्यांच्याही भावना आहेत. तुम्ही यूट्यूबसारख्या समाजमाध्यमावर जाऊन आबांचा कोणताही व्हिडिओ पाहिला, तर त्याखाली तुम्हाला आबांच्या विरोधात एकही नकारात्मक कॉमेंट लिहिलेली आढळणार नाही.
आबांचे पुण्यस्मरण-
मुंबई-बंगळुरू महामार्गावर शिरवळ येथे रस्त्याकडेला तीन प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची मोठाली छायाचित्रे झळकत असल्याचे सर्वांनी पाहिले असेल. आबा, स्व. विलासराव देशमुख व स्व. निळू फुले यांची ती छायाचित्रे आहेत, आणि आबांच्या फोटोखाली मोठ्या अक्षरांत लिहीले आहे, 'आपला माणूस'! या तिघांचे समान वैशिष्ट्य म्हणजे समाजातील तळागाळातील लोकसमुदायात सहजपणे मिसळण्याची त्यांची वृत्ती आणि समाजमनाच्या भावनांना हात घालण्याची त्यांची हातोटी! आयुष्यभर प्रसिद्धीच्या झोतात राहिलेला एखादा कलाकार किंवा खेळाडू यांना मरणोत्तर असे मान-सन्मान लाभणे हे त्यामानाने सामान्य असले तरी एखाद्या राजकारण्याला जनतेच्या हृदयात असे स्थान मिळणे विरळाच! तो सन्मान आबांना लाभला.
२००६ साली पुण्यातील बालगंधर्व सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात मुलाखतकाराने आबांना जेव्हा विचारले होते की, "आबा, राजकारणात असूनही तुम्ही राजकारणी वाटत नाही. हे तुम्हाला कसे काय जमते?" तेव्हा त्याला उत्स्फूर्तपणे उत्तर देताना आबा मिश्कीलपणे म्हणाले होते, “एखादा राजकारणी राजकारणी वाटत नाही हेच त्याच्या अस्सल राजकारणी असण्याचे प्रतीक आहे!”
कोणताही पक्षीय किंवा सरकारी अभिनिवेश किंवा भीडभाड न ठेवता जे दिसते, जसे दिसते, ते आणि जे मनात आहे तेच ओठांवर आणण्याचे धारिष्ट्य असणाऱ्या काही मोजक्या राजकारण्यांमध्ये मा. बाळासाहेब ठाकरे, मा. नितीन गडकरी, मान. पतंगराव कदम यांच्यासोबत आबांच्या नावाचा समावेश होतो.
![]() |
स्वर्गीय आबांना भावपूर्ण श्रद्धांजली! |
(तळटीप- सदर लेखक हे मान. आर. आर. आबा पाटील यांचे सख्खे भाचे आहेत.)
जे "कठीण" आहे,ते "सोपे" करावे,जे "सोपे" आहे,ते "सहज" करावे,जे "सहज" आहे,ते "सुंदर" करावे,आणि......जे "सुंदर" आहे त्यावर मनापासून "प्रेम" करावे.
ReplyDeleteएखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते...
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणं
केव्हाही उत्तमच...!!!
💐🙏 वरील पंक्तीप्रमाणे आबांचे जीवन होते 🙏💐
🙏💐 विनम्र अभिवादन💐🙏
आपले म्हणणे एकदम खरे आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Delete🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteआबा म्हणजे आपले वाटणारे असे व्यक्तिमत्व. आबांनी परत यावे असे महाराष्ट्रातील कमीत कमी 5 ते 6 कोटी लोकांना तर सहज वाटत असेल. परवा मला एक पोलिस मित्र म्हणाले , आबांनी आमच्यासारख्या कितीतरी गरीब पोरांचे आणि आमच्या घराचे कल्याण केले. हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं
ReplyDeleteबरोबर आहे. आबांच्या गेल्याच्या १० वर्षांनंतरही जनसामान्यांच्या ‘आज आबा असायला हवे होते’ याच भावना आहेत!
Deleteवेचक वेधक आणि हृदयस्पर्शी लेख
ReplyDeleteआपले खूप खूप आभार!
Deleteजनसामान्यांचा नेता...
ReplyDeleteअगदी तळागळातील लोकांना हवहवसं वाटणार नेतृत्व..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी अहोरात्र झटणारं नेतृत्व..
काय बोलू ...
आदरणीय आबांविषयी बोलाव तितक कमीच....🙏
छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या राजकीय तत्त्वांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आबांनी आयुष्यभर केला. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Deleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!
ReplyDeleteप्रिय, डॉक्टर अमित लेख वाचला सर्व स्पर्शीय घडामोडीने सजलेला लेख त्यातील सत् कृतींचा गंध सर्वदूर दरवळत राहील याचा मला सार्थ अभिमान , धन्यवाद!
ReplyDeleteडॉ अमित साहेब... प्रथम आपल्या लेखणीला व शब्दसामर्थ्याला नमस्कार... कारण सहा महिन्यापूर्वीचे आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आपण आपल्या लेखणीने अक्षरशः जिवंत केलेत...मी काल रात्री बारा वाजता हा लेख वाचला आहे. वाचताना डोळ्यासमोर ते क्षण जिवंत झाले व माझी झोपच उडाली... मी आपणास कायम म्हणतो की आपणा दैवी देणगी आहे.. त्याशिवाय असले लिखाण होऊच शकत नाही.. असेच विविध विषयांवर आपले लेख येत राहो हीच.. ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏🙏♥️♥️👌
ReplyDelete